You are currently viewing “कोरोना से डरोना”
सोनल सुरेश खानोलकर, संवाद मिडिया, मुंबई.

“कोरोना से डरोना”

♦कधीकाळी आणीबाणीची ही दहशत आम्हाला वाटत होती त्याहीपेक्षा कोरोनाची दहशत फारच प्रचंड असल्याचं मत साठीला पोहोचलेली माणसं व्यक्त करतात तेव्हा ही कोरोनाची दहशत का निर्माण झाली ? आणि ती अवघं भारतीय नभ-मंडळ व्यापून का राहिले ? याचा खोलवर जाऊन विचार करावासा वाटतो.
♦आणीबाणी 1975 साली जाहीर केली गेली होती त्यावेळी फक्त प्रिंट मिडिया अस्तित्वात होता. इतर प्रसारमाध्यमां पैकी आकाशवाणी तर सरकारच्या मालकीची होती. दूरदर्शनचा आजच्या इतका प्रसार झाला नव्हता. लोकं पोटाला चिमटा घेऊन तीन-चार वर्षे पैसे साठवून टीव्ही सेट विकत घ्यायचे. खाजगी मनोरंजन अथवा वृत्तवाहिन्यांचे अस्तित्वच नव्हते. सोशल मीडिया हा प्रकार तर रांगण्या इतकाही नव्हता, पाळण्यातही नव्हता. प्रिंट मीडियावर सेन्सॉरशिप होती आणि काही लढाऊ बाण्याच्या संपादकांनी तर अग्रलेखाची जागा कोरी सोडायला सुरुवात केली होती.
♦आज सोशल मीडिया आहे आणि टीआरपी ला हपापलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाही आहे त्यामुळे करोनाची दहशत अधिक टिपेला पोहोचली आणि ती वाढवण्यात या दोन्ही दोन्ही प्रसाराच्या माध्यमाने आपला कमाल वाटा उचलला. सोशल मीडियाच्या प्रेमींचा एक खाक्या आहे. दिसली, आवडली एखादी पोस्ट की शेअर केली. तो खाक्या कोरोनाची दहशत प्रबळ करण्यास कारणीभूत ठरला. पोस्ट कोणी टाकलीय, त्याचा अभ्यास तो काय, तो वैद्यकीय परिभाषेच्या कोणत्या सदरात मोडतो? याचा बिलकुल काथ्याकूट न करता पोस्ट शेयर केल्या गेल्या आणि त्या भयानं वाचणारा घामाघूम होत गेला.
♦या अशा पोस्ट वाचून भाबडी माणसं घाबरली. त्यातून हा आजार चीनमध्ये सुरू झाला आणि मग तो पाश्च्यात देशात चीनमधून आलेल्यां कडून आणि चीन पाहून परतलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून फैलावत गेल्याची माहिती उजेडात आल्यानंतर अवघ्या जगातील लोकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. अवघ्या तीन वर्षांपूर्वी चीनचे अध्यक्ष जिन पिंग यांनी चीनच्या लष्करी सामर्थ्याबद्दल अत्यंत गौरवास्पद उद्गार काढले होते. चीन युद्ध लढेल ते जिंकण्यासाठीच असे आश्वासन त्यांनी चिनी जनतेला दिले होते. त्यामुळे हा चीनकडून दगाफटका असावा, असा संशय अनेकांच्या मनात बळावला.
♦चीनच्या शस्त्रकोठारात अनेक रासायनिक शस्त्रे आहेत त्यांची जंतूयुद्धाचीही सज्जता असल्याचे वृत्त होतेच. त्यातच कम्युनिस्टांच्या राज्यपद्धतीनुसार कोरोनाची लागण चीनमधूनच आणि त्यावरील योजलेले उपाय हे अगदी पोलादी पडद्याआडच राहिले. सहाजिकच जेव्हा हा आजार आणि त्याचे जंतू चीन मधूनच आल्याचे उघड झाल्यावर अनेकांनी आपापले सिद्धांत मांडले.
♦चीनने जंतूयुद्धाची ही चाचणीच घेतल्याचा त्याचवेळी एका इंग्रजी पुस्तकाच्या उल्लेख करून दिला गेला. त्याच वेळी आर्थिकदृष्ट्या दलदलीत जाणाऱ्या चिननं आपली लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी हा उपाय शोधला असा साधारण तर्कही काढला गेला. ज्याला काहीच आधार नव्हता.
♦रशियात चेर्नोबिल कांड झाले त्यावेळी जगापासून पोलादी पडद्याआड ही स्थिती लपवून ठेवली होती. ज्यावेळी गोष्ट उघड झाली तेव्हा अणुभट्टी ची ही आग विझवण्यास अवघ्या जगात मदत केली.
♦अगदी अलीकडेच टाटा हॉस्पिटल कडून एक चांगली पोस्ट पाठवण्यात आली पण त्याआधी वेगवेगळ्या वाचा वीरांनी कोरोना कसा अजिंक्य आहे ते जनमानसात पूर्णपणे भिनवले होते. एवढ्या असाध्य रोगा समोर टिकाव कसा लागणार ? म्हणून भयभीत जीव मुठीत घेऊन आपण वावरत होतो.
♦वस्तुतः आपल्याकडे तुरटी हा औषधी प्रकार आहे. सूज आली ,घसा खवखवू लागला तर कोमट पाण्यात तुरटी घालून त्याच्या गुळण्या केल्या तर साधारण संसर्ग दूर होतो. प्रामाणिक लोकांनी हा उपाय सुचवलाही पण त्याचा सूर अतिरेकी मीडियात ऑपरेटिव्हजनी टाकलेल्या पोस्टसमोर पिचला गेला.
टाटा हॉस्पिटलकडून दिल्या गेलेल्या सूचना बारकाईने तपासल्या तर ” कोरोना हे डरोना” असंच मान्य होईल. कोरोना व्हायरस जड असल्यानं त्यांचा हवेद्वारे संसर्ग होत नाही. तो कोरोना बाधित व्यक्तींच्या श्वासंमार्गानंच पसरू शकतो पण वारंवार हात स्वच्छ धुणे साबणाने (सॅनीटायझर असायलाच हवा असं नाही.), गर्दीत वावरताना नाक- तोंड झाकून घेणे, (काळया बाजाराने विकला जाणारा मास्क पाहिजे असं नाही.), तुरटीने गुळण्या करणे आधी सोपस्कार पाळले तर कोरोनाचा त्रास होणे टाळता येईल .
♦महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी पातळीवर जे उपाय भारतात अवलंबिले गेले त्याची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली व वाखाणले गेले त्यामुळे जनसामान्य भयभीत झाले असले तरी सरकारकडून कोरोनाला अटकाव होण्यासाठी आवश्यक ते उपाय अवलंबिले जात आहेत…
अशा संकटात. गरज असते ती जनसामान्यांच्या लोकशिक्षणाचीं.सोशल मीडियावरून लोकांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी लोकशिक्षणाची आत्यंतिक गरज होती . कोरोनाचा संसर्ग वर्तमामानपत्राद्वारे,दुधाच्या पिशव्यंद्वारे होऊ शकतो,असं भय सोशल मीडियावरील आरंभशूरांनी पसरविले.
साहजिकच अनेक ठिकाणी दूधवाल्यांना, वर्तमानपत्रवाल्यांना प्रवेशबंदी जारी झाली. कोरोनाचा संसर्ग श्वासातून होतो याकडे जनसामान्यांचा कानाडोळा झाला.
♦कोरोना एकीकडे धाय मोकलून ‘रोना’ आणत असताना जनसामान्यांना दिलासा देण्याची गरज होती .बुधवारी रात्री महाराष्र्टाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही गरज पूर्ण कैली. लोकांशी केलेल्या हितगुजातून, कोरोनाचा महाप्रचंड प्रसार झालाय आणि म्हणूनच सरकारकडून आणीबाणीचे उपाय योजत असल्याचा भ्रम दूर झाला. कोरोनापाससून बचाव व्हावा म्हणून प्रतिबंधात्मक उपाय सरकार योजत असल्याची ग्वाही जनसामान्यांना मिळाली.
♦त्यामुळे शर्थीनं धडपड करून सोशल मीडियावरील निर्माण केलेलंनकारात्मक वातावरण निवळू लागलं आणि सकारातमकता निर्माण झाली त्यामुळे आता निर्लेप मनानं आपल्याला म्हणता येईल *’कोरोना से डरो ना!’*

*सोनल सुरेश खानोलकर*
संवाद मिडिया, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + six =