You are currently viewing “रातराणी” आणि “वाटसरू”

“रातराणी” आणि “वाटसरू”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका प्राजक्ता ठोंबरे यांचा अप्रतिम लेख*

 

*”रातराणी” आणि “वाटसरू”*

रातराणी…… जसजशी रात्र व्हायला लागते तसा तसा हिचा आल्हाददायक सुगंध दरवळायला लागतो. हळूहळू हा दरवळ आसपासचा परिसर सुगंधित आणि वातावरण मोहित करून टाकतो.

आणि मग क्वचित प्रसंगी एखादा वाटसरू या परिसरात वावरत असता त्याचे पाय थबकतात. कसला तरी मोहक सुगंध आहे हे बघण्यासाठी तो दृष्टीने आसपासच्या वृक्ष वेली न्हाळायला लागतो…..तोच त्या सुगंधाच्या ओढीने काही पावलं त्याच्याही नकळत तो मागे जातो. आणि दृष्टीला नाजूक रातराणीच्या फुलांनी डवरलेलं ते वृक्ष बघून तो पुन्हा स्तब्ध होतो.

खरंतर त्याच्या साठी तो वृक्ष ,तो सुगंध आणि ती रातराणी काहीच नवं नसतं….. तरीही काही काळ तो तिथेच रमतो. मन भरुन त्या रातराणीचा मोहक रुप न्याहाळतो, सुगंध हृदयात साठवून घेतो आणि आपोआप त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटतं…..

हा वाटसरू दुसरं कोणी नसून आपण च आहोत…..तो वृक्ष म्हणजे आपला भूतकाळ ,ती रातराणी म्हणजे भूतकाळातल्या रम्य आठवणी आणि तो सुगंध / दरवळ म्हणजे त्या आठवणीत रमताना आपल्याला होणारा आनंद.

अर्थात क्वचित प्रसंगी भूतकाळातल्या काही आठवणी या बाभळीच्या काट्यासारख्या सलणा-या देखील असतात…..पण तिथे नक्कीच मन रमत नाही.

पण ही रातराणी मात्र बरोबर रात्र व्हायला लागली की फुलते अगदी तसंच, काही आल्हाददायक आठवणी रात्रीच्या शांततेत भेटायला येतात.

वर्तमानात जगावं, भूतकाळातल्या खपल्या काढून वर्तमान आणि भविष्य दोन्हींची माती होते. असं कांहींच मत असेल आणि त्यात नक्कीच काही चूक नाही.

भूतकाळात अति रमूच नये पण काही वेळेस मनाची मरगळ झटकून टाकण्यासाठी हा दरवळ आवश्यक ही असतो.

बरेचदा हा आठवणींचा ठेवा खूपच सुखद ही असतो. प्रत्यक्ष अनुभव कदाचित वारंवार मिळणार नाही पण हा दरवळ शोधायला मनाने हा असा फेरफटका हवा तेव्हा मारता येतो. वेळेचं आणि काळाचं बंधन नसतं ह्या आनंदाला….

तेव्हा वर्तमानात जगताना कधीतरी एक फेरफटका त्या रातराणीचा शोध घ्यायला मारलात तर सुगंध च मिळणार आहे फक्त आठवणी रम्य असायला हव्या.

मग आपण ही त्या रातराणी प्रमाणेच ताजे आणि सुगंधित होऊन आसपासचा परिसर आल्हाददायक बनवू शकतो.

 

प्राजक्ता ठोंबरे

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा