You are currently viewing सूरांचा वसंत हरपला..

सूरांचा वसंत हरपला..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सूरांचा वसंत हरपला..*

 

आशाताईंच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने कवीवर्य सुरेश भटांनी त्यांच्यासाठी एक कविता पाठवली होती. शब्द असे होते.

आता न तुझे कुठल्याही जखमांशी

देणे घेणे

पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा

बरसत राहो

हा कंठ तुझा अलबेला हा रंग तुझा मतवाला

तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम

चमकत राहो

तू सरगम सुखदुःखाचा जपलास कसा उमजेना

हा कैफ तुझा माझ्या धमन्यातून उसळत राहो

 

खरं आहे. आज देहाने त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सूरातला तो सळसळता कैफ मात्र चिरंतन, अविनाशी राहणार.

 

काल त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मन प्रचंड सैरभैर झालं. मनात आलं, लता आणि आशा नाहीत अशा जगात आता आपल्याला जगण्याची सवय करावी लागणार. चार वर्षांपूर्वी लतादीदींचे निधन झाले आणि त्याच वाटेने आता आशाताई रसिकांच्या मनावर एक पोरकेपणाची भावना ठेवून निघून गेल्या.

भारतीय सुगम संगीत क्षेत्रातल्या एका सुस्वर युगाचा अंत झाला. लता म्हणजे भगवंताची बासरी तर अशा म्हणजे राधेच्या मनातल्या कृष्णाचा सूर होता.

 

चाळिशीच्या दशकात चित्रपट बोलू लागला आणि गाऊही लागला. त्याच सुमारास लता आणि आशा नावाची संगीताच्या नभांगणात नक्षत्रे उगवली. दत्ता डावजेकरांचे संगीत असलेले ‘माझा बाळ’ या चित्रपटात,

*चला चला नव बाळा* हे गीत आशाताईंनी गायले आणि इथून पुढे सूरांच्या दुनियेत जे घडले तो चमत्कारच म्हणावा लागेल. नंतरच्या पिढ्यांसाठी संगीतातले महत्त्वाचे ब्रँड त्यांनी अधोरेखित केले. आजही संगीताच्या रिअॅलिटी शोमध्ये प्रामुख्याने आशा, लता, रफी, मुकेश, किशोर कुमार यांचीच गाणी नव्या पिढ्यांकडून गायली जातात. कित्येक गायक झालेत, होतीलही पण या सूरांचं अलौकिकत्व, तो करिष्मा केवळ अजोड आहे.

 

आशाताईंच्या गाण्याचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या गळ्याला पेलवत नाही किंवा बसत नाही अशी कुठलीच स्वररचना नाही. त्यांचा कंठ खऱ्या अर्थाने अष्टपैलू. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे पल्लेदार सूरही सहजपणे त्यांच्या गळ्यातून उतरले. “शूरा मी वंदिले.” किंवा मर्मबंधातली ठेव ही” सारखी नाट्यगीते म्हणजेच एक वस्तुपाठ आहे. हिंदुस्थानी गायकीचे थाट, रंग त्यातून उलगडले. त्याच गळ्यातून अवखळ, उडती, मदमस्त शृंगारिक गाण्यांची बरसात झाली. अनवट गझला त्यांनी गायल्या. त्यांच्या गळ्यात फक्त सात स्वरच नव्हते तर सात ऋतूंचाच मुक्काम होता जणू काही. असा प्रवाही गळा म्हणजे केवळ भगवंतांचेच देणे म्हणावे लागेल.

 

मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही असे म्हणतात पण लतादीदीच्या वटवृक्षासमान सावलीत आशाताईंच्या स्वरवेलींचा मांडवही जोमाने बहरत गेला आणि सर्व प्रकारच्या मानमरातबाने आणि किताबाने त्यांची जोडी भरून गेली. *स्वरसम्राज्ञी आशा भोसले* अशी स्वतंत्र ओळख त्यांनी मिळवली. गाणे कुठलेही असो,

“ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख”

किंवा

“छोड दो आँचल चल जमाना क्या कहेगा”

किंवा अगदी अलीकडचं,

“ सपने मे मिलता है मुंडा मेरा सपने में मिलता है “

शब्द, भाव आणि अभिनयाने भरलेलं त्यांचं गाणं ऐकणाऱ्याच्या काळजात रुतून बसतं.

 

वयाच्या नव्वदीत सुद्धा त्या भरजरी साडी आणि चमचमता रत्नहार परिधान करून मंचावर येऊन “ओ मेरे सोना रे सोना रे” गायला लागल्या की श्रोतृवर्ग अक्षरशः पागल होऊन जायचा.

 

रसिकांना त्यांनी फक्त गाणं दिले नाही तर या जन्मावर शतदा प्रेम करायलाही शिकवलं. त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या मोडक्या संसाराची लाज टाकून चित्रपट गीत क्षेत्रात एक जबरदस्त ठसा उमटवला.

 

त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष होता. टक्केटोणपे, मानापान त्यांनी सहन केले. जीवन म्हणजे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं पण त्याला त्यांनी त्यांच्या कंठात असलेल्या दैवी सुराने आणि आत्मविश्वासाने सडेतोड उत्तर दिले.

 

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “स्वतः भोगलेल्या वेदनेतूनच खरा कलाकार जन्म घेतो”

त्यांच्या असामान्यत्वातही त्यांनी एक सामान्यपण जपलं होतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या,

“आज मी तुमच्यासमोर गायिका म्हणून उभी असले तरी मी एक गृहिणी आहे, माझं मन स्वयंपाक घरात रमतं. मला माझ्या मुलांना, इतरांना! सर्वांनाच स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्वतः बनवून खाऊ घालण्यात फार आनंद वाटतो, अगदी माझ्या गाण्याइतकाच.”

 

त्यांचा व्यासपीठावरचा गप्पिष्ट, मोकळा, मी तुमच्यातलीच असा जाणवून देणारा वावर हेच सांगायचा की, वय हा एक निव्वळ आकडा आहे, त्यांनी १२००० च्या वर गाणी गायली असतील पण त्यांना मात्र त्याचे मुळीच कौतुक नव्हते. अजूनही हजारो गाणी गाण्याचा उत्साह त्यांच्यात टिकून होता हे विशेष. त्यांचा सूर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. उत्साह म्हणजे एखादा अवखळ धबधबाच. जीवनावरचे प्रेम त्यांच्या गायकीतून जाणवायचं. व्यक्त व्हायचं.

 

“भोगले जे दुःख ज्याला सुख म्हणावे लागले” ही आशाताईंनी गायलेली गझल खोल पाण्याच्या तळाशी नेते.

“जिवलगा राहिले हे दूर घर माझे

पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे..”

ही विराणी गावी तर ती फक्त आशाताईंनीच.

 

त्यांची किती गाणी आठवावीत? किती सूर साठवून ठेवावेत हृदयाच्या कप्प्यात?

 

आशाताईंच्या निधनाचे वृत्त ऐकताच मनात याच ओळी घुमल्या.

“*ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे*

” जणू काही अशाताईंच्या जाण्याचा संपूर्ण भावार्थ याच ओळीत साठलेला आहे.

 

शब्दसुरांना मरण नसते. सूरात्मा अमर असतो. पिढ्यानुपिढ्या ही संगीत सरिता अशीच झुळझुळ वाहत राहणार आणि या सूरगंगेच्या किनारी उभं राहून सारं चराचर त्यांना आदरांजली वाहत राहणार.

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा