*चांगला माणूस बनण्यासाठी चांगले साहित्य वाचा-
विलास कुवळेकर
वाचन संस्कृती जपताना
या विषयावर मार्गदर्शन
वैभववाडी
वाचन संस्कृती माणसाला आणि समाजाला समृध्द बनविते. परंतु वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. एक चांगला माणूस बनण्यासाठी निवडक चांगले साहित्य वाचले पाहिजे असे प्रतिपादन ॲड. ज्येष्ठ कवी, साहित्यिक विलास कुवळेकर यांनी वैभववाडी येथे केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार दि.१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती व गुरूपौर्णिमा असा संयुक्तिक कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के आर.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी श्री. विलास कुवळेकर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर लांजाचे उद्योजक योगेश सरपोतदार, इतिहास विभाग प्रा.सुरेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.राहुल भोसले उपस्थित होते.
यावेळी कुवळेकर “वाचन संस्कृती जपताना” या विषयावर बोलताना म्हणाले की,
आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मधील चांगल्या गुणांची जोपासना करण्यासाठी जे चांगलं आहे ते आत्मसात करावे. त्याला वाचनाची जोड द्यावी. वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. वेगवेगळे विचार मूल्य आपल्याला समजून घेता येतात. म्हणून वाचन हे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी वेगवेगळी पुस्तके आवर्जून वाचावीत असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले.
उद्योजक योगेश सरपोतदार यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच ग्रंथालयाचा वापर केला पाहिजे.
ग्रंथ हेच गुरु आहेत. वाचाल तर वाचाल ही म्हण कायम लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहिजे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश पाटील यांनी केले तर आभार डॉ.राहुल भोसले यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले.
