You are currently viewing अ. भा. साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा “आपुलकी पुरस्कार” कथामाला कार्यकर्ते नवनाथ भोळे कुटुंबीयांना प्रदान

अ. भा. साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा “आपुलकी पुरस्कार” कथामाला कार्यकर्ते नवनाथ भोळे कुटुंबीयांना प्रदान

मालवण :

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा “आपुलकी कौटुंबिक पुरस्कार” नवनाथ पांडुरंग भोळे कुटुंबीय मु. पो. पिंपरखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या कुटुंबाला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण जामडुल रिसॉर्ट, जामडूल येथे मान. रामचंद्र आंगणे (स्वीय सहाय्यक, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान. सुरेश ठाकूर अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मान. सुगंधा गुरव, श्री सदानंद कांबळी,पांडुरंग कोचरेकर, रामचंद्र कुबल, गुरुनाथ ताम्हणकर, सायली परब, रश्मी आंगणे, भानुदास तळगावकर, माधव गावकर, विजय चौकेकर आदि कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते.

पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त श्री नवनाथ भोळे, श्रीम.स्वाती भोळे, कु. हर्षल भोळे, कु. स्वरा भोळे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. प्रेम, सेवा, करुणा ही साने गुरुजींची त्रिसूत्रीच जीवनमूल्ये मानून नवनाथ भोळे कुटुंबीयांनी गेली १८ वर्षे मालवण कथामालेसाठी योगदान दिले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र गौरवग्रंथ व भेट वस्तू देऊन त्यांचा कथामाला कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मान. सुरेश ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण म्हणाले, नवनाथ भोळे कुटुंबीयांनी कथामालेची सेवा हाच आपला “खरा तो एकची धर्म” मानला. कथामालेसोबत कोकण मराठी साहित्य परिषद व अन्य संस्थांची सेवा तेवढ्याच आपुलकीने केली. म्हणूनच हा पुरस्कार त्यांना प्रदान होत आहे. यावेळी कथा मालेच्या २० कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या लेखाचा एक “आपुलकीचा माणूस – नवनाथ” हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्याचे संपादन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले. श्री सदानंद कांबळी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना माझ्या घरची शिकवण, पत्नी आणि कुटुंबाची साथ तसेच ठाकूर गुरुजी आणि अनेक कुटुंबीयांनी मला दिलेले प्रेम आणि करुणा यामुळेच ही सेवा माझ्या हातून घडली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना रामचंद्र आंगणे म्हणाले नवनाथ भोळेची झालेली संभाजीनगरला बदली आणि अहमदनगर या गावी जाण्याचा सुवर्णयोग या दोन शुभ मुहूर्तांवरती कथामालेचा हा पुरस्कार मिळणे हा खरोखरच त्यांच्यासाठी शुभयोग आहे. गेली 18 वर्षे कथामालेकडून घेतलेले हे संस्कार ते आपल्या भागात नक्कीच रुजवतील. याबद्दल मला तीळमात्रही शंका नाही. नवनाथ भोळे या नवीन प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी नवनाथ भोळे कुटुंबियांच्या सन्मानार्थ आपुलकीची आनंदयात्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी त्रिंबक आजगावकर, सुरेंद्र सकपाळ, नारायण धुरी, वर्षाराणी अभ्यंकर, गुरुनाथ ताम्हणकर, चंद्रकांत माने या कथामाला कार्यकर्त्यांचा विशेष कामगिरीसाठी कथामाला स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, सुरेश गावकर, प्रकाश पेडणेकर, चंद्रशेखर हडप, लक्ष्मण आचरेकर, मनाली फाटक, संजय परब, कामिनी ढेकणे प्रसन्ना ठाकूर, स्वराशा कासले, एकनाथ गायकवाड, महादेव बागडे, सूर्यकांत दळवी, रविंद्र मुणगेकर आदी कथामाला कार्यकर्त्यांसहित मालवण कथामाला कार्यकर्त्यांचा परिवार उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामचंद्र कुबल यांनी तर आभार पांडुरंग कोचरेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा