You are currently viewing तिजोरीत झालेला आर्थिक खडखडाट भरून काढण्यासाठीच मनसेचे आंदोलन

तिजोरीत झालेला आर्थिक खडखडाट भरून काढण्यासाठीच मनसेचे आंदोलन

तिजोरीत झालेला आर्थिक खडखडाट भरून काढण्यासाठीच मनसेचे आंदोलन – बाबी जोगी

मालवण / प्रतिनिधी :-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीवावर उदार होऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कोरोना विरोधात झुंज देत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कित्येक रुग्ण सुखरुप घरी परतले आहेत. अशा स्थितीत मनसेचे आंदोलन म्हणजे मनसेच्या तिजोरीत लॉकडाऊनमुळे झालेला आर्थिक खडखडाट भरून काढण्याचा हा एक मार्ग आहे. असा गौप्यस्फोट शिवसेना मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी केला असून आर्थिक देवीघेवीपायी मनसेकडून डॉक्टरांच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बाबी जोगी यांनी केला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने केलेल्या उत्कृष्ट आरोग्यसेवेचे मुळेच जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा दरही कमी आला आहे. कणकवली, मालवण, आचरा असे अनेक शासकीय डॉकटर कोरोना विरोधात लढताना पॉझिटिव्ह आले. मालवण चे डॉक्टर श्री. पाटील यांच्याकडूनही उत्कृष्टपणे सेवा बजावण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा कोरोना हे एक आव्हान समजून त्यावर मात करण्यासाठी कसोशीने अहोरात्र मेहनत घेत आहेत. पण आतापर्यत केवळ राजकारण करणाऱ्या मनसेच्या पेड पदाधिकाऱ्यांना ह्या व्यवस्था कशा समजणार.

ज्या नारायण राणे यांनी आपले हॉस्पिटल कोविड केअर सेंटर साठी देतो असे सांगितले व नंतर घूमजाव केले अशा स्थितीतही आरोग्य यंत्रणा न डगमगता काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने आरटीपीसीआर स्वॅब टेस्ट साठी प्रयोगशाळा मंजूर करून देत मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबतही आपले प्रेम व आपुलकी दाखवली आहे. पण या सगळ्याची देणेघेणे नसलेल्या मनसेला केवळ डबे वाजवून झोळी भरण्याचे काम करायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकांच्या विरोधात मनसेने आतापर्यंत अनेकदा आवाज उठवला. मात्र त्यामागे नेमकी काय कारणे होती ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेलाही ज्ञात आहेत.
पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था अधिकाधिक सक्षम व सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा व अथक प्रयत्न चालू आहेत.

जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब, रॅपिड टेस्ट मशीन, अँटीजेन टेस्ट, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा, थर्मल गन, ऑक्सिमिटर, कोविड अम्ब्युल्सन, पीपीई किट, मास्क, बीएएमएस डॉक्टर,आदि सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या आहेत. त्यांच्या या योगदानापासून लक्ष विचलित करण्याचा मनसेचा हा प्रयत्न आहे. आतापर्यंत मनसेने केलेली आंदोलने कशासाठी होती आणि त्यातून पुढे काय निष्पन्न झाले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता जाणते सकाळी निवेदने संध्याकाळी हात मिळवणी अशा प्रकरणातून आपला जिल्ह्यातील पक्ष ( अस्तित्वात नसलेला) चालविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न मनसे करत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने दिलेल्या उत्कृष्ट आरोग्यसेवेचे मुळेच आमदार, उद्योजक, पत्रकार यांनी कोरोनावर मात केली. त्यांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासली नाही.

त्याचबरोबर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 835 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 766 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दि. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 10 हजार 17 नागरिक अन्य ठिकाणाहून दाखल झाले आहेत. त्यात रेल्वेने जिल्ह्यात 3,151 प्रवासी दाखल झाले आहेत. सद्यस्थितीत 219 सक्रीय कंटेन्मेंट झोन आहेत. अलगीकरणातील एकूण 9,284 व्यक्ती आहेत तर नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील 4,365 व्यक्ती आहेत. या सगळयाचे योग्य नियोजन जिल्हा आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र त्याबाबत मनसेला काही देणे-घेणे नाही आंदोलने करून राजकारण करून जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून पालकमंत्री , खासदार, आमदार यांना वेठीस धरण्याच्या मनसेच्या या प्रकाराला जनता भीक घालणार नाही. असे बाबी जोगी यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =