You are currently viewing पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात फुले दांपत्य दीपस्तंभ : सुनील नारकर

पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात फुले दांपत्य दीपस्तंभ : सुनील नारकर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , क्रांतिसूर्य जोतिबा फुले पुरस्कार प्रदान

कणकवली

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्यामुळे नवा समाज घडला. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य महान आहे. केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात फुले दांपत्य हे दीपस्तंभ आहेत.

त्यांचा आदर्श घेऊन आजच्या पिढीतील शिक्षकांनी मुलांना सिंहासारखे जगायला शिकवले पाहिजे आणि प्रत्येक संकटावर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे बळ त्यांच्यात निर्माण केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती सुनील नारकर यांनी व्यक्त केले. आविष्कार फौंडेशन इंडिया कोल्हापूर महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने राज्यातील शिक्षक शिक्षिकांचा सन्मान सोहळा गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

हे पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि स्पर्शिका बिल्डर्स अँड डेव्हपर्ल्सचे चेअरमन सुनिल नारकर यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आले. यावेळी माजी वायुसैनिक एम. डी. देसाई, आविष्कारचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप परटवलकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर यांच्यासह सुनिल पाटील, सुजाता जांबोटकर, प्रमोद उपाध्याय, सतिश मुणगेकर, राज्य महिला संघटक सुचेता कलाजे, कोल्हापूर जिल्हा महिला संघटक जयश्री पाटील सह रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षणक्षेत्रातील गुणवंत शिक्षकांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य जोतिबा फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 10 =