You are currently viewing गूज अंतरीचे

गूज अंतरीचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या श्रीम.सायली कुलकर्णी यांच्या “गुज अंतरीचे” या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रो.डॉ.प्रवीण उर्फ जी आर जोशी यांनी केलेलं समीक्षण*

प्रथम काव्य केव्हा निर्माण झाले असेल बर !
अगदी वाल्मिकी ऋषी पासुन ते आजपर्यंत विविध रुपात काव्य सरीतेचा प्रवाह , आजतागायत चालुच आहे . संत पंत तंत पासुन ते आजपर्यंत अखंड काव्य यज्ञ चालु आहे.
भावभावनेच उत्कट रूप शब्दात व भाषेत मांडणी करणं म्हणजेच साहीत्य . अश्रु हे भावनेचे सगुण उत्कट रूप ! मग ते अश्रु आनंदी असो वा दुःखी
. अस जरी असले तरी भावनेची प्रचीती ही शब्दात विशिष्ट आकृती बंधात साकारली की काव्य होत .
तसच कवियत्री सौ सायली कुलकर्णी यांच्या बद्दल म्हणावे अस वाटते .
त्यांनी पण ह्या साहीत्य यज्ञात आपल्या काव्य समिधा अर्पित केल्या . हो त्या उस्फुर्त पणे .अचूक उस्फूर्तता हाच गुण त्या जपत त्या साहीत्य क्षेत्रात पदार्पण केले ते त्यांच्या पहिल्या वाहिल्या काव्य संग्रहाने !
“गूज अंतरीचे ”

त्यांचं साहीत्य क्षेत्रात दमदार पाऊलं उमटलं आहे ते कोरोना लॉक डाऊन मुळे ! कोरोनाचे दैवी संकेत पण असे अगम्य आहेत !
गूज अंतरीचे बद्दल बोलायचे झाल्यास ! त्यांच्या अंतरात समुद्र मंथन असल्याचेच दिसते ! त्यांच्या सागरातील प्रतिभांच्या लाटा अनेक विधी भावोत्कट विषय घेऊन अंतरीचे मंथन करून
त्यांनी 51 काव्य रत्नाची
रसिकांना भेट दिली आहे .

“जीवन सुंदर आहे
” ह्या कवितेत म्हणतात

जीवन म्हणजे ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ
किती उन पडलं तरी पाऊस हा नक्की येतो
थकल्या भागल्या जीवांना नवसंजीवनी देऊन जातो

जीवन सुंदर आहे गड्या निखळ जगता आलं पाहिजे
आनंदाचे चार क्षण वेचता आले पाहिजेत
जीवनाला त्यांनी सकारात्मकतेचा भाव ठेवला आहे , जीवन जगण्यासाठी ची असोशी पण त्यांनी दाखवली आहे
जीवनात चढ उतार हा येणारच असे सांगताना म्हणतात

जीवन साप शिडीचा खेळ
आपण खेळत जायचं
शिडी आली वर जायचं सापाला ही तयार राहायचं

जीवनाकडे बघण्याचा कवियत्रीचा दृष्टिकोन च किती उच्च विचारांचा आहे
नकारात्मक भावना टाळून
फक्त प्रयत्न वादी राहण्याचा
सल्ला त्या देतात .
“नवी पहाट ”
ह्या काव्यात पण हाच विचार मांडताना म्हणतात

नको होऊस निराश सखये
थोडा धीर धर
पानगळ झाली तरी पुन्हा
येतोच ना ग बहर

असा श्रध्दा आणि सबुरीचा
विचारातून त्यांचा जीवनाबद्दल ची असोशी च तर दिसुन येते .

“इवले कोवळे बीज सखे
लगेच कुठे रुजते
कवच धरेचे भेदल्याविना
का ते धरतीवर अवतरते ”

निसर्गनियम कसे असतात त्या प्रतिमा चा वापर करून
त्यांनी सखीला धीरच दिला आहे . पुढे त्या “मन “ह्या काव्यात म्हणतात

शांत निळ्या आभाळात
कसे दाटते काळे मेघ
उन कोवळे असतानाही
का धरणीला पडते भेग
असा निसर्गाचा प्रश्न ही त्या विचारतात.
एवढंच नाहीतर शुद्ध प्रांजळ पणा हा गुण कवयित्री च्या अंगी ठासून भरलेला दिसतो

साफ सफाई
ह्या काव्यात त्या चक्क मनाची साफ सफाई करण्यात मश्गुल होतात

मी ठरवलं एकदा आपलं मन आवरायला घ्यायचं
साचलेली जळमटे काढून
मन स्वच्छ लक्ख करायचं

घराची सफाई आपण नेहमी करतोच पण ,ह्या मनाची सफाई करताना षड्रिपुना त्यांनी मनातुन निवृत्त केलं

एक अध्यात्मिक बोध सरळ सरळ ह्या काव्यतुन प्रगट केला आहे !
कर्म विपाक विचार मांडताना त्या आपल्या
“भोग ” कवितेत म्हणतात , भोग हे भोगुन दूर करायचे असतात .वाट्याला आलेलं भोग गिळायचे असतात

सांगा बर देवाला भोग काही चुकला का ?
देव असुन रामाला वनवास सांगा टळला का ?
असा खडा सवाल सुद्धा करतात .
कवीयत्रीच्या स्त्री सुलभ भावना या त्यांच्या आईची माया , येसी एकदा भेटाया , बाप ,डोंबारी इत्यादी काव्यात स्त्री सुलभ जाणिवाच दिसुन येतात .
जीवन प्रवासातील मिळालेले अनुभव, निरीक्षण शक्ती , चिंतन मनन , वाचन, वेदना सल स्त्री प्रपंच जबाबदारीचा परिपाक म्हणजेच त्यांचा हा काव्य संग्रह होय .
गूज अंतरीचे न राहता ते सर्व समावेशक होतात हेच काव्य प्रतिभेच द्योतक व यश आहे . साध्या सोप्या रसाळ भाषेत काव्य लेखनाची हातोटी , म्हणुन त्याची प्रासादीकता आणखी भावते रुचते .मनात रुंजी घालते .

फळे लगडावी मधु
यावा बहर फुलांचा
जावा परिमळ दुर
माझ्या काव्य सुमनांचा

पानगळ ती न व्हावी
नित्य वसंत फुलवा
माझा काव्य वृक्ष सदा
बारा माही बहरावा

अशी दुर्दम्य इच्छा शक्ती घेऊन येणाऱ्या कवियत्री, “सायली कुलकर्णी “याना उदंड आयुष्य लाभो . त्यांची काव्य प्रतिभा शारदीय प्रांगणात उत्तरोत्तर
बहरो ,अशी प्रार्थना करून
मी तुमची रजा घेत आहे .

आपला विनीत –

प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी ( मधु संचय )
अंकली / बेळगांव
कर्नाटक .

काव्य संग्रह –
गूज अंतरीचे
पृष्ठे – 100

कवियत्री – सायली कुलकर्णी बडोदा

प्रकाशक– शॉपीझेन इन

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + nineteen =