You are currently viewing कल्हईवाला

कल्हईवाला

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाचे ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*कल्हईवाला..*

 

नाशिक मुक्कामातील गोष्ट आहे . एके दिवशी खूप दिवसांनी कल्हईवाला चाचा आमच्या घराजवळून चालला होता. एक जुनी पुराणी सायकल, त्यावर टांगलेली एक जाड ताडपत्री पिशवी आणि अंगात साधा पायजमा आणि सदरा असा त्याचा वेष होता. आणि ए कलाई … ही आरोळी .

खूप दिवसांनी कल्हईवाला दिसल्याने माझ्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या.

जास्त जुने नाही पण साधारण चाळीस -पन्नास वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात तांब्या पितळेची भांडी आपण वापरायचो. वापरून वापरून आतला मुलामा झिजल्याने किंवा अगदीच न वापरल्यामुळे त्यावर एक प्रकारचा गंज चढायचा. अशा वेळी अधूनमधून भांड्याना कल्हई करून घेणे आवश्यक असायचे. त्याशिवाय त्यात भाज्या, अन्नपदार्थ शिजवता यायचे नाहीत.

माझ्या दारावरून जाणाऱ्या त्या कल्हईवाल्या चाचाला मी थांबवले. सौ. ला म्हटलं आपल्याकडे जुनी पितळेची भांडी आहेत. आपण त्यांना कल्हई करून घेऊ या का ? कधी कधी माझ्या एखाद्या प्रस्तावाला ती चटकन होकार देत ही असे ….! तसे यावेळी झाले. चाचांशी बरीच वादावादी करून सौ. ने एकेका भांड्याची मजुरी एकदाची निश्चीत केली .फक्त अडगळीत ठेवलेली भांडी काढून देण्याचे (जिकीरीचे )काम माझ्यावर आले. ती चार लहानमोठी पितळी भांडी मी घामाघूम होइस्तो बाहेर काढली , त्यात लहान मोठे पातेली आणि एक पितळेचा टोप मिळाला . बरेच दिवस वापरात नसल्यामुळे ती खराब झाली होती. आतील मुलामा निघून गेला होता.

कल्हईवाल्याने आपल्या हातपंख्याच्या भट्टीची नळी जमिनीत एक छोटासा खड्डा करून रोवली. त्याच्याजवळ असलेले थोडेसे कोळसे त्या खड्ड्यात टाकले. हातपंख्याची दांडी तो गरगर फिरवू लागला. एक गमतीदार विचित्र आवाज करत त्या कोळशांनी चांगलाच पेट घेतला. लाल निखारे दिसू लागले. कल्हईवाल्याने मग एक भांडे घेतले आणि त्या विस्तवावर ठेवले. ते चांगले तापल्यावर त्याच्या जवळ असलेल्या पुडीतून नवसागराचा बारीक केलेला भुगा घेऊन त्या भांड्यात टाकला. आता खूपच धूर सुटला. ते भांडे चिमट्याने धरून त्याच्याजवळ असलेल्या फडक्याने त्याने पुसून घेतले आणि त्याच्याजवळ असलेल्या कथिलाच्या पट्टीने त्या भांड्यात एकदोन रेषा ओढल्या. हे सगळे करताना एक वेगळाच वास सुटला होता. पुन्हा त्याने ते भांडे पुसले. तो , जणू जादू झाली! आतापर्यंत एकदम काळवंडलेले दिसणारे ते भांडे जणू चांदीचा मुलामा दिल्यासारखे चकचकीत झाले. मग त्याने जवळच भरलेल्या पाण्याच्या बादलीत ते थंड होण्यासाठी टाकले. तो होणारा चर् र् आवाज … एक आमच्यासाठी गंमतच असायची . पण त्यामुळे तो मुलामा टिकावू होणार होता. व अधिक चकाकी दिसायला लागायचा .

मला लहानपण आठवले. आम्ही गल्लीतील मुलं -मुली गल्लीतील त्या कल्हईवाल्याच्या चहुबाजुने जमा होत असुं व त्याच्या बारीक सारीक हालचाली टिपत असूं . खरं तर भांड्यांना चकचकीत करणारा तो जादुगारच वाटत असे ! आणि त्याचा तो लखलखीत करणारा ऊद्योग संपला की आम्ही काही व्रात्य (?) मुले त्या गरम राखेतून पांढरे पांढरे चकचकीत गोळे (तुकडे) जमा करण्या साठी धडपडत असू !

नेमके साल मला आठवत नाही , पण तेंव्हा पितळी दोन आणे ( बहुधा) चलनातून रद्द झाली होती . आमच्या एका मित्राने शक्कल काढून , गल्लीत आलेल्या कल्हईवाल्याकडून ते पिवळे नाणे कल्हई करून पांढरे चकचकीत करून घेतले . आता एवढे चकचकीत नाणे चालवायचे कसे , मग मातीत घासून त्याला काळपट , जुने भासेल असे बनवले . मग काय जाणून बुजून अंधार पडल्यावर कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानी निवडक मुलांनी मोर्चा वळवला व त्या मामा वाण्याला ते दोन आणे सहजगत्या खपवले ! आणि अक्षरशःमामाचा “मामा “ केला ! आणि सगळ्यांनी दोन आणे खपवून मस्त लिमलेटच्या गोळ्यांवर ताव मारला !

खरं तर तेव्हा लोक मोठ्या प्रमाणात तांब्या पितळेची भांडी वापरत असल्याने त्यांना कल्हई करावी लागायची. कल्हईवाला नियमितपणे वर्षातून तीनचार वेळा तरी यायचा. तो कल्हई करत असताना पाहत रहाणे मोठे गमतीचे असायचे. आम्ही सगळे बालगोपाळ त्याच्या भोवती कडे करून ती नवलाई बघत असायचो. खराब असलेली भांडी काही काळातच उजळून निघायची. ही किमया न्यारीच होती. पण पुढे पुढे अॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी यायला लागली . आणि तांब्या पितळेची भांडी मोडीत निघाली किंवा अडगळीत पडली. या अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या भांड्यांना कल्हईची गरज राहिली नाही. तसं काही नवीन आले की माणूस जुन्या गोष्टींना विसरूनच जातो. तसेच या भांड्यांचेही झाले. कधी कधी जुन्या चांगल्या गोष्टी आपण त्या केवळ जुन्या किंवा कालबाह्य झाल्या म्हणून टाकून देतो. पण कधी तरी कालांतराने त्याचे महत्व पटायला लागते . नाही कां? आजकाल , आरोग्यासाठी हीच भांडी अधिक चांगली होती असे जाणकार सांगायला लागलेत . येवढेच काय , तर बाजारात छान ,डौलदार रंगित मातीची भांडी सुध्दा मिळायला लागली आहेत .

आता कल्हईवाले कालानुरूप अस्तंगत होत चालले आहेत येवढं खरं . तांब्या पितळेची भांडी फारशी कोणी वापरत नसल्याने त्यांचा धंदा होत नसावा .त्यांच्या उदरनिर्वाहाचे हे साधन नाहीसे होत चालले आहे. मला त्या कल्हईवाल्याची जुनी सायकल, अंगावरचे साधे कपडे, साधे राहणीमान आणि त्याही परिस्थितीत त्याच्या चेहऱ्यावर असलेले हास्य पाहून कौतुक वाटत असे . बऱ्याचदां ,सगळे असूनही दुर्मुखलेले राहणाऱ्या, सतत कुरकुरणाऱ्या आजुबाजुच्या लोकांपेक्षा हा कल्हईवाला आहे त्या परिस्थितीत किती आनंदी भासत असे ! त्याने सांगितलेले पैसे तर मी त्याला देत असायचोच , पण त्याला ‘ चाचा , चहा घेणार का ? ‘हा प्रश्न अनपेक्षित असायचा . तो चमकून ‘ असू द्या…’ म्हणायचा .पण मी त्याला थांबवून , चहा देत असे .त्याने चहा घेतला पण त्याचा चेहरा तसा निर्विकार असायचा ! चहा मिळाला काय आणि न मिळाला काय त्याने दोन्ही गोष्टींची तयारी ठेवलेली असावी. जीवनाचे खरे तत्वज्ञान जणू तो कोळून प्यायला होता.

‘ चुडा तुझा सावित्रीचा ‘ या चित्रपटात एक सुंदर गाणं आहे. हे अर्थपूर्ण गीत ‘ लावा भांड्याला कल्हई….’ हे असून . या गीतात शेवटी कवी म्हणतो

कधी स्वप्‍नी मलाही दिसले

ओठी भिडले चांदीचे पेले

हाती कथलाचे पुसणे आले

परि त्याचे सोने झाले”थोडक्यात आपली

कष्टाची मोलाची भाकरी ,पण हक्काची खावी.

चांदीचे पेले त्याला स्वप्नात दिसत असतात. पण नशिबाने हाती कथिलाचे पुसणे, कल्हई करणे येत असते .पण तो जे काही करतो, त्याचे सोनेच झाले आहे. सोन्याचांदीच्या भांड्यातून जेवण्यापेक्षा आपल्या कशातून मिळवलेली सुखाची भाकरी त्याला प्रिय आहे… ! असो .

 

खरंच आपलं जीवनही असंच असतं नाही. जीवनातल्या समस्यांमुळे, अडचणींमुळे आपल्या मनावरचा सुंदर मुलामा कधी कधी निघून जातो. त्यालाही अशीच अधूनमधून कल्हई करणं आवश्यक असतं. घरातला केरकचरा नाही का आपण साफ करत.. तसं !परिस्थितीची भट्टी नाही तरी आपल्याला भाजतच असते. कुंभाराचे मडके सुद्धा आगीत भाजल्याशिवाय पक्के होत नाही. सोन्यालाही अग्निपरीक्षा द्यावीच लागते. सदविचारी लोकांचा संग हा नवसागर असतो. कथिलाची तार म्हणजे गुरुतत्वाचा स्पर्श असतो. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की किमया घडते. भांडे उजळून निघते. लखलखाला लागते .तांब्या पितळीला चांदीचे मोल प्राप्त होते. एक कल्हईवाला येऊन, त्याचे काम करून गेला होता. पण भांड्यांबरोबर आपल्या मनाचाही गाभारा उजळून गेला होता नाही कां !

*********************

 

अनिल देशपांडे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा