स्मार्ट ग्राम योजनेच्या नियोजन बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासावर भर
पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, डिजिटल सेवा व शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन; लोकसहभागातून स्मार्ट ग्राम उभारणीचा निर्धार
वैभववाडी
स्मार्ट ग्राम योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आयोजित नियोजन बैठकीत गावाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रसाद देवधर, गटविकास अधिकारी वाघ, विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी, गावातील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, डिजिटल सेवा, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावाच्या गरजांनुसार विकासकामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून लोकसहभागातून स्मार्ट ग्राम उभारण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. गावाच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
