शनिवार दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अमरावतीला सिकची रिसॉर्ट मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन व आयएएस विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोहाचे अध्यक्ष
सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर: अष्टपैलू कर्तृत्व
=============
प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हटला की साधारणपणे आपल्यासमोर फाईल्स, नियम, कडक शिस्त आणि सरकारी चौकटीत काम करणारी एक गंभीर व्यक्ती उभी राहते. परंतु, हे सर्व ठोकताळे आणि चौकटी मोडून, प्रशासनात संवेदनशील माणूस जपणारे आणि त्याच वेळी कला, संगीत, समाजकारण व चित्रपट सृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे नाव म्हणजे सनदी अधिकारी व अमरावती जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. पुरूषोत्तम भापकर हे होय.एक कर्तव्यदक्ष अधिकारी, संवेदनशील कवी-गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि समाजसुधारक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा एक विशेष लेख आहे.
डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आपल्या दीर्घ प्रशासकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या व आव्हानात्मक पदांवर काम केले. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच शिक्षण संचालक आणि महानगरपालिका आयुक्त अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत कौशल्याने लीलया पेलल्या. केवळ वातानुकूलित केबिनमध्ये न बसता थेट जनतेच्या दारात जाऊन समस्या सोडवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला. ‘प्रशासन लोकाभिमुख झाले पाहिजे’ हा त्यांचा ध्यास होता. शिक्षण विभागात कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शिक्षकांच्या सक्षमीकरणावर विशेष काम केले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विविध शहरांचे आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी राबवलेली स्वच्छता अभियाने आणि लोकसहभागातून केलेले विकासकाम आजही मैलाचा दगड मानले जातात. अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ‘संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान’ यशस्वी रित्या राबविले, त्याची दखल खुद्द शासनालाही घ्यावी लागली.
प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच डॉ. भापकर यांनी समाजातील वंचित, शोषित आणि गरिबांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. पूर असो, दुष्काळ असो वा कोरोना महामारीचे अभूतपूर्व संकट, डॉ. भापकर नेहमीच ‘ग्राउंड झिरो’वर प्रत्यक्ष काम करताना दिसले. शासकीय योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले. निवृत्तीनंतरही त्यांचे हे सामाजिक कार्य थांबलेले नाही; ते आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील शेकडो तरुणांना ‘मिशन आय ए एस अमरावती’च्या माध्यमातून विनामूल्य मार्गदर्शन करत आहेत. समाज प्रबोधनासाठी ते नेहमीच विविध व्याख्याने आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय असतात. नेमक्या याच वैचारिक व मार्गदर्शक भूमिकेतून, येणाऱ्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे होऊ घातलेल्या ‘स्पर्धा साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद डॉ. पुरुषोत्तम भापकर भूषवणार आहेत, ही संपूर्ण अमरावतीकरांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत सुंदर आणि हळवा कोपरा म्हणजे त्यांचे संगीतप्रेम. ते केवळ संगीताचे रसिक नाहीत, तर एक उत्तम गीतकार आणि संगीतकारही आहेत. त्यांनी अनेक भक्तीगीते, भावगीते आणि सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गाण्यांची रचना केली आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये मातीचा सुगंध आणि मानवी भावनांचे अचूक प्रतिबिंब उमटलेले दिसते. कलेच्या या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित गायकांना आणि संगीतकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. प्रशासकीय तणावातून मुक्त होऊन कलेचा आस्वाद कसा घ्यावा, याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत.
कला क्षेत्रावरील याच निस्सीम प्रेमापोटी त्यांनी चित्रपट सृष्टीतही आपले भाग्य आजमावले आणि तिथेही मोठे यश संपादन केले. त्यांनी काही चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून आपल्यातील अभिनेत्याची चुणूक दाखवली. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली आणि त्यांना नेहमीच पाठबळ दिले. त्यांच्या कलाकृतींमधून शेतकरी, कष्टकरी आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नांना नेहमीच वाचा फोडलेली दिसते.
थोडक्यात सांगायचे तर, डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे पाहिल्यावर ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाईल माझे, त्या त्या ठिकाणी हे कार्य तुझे’ या उक्तीची प्रकर्षाने आठवण होते. नोकरीत सर्वोच्च पदावर असताना त्यांनी कधीही लाल दिव्याच्या गाडीचा अहंकार बाळगला नाही आणि निवृत्तीनंतरही ते विश्रांती न घेता सातत्याने लोकसेवेत कार्यरत आहेत. प्रशासकीय कौशल्यासोबतच लेखणी, सूर आणि अभिनय यांची अप्रतिम सांगड घालत त्यांनी आपले आयुष्य समृद्ध केले आहे. आजच्या पिढीतील तरुणांसाठी आणि विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पुरुषोत्तम भापकर हे एक चालते-बोलते विद्यापीठ आणि आदर्श प्रेरणास्थान आहेत. अशा या महामेरूला आगामी स्पर्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आणि यशस्वी आयोजनासाठी आणि त्यांच्या भावी सामाजिक, सांस्कृतिक व कला प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
=============
रवींद्र दांडगे
जनसंपर्क अधिकारी,
मिशन आय ए एस, अमरावती.
