आमचे जिवलग मित्र श्री राजेश खवले हे सध्या नागपूर विभागीय कार्यालयात अपरआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते महाज्योतीला महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. श्री खवले यांचा आतापर्यंतचा प्रवास खरोखरच युवकांना प्रेरणादायी असाच आहे. खूप संघर्ष करून या माणसाने हा पल्ला गाठला आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती ते मोर्शी रोडवरील माहुली जहागीर हे छोटेसे गाव. या गावात राहणारे राजेश खवले यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून अपर आयुक्त पर्यंतची मजल घातली आहे.
राजेश खवले जेव्हा एमपीएससी परीक्षेला बसले तेव्हा आजच्यासारखे इंटरनेट पुस्तके क्लासेस स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिका नव्हत्या. राजेश खवले सरांनी एक अभिनव पद्धत अवलंबली व त्या बळावर ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात ते माहुली जहागीर येथे कपड्याच्या दुकानांमध्ये काम करीत असायचे. माहुली जहागीरसारख्या छोट्याशा गावात गिराईक तरी किती येणार .अर्थातच बोटावर मोजण्याइतके. मग जो फावला वेळ मिळत असेल त्या वेळेचा उपयोग श्री खवले यांनी तंतोतंत करून घेतला. त्या काळात मोबाईल सीडी वगैरे प्रकार नव्हते. टेप रेकॉर्डर कॅसेट हा प्रकार होता. त्यांनी एम पी एस सी चा महत्त्वाचा अभ्यासक्रम हा कॅसेटमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवला आणि ग्राहक नसले की ते कॅसेट लावून द्यायचे. अनेक मुले आपल्या जवळच्या मोबाईलचा आपल्या जवळच्या टेप रेकॉर्डर चा गाणे ऐकण्यासाठी उपयोग करतात पण या माणसाने आपल्या जवळच्या टेप रेकॉर्डरचा उपयोग अभ्यासासाठी केला. त्यामुळे कॅसेट मधून त्यांनी अभ्यास केला.
अमरावतीला सर्वप्रथम त्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतला.गावात फारसे शैक्षणिक वातावरण नाही. आई-वडिलांनी दहावीचा टप्पा पास केलेला. आपल्या मुलाने आयटीआय व्हावे व गावात दुकान टाकावे अशी वडिलांची इचछा. आयटीआयचा कोर्स झाल्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अमरावतीच्या गाडगे नगर परिसरात श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय आहे .या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. माहुली जहागीर ते महाविद्यालय हा साधारण वीस किलोमीटरचा प्रवास आहे. त्या काळात जाण्या येण्याच्या सुविधा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या.
वीस किलोमीटर जाणे आणि वीस किलोमीटर येणे या प्रवासामध्ये देखील श्री राजेश खवले यांनी आपल्या जवळील टेप रेकॉर्डरचा उपयोग केला. मुळतः त्यांना वाचनाची अभ्यासाची आवड होती. मनात जिद्द होती. चिकाटी होती त्यामुळे ते सतत अभ्यासाच्या संपर्कात राहिले. एसटीमध्ये प्रवास करताना किंवा दुकानात फावल्या वेळामध्ये एका टेप रेकॉर्डरच्या माध्यमातून एमपीएससी चे प्रश्न उत्तरे ऐकत होते. एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार ऐकतो तेव्हा ती आपल्या स्मरणात पक्की बसते. त्यांनी संपूर्ण अभ्यास टेप रेकॉर्डर मध्ये शब्दबद्ध करून ठेवलेला होता आणि त्याच्या त्याला त्यांना खूप उपयोग झाला आज ते अपर आयुक्त म्हणून नागपूर विभागीय कार्यालयात कार्यरत आहेत.
आपण जरी उच्चपदस्थ अधिकारी झालो तरी नवीन पिढीला आपण मार्गदर्शन करीत राहिले पाहिजे यासाठी सातत्याने ते धडपडत असतात. युवकांसाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवीत असतात. स्वतः त्यांच्या बराचसा वेळ हे परिवाराला न देता स्वतःच्या अभ्यासाला देतात. हा अभ्यास करून त्यांना स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणे आवडते. त्यासाठी ठिकठिकाणी भाषणे देणे विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिणे हा देखील त्यांचा आवडता छंद आहे. स्पर्धा परीक्षेची पुस्तके त्यांनी लिहिली . प्रेरणा स्पर्धा परीक्षेची हे त्यांचे गाजलेले स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तक.पण केवळ स्पर्धा परीक्षा देऊन पैसा मिळवून माणूस सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला चांगले जीवन जगता यावे यासाठी त्यांनी आनंदी राहा यशस्वी व्हा हे पुस्तक देखील लिहून आनंदी होण्याचा मार्ग लोकांना सुखकर करून दाखवला आहे.
साहेब जेव्हा वाशिमला निवासी उपजिल्हाधिकारी होते तेव्हा त्यांनी नियोजन करून माझ्या मी आयएएस अधिकारी होणारच या कार्यक्रमाचे वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कार्यक्रम घडवून आणले आणि वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागे केले. मिशनच्या विविध उपक्रमात ते आनंदाने सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अतिशय विपरीत परिस्थितीमधून त्यांनी हे यश प्राप्त केल्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य विद्यार्थ्याला आपण मार्गदर्शन केले पाहिजे हा त्यांचा पिंड आजही कायम आहे. महा ज्योती मध्ये असताना त्यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी अनेक चांगल्या गोष्टीची निर्मिती केली आणि त्या महाज्योतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पोहोचल्या
श्री राजेश खवले हे केवळ अधिकारी म्हणून लोकप्रिय नाहीत तर एक चांगले वक्ते एक चांगले लेखक म्हणूनही त्यांच्या महाराष्ट्राच्या सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये तसेच जनमानसामध्ये नावलौकिक आहे. महात्मा फुल्यांवर त्यांनी संकलित केलेला ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक मैंलाचा दगड ठरलेला आहे. त्यांच्या डोक्यात सातत्याने नवनवीन विचार संचार करीत असतात आणि ते विचार प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी ते सातत्याने धडपड करीत असतात .
कथेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे ही अतिशय अभिनव पद्धत त्यांनी प्रारंभ केलेली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवण्यासाठी जर ते उत्तर आपण कथेमध्ये रूपांतरीत केले तर ते आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते आणि ती त्यांची पद्धत अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अमलात आणलेली आहे. हा माणूस तुम्ही भेटाल तेव्हा तुम्हाला माणूस म्हणूनच भेटेल आणि माणूस म्हणूनच वागणूक देईन. कुठेही अधिकारपणाचा आव आणणार नाही. आपण एका सज्जन सुशील शुभ प्रभावी माणसाला भेटत आहोत असेच आपल्याला वाटत राहणार.
आपण विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देऊन या पदापर्यंत पोहोचलो. परंतु इतरांनाही आपण मदतीचा हात दिला पाहिजे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते आणि म्हणून त्यांच्या बाबतीत कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या भाषेत असे म्हणावे लागेल की ते लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे मी मात्र मागे वळूनी पाहतो मागे किती जण राहिले.
असा हा माणुसकीचा झरा असलेला माणूस आज सनदी व राजपत्रित अधिकारी त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून नाव लौकिकास आलेला आहे. आजच्या पिढीला तर टेप रेकॉर्डर देखील माहित आहे की नाही याबद्दल शंका आहे. पण आपल्याला प्राप्त असलेल्या परिस्थितीमध्ये आपण उपलब्ध साधनांच्या द्वारे देखील यशाचे शिखर गाठू शकतो हा मूलमंत्र त्यांनी आपल्या कृतीतून दिलेला आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आठवणीने युट्युब वरील श्री राजेश खवले यांच्या मुलाखती ऐकाव्यात तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी नागपूर कार्यालयात जाऊन या आदर्श व्यक्तिमत्त्वाला भेटावे अशी अपेक्षा आहे.
डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003