You are currently viewing जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल

जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल

मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार

:- मधुकर भावे

ऑगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझ दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालण असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, एम.आर.आय झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखण थांबेना. वेदना असह्य झाल्यावर आणि दुखण बर होत नाही अस जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॅपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे?.. काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री. किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री. अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझ दुखण पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी दहा मिनीटाची त्यांची जादू. करुन तर बघा…. चार डॉक्टर झाले होते, चार प्रयोग झाले होते. पाचवा प्रयोग करु या, असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ. मृदूला (एम.एस. एफ.आर.सी.एस) हीसुध्दा होती. विमानात बसताना पायंड्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअरवरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली…. पुढे काय होणार माहित नव्हते. ४० मिनीटात

डॉ. पराशर यांच्या ‘आॅस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदु, ज्येष्ठ चिरंजीव डॉ. गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ.महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाचवाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात, ज्या रुग्णांना कमरेला विळखा घालून उचलून आणलेले असते… अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळपास रडत रडतच येतात आणि १० मिनीटाच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात, ते सर्व मी बघत होतो. डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले ‘आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।…’ मी ऐकत होतो. पाचवा प्रयोग आहे असच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करुन कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते… मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या पाच मिनीटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या पाच मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, ‘चलो उठो…. आप खुद चल के जा सकते हो।’… मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालयं मलाच समजेना आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला.  नियती काय घडवतं असते. त्याचा अनुभव करत होतो.  डॉक्टरसाहेबांजवळ येऊन बसलो…. कैसा महसूस कर रहे हो।… त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, ‘विश्वास बसत नाही असं काही तरी घडलं आहे. पुराणामध्ये एक कथा आहे की, भगवान श्रीकृष्णांन एका करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला होता… मोठी रोचक कथा आहे. त्याचे मित्र असलेले पेंदे काठ्या टेकून उभे होते, पर्वत उचलला होता श्रीकृष्णाच्या करंगळीवर , ते बघायला कुणीच गेल नाही. पण माझ्या समोरच्या डॉक्टरांनी हाताच्या दोन अंगठयांवर हजारो रुग्णांची व्यथा आणि पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठयाची कमाल आहे. सेवेची आणि ‘आॅस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे.

डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोटºया एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे कोणकोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं… सगळ वाचून थक्क झाले. या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टÑपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टÑपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव…. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख््यमंत्रीु अर्जुनसिंग चक्क सहा दिवस दाखलच झाले होते. या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८ ते  संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेहºयावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/-….

आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली, सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली, ५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात आणि नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या. मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं?..

‘मुकेशभाई, आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेलसे भी उपर के लेवलका होगा, जाहीर है की ऐसे संस्थानमे मै गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मै विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी, जहा, गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थ केअर सेंटर मे  मेरी विद्या किस काम की?….’

डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा आणि सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो.

सहा दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे दोन अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की,….

‘डॉक्टरसाहब, आपका तहे दिलसे ऋणी हू। आज मुंबई जा रहा हू। जोधपूर के दोन अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्ट मे बजानेकी मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा….’

मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्टभर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या दोन-तीन ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे. नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + eleven =