You are currently viewing रूप मनोहर

रूप मनोहर

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*रूप मनोहर*

 

विठ्ठला ! मायबापा!.

तुझ्या लाडक्या भक्तांनी अंत:करणातुन तुला साद घातलीआणि तू त्यांचा खराच मायबाप झालास रे.

“कुठे तुझे राजस सुकूमार मदनाचा पुतळा!”हे देखणेपण. कूठे गेले?

तुझ्याच भक्तांनी वर्णन केले.होते.

द्वारकाधीश !

सोन्या रत्नांनी मढलेला. जरी पितांबर हाती सुदर्शन.

महाभारतातील अर्जुनाचा सारथी. पांडवांना ‘शस्त्र ऊचला’आदेश देणारा.देखणा भारदस्त योद्धा.

सत्यभामा, रूक्मिणी यांच्या दालनातील तुझे वैभव!

डोळ्यापूढे आहे सारे.

पण जनमानसात तू फक्त दोनच रूपात काळजात अगदी ठाण मांडुन बसला आहेस.

ही तुझी दोन रूपे फारच मनोहर आहेत.

राजस सुकूमार पेक्षाही ही आमची लेकरांची खुप जवळची आहेत.

म्हणुन आम्हा लेकरांना तू घरातला वाटतोस. अगदी जवळचा सगासोयरा वाटतोस.

मग तुला मायबापाच साद घालणार की रे!

पहिलं म्हणजे आईपासुन वेगळं केलेलं लेकरू …. नंदाघरी वाढलं… यशोदा मैय्यानी लाडकोड पुरवले. गोप गोपींनी सांभाळुन घेतले. अख्ख गोकूळच तुझ्या नादाने वेडावले. तुझ्या खोड्या… तुझ्या अधरीची बासरी.. तुझे गोधन. तुझेच गोकुळ… तो पाऊस. एका करंगळीवर तोलुन धरलेला गोवर्धन… ते कालिया मर्दन. कदंब .. आणि सर्वात आमची लेकच वाटणारी मोहक राधा. तुमचा खट्याळ प्रितीचा अविष्कार.. हे सगळे मनाच्या खोलवर कप्प्यात दडलेलं आहे.

आणि आताचे रूप हे दुसरे.

‘कानडा राजा’, ‘सावळा विठूराय’ ,’पंढरीचा मायबाप’ भक्तांचे माहेर.

भक्तांचे फार फार आवडते आहे.

तो भाळी कुंतल ऊडत असलेला मोरपीस शिरपेचात असणारा अधरी पावरी धरणारा खट्याळ श्रीकृष्ण जरी मनात असलात तरी आजचे तुमचे रूप भारी आहे.

भक्तांच्या श्रद्धेला जागुन त्यांचे दु:ख, कष्ट स्वत:वर घेता घेता , तुझे ते देखणे राजस सुकूमार रूप कधी घननीळ… सावळे.. मेघन झाले हे तुलाही कळले नाही.

तू ‘सावळा’च झालास. कानडा राजा झालास.

जनाई तुझं लेकरूं!

तिच्या श्रद्धेमुळे तू जनाईचा मायबाप झालास. ती तुला शोधते तर तू तिची कामे दळणापासुन पाणी भरण्यापर्यंत करत होतास.

संत तुकोजी तुझ्या चरणी लीन झाले. त्यांचा संसार कोण करणार? त्यांच्या बायकोसाठी तुम्ही कामाला लागलात.

तेच कबीराचे.

शेले तुम्ही पूर्ण केलेत आणि कबीर तुमच्या भजनात सारे जगच विसरला.

नाथाघरी पाणक्या होऊन … “बिच्चारा देव पाणी भरू लागला.”.. ‘महार होऊन भोजनही केले.

कान्होपात्रा, विसाजी खेचर, सावता माळी, गोरोबा कुंभार, तेली, असे किती किती?

तुमच्या शोधात निघाले.. दंग झाले. काम धाम संसार विसरले आणि तुम्ही मात्र!

त्यांना नाही विसरलात. स्वत:त्यांची कामे ऊरकत राहिलात.

अहो हे फक्त ‘ मायबाप’ च करू शकतात.

भक्तांना लेकरं मानणारे तुम्ही… हे तुमचं आजचं सामान्य जनमानसामधलं रूप फार फार आवडीचं .. विश्वासाचं आहे.

अडचण आली .. घाल मायबापाला साद. .. तो नक्की बघुन घेईल.हा विश्वास आहे भक्तजनात.

आषाढ आला कि, माहेरी जाण्यासाठी… मायबापाला भेटण्यासाठी लेकरं ऊतावीळ होतात. जे असेल नसेल त्यासह वारीत धाऊ लागतात.

पाऊस, खाणे पिणे, कपडालत्ता वाटेत चढ ऊतार दगड काटे … कशाची आठवणच होत नाही.

कधी एकदा चंद्रभागेतिरी पोंचतो इतके अधीर होतात.

तिकडे त्यांचा मायबापही त्यांना पोटाशी घ्यायला तळमळत असतो.

युगे अठ्ठावीस वीटेवरी ताटकळत आहे. कपाळी केशरचंदनाचा टिळा, सावळा, गळा तुळशी माळा, कानी मकरकुंडले, कासे पितांबर, हात कटेवरी पायी वाळे.

मायबापच तो!कशाला हवीत शस्त्र?

लेकरंच येणार भेटायला. म्हणुन कोणतेही शस्त्र हाती नाही. आणि चेहेर्यावर लेकरं भेटल्याचा…. त्यांचे क्षेमकुशल असल्याचा अपार आनंद ओसंडून वहात असतो.

गळाभेटी होतात. चरणी मस्तके झुकतात. मन शांत होते. कृपेची साऊली पाठीशी ऊभी राहुन पुन्हा पुढच्या वर्षी या!

असे सांगत निरोपाची सांगता होते

पाय संसारी माघारी परतीची वाट चालू लागतात. मन आनंदाने भरून इतके जड होते .. कि, पाय भराभर ऊचलत नाहीत. मन परत परत माघारी वळुन पाहते ते सावळे रांगडे साधे रूप हंसत निरोप देत रहाते.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी. मुं. 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा