You are currently viewing पसायदान

पसायदान

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

गझल गझल काय करता
ती ही एक कविताच असते
गंगा, जमुना कांही म्हणा
ती ही एक सरिताच असते

अभ्यासाने कळतील सुद्धा
गण, मात्रांचे बंध निर्बंध
कितीही सुंदर रंगवले तरी
कागदी फुलां येईल का गन्ध

ज्ञानेश लिहीत सांगत गेले
ओवी म्हणून ओवीले नाही
तुकोबा नाचत गात गेले
अभन्ग ठरवून गायिले नाही

वृत्ता मागून वृत्ते पेरली
पण वृत्ती कुठे पिकली नाही
गरीब अडाणी बाई सुद्धा
वात्सल्य कुठे शिकली नाही

प्रेम कधी कां ठरवून होतं?
प्रेमाची कुठे शाळा नाही
भक्तीला नुसतं मौन ही पुरतं
भक्ती म्हणजे माळा नाही

चंद्र सूर्य नभी रोज उगवती
नाही कवींच्या कविते साठी
भाव भावना तश्या प्रकटती
नाही व्याकरण नियमां साठी

नका विचारू कधी कुणाला
सुचेल ते ते लिहीत जावं
सूर भावना मम छन्द मनाला
शब्दांनी मागे धावत यावं

कविता म्हणजे सृजनच आहे
हृदयाचे ते स्पन्दन असते
शब्दांचे त्या कुंपण हो आहे
जसे हिऱ्याला कोंदण असते

व्यथा मनी जी जशी प्रकटली
शब्दांवाटे सांडत आहे
पसायदानच कवी मित्रानो
रसिकांसाठी मांडत आहे

अरविंद
4/8/21

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =