You are currently viewing एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये – नितीन चंदनशिवे

एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये – नितीन चंदनशिवे

एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये – नितीन चंदनशिवे

मालवण पालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात…

मालवण

एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये आणि त्यासाठी लढले पाहिजे, पुन्हा उभे राहिले पाहिजे असा मंत्र कवी नितीन चंदनशिवे यांनी आज येथे दिला.

येथील पालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सांगली येथील दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, कृषी विभागाच्या अधिकारी जयश्री दूधभाते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संध्या लोखंडे, सुरेखा खैरनार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

श्री. चंदनशिवे म्हणाले, कविता हे आपले अस्तित्व आहे आणि आपल्या विवाहानंतर ते अस्तित्व डोळसपणे खुलवण्यात पत्नीचे योगदान मोठे राहिले आहे. ज्ञान हा मानवाचा पहिला डोळा असावा व तो सदैव उघडा असावा हे ठामपणे बजावत आपल्याला पत्नी खंबीर साथ देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना वंदन करताना त्यांची कणखरता आत्मसात करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे स्पष्ट केले. त्यानंतर स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून उपस्थितांना महिला दिनाच्या उद्देशांची महती समजावत शुभेच्छा दिल्या.

श्री. जिरगे म्हणाले, जागतिक महिला दिन समस्त मानव जातीची चळवळ आहे. महिलांचे सक्षमीकरण ही महत्त्वाची बाब असून सर्वांनीच त्यासाठी जबाबदारी पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

कार्यक्रमात मालवण पालिकेच्या वतीने मान्यवरांना मालवण व्हिजन या स्मरणिकेची प्रत भेट देण्यात आली. कार्यक्रमास मालवणातील महिला बचत गटांच्या सदस्या, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संध्या गवळी यांनी केले. खेमराज सावंत यांनी आभार मानले. पालिकेच्या वतीने उपस्थित महीलांना भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सदिच्छा सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा