You are currently viewing बला बला बोलत सुटणारे

बला बला बोलत सुटणारे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लेख*

 

*बला बला बोलत सुटणारे*

———————————-

 

करंबेलकरांचे दोन मिस कॉल येऊन पडले होते. त्यांना कॉल बॅक करणं गरजेचं होतं. मी असा कुणाचाच कॉल चुकवत नाही. निदान नंतर फोन करतोच. म्हणून आपल्या फोन ची अजिबात दखल न घेणारे मला आवडत नाहीत. पण कारंबेलकारांना पुन्हा कॉल करण्यात माझी एक चमत्कारिक अडचण होती. करंबेलकर एकदा बोलायला लागले कीं बला, बला बोलतच सुटतात. थांबायचं नाव नाही. एखादी गोष्ट मागचं पुढचं अस्तर लाऊन ते इतक्या वेळ बोलत राहतात कीं हात दुखायला लागतो. त्यात मला स्पॉन्डेलिटीस आहे त्यामुळे हा लांबलेला वेळ कठीण जातो. पण त्यातही कडी म्हणजे असा फोन ठेवला कीं ते पुन्हा कॉल बॅक करतात व ” फोन कट झाला वाटतं” म्हणून पुन्हा बोलू लागतात.

करंबेलकर पत्नी निधना नंतर बाणेर मधे एकटेच राहतात. त्यांना दोन मुलीं आहेत. दोघीही परदेशी आहेत. हे जातात अधून मधून त्यांच्या कडे.पण महिन्यापेक्षा जास्त काळ स्थान त्यांना तिथे नसावं. परत येतात.

बर्वेची स्थिती यांच्या हून वेगळी पण समस्या एकच धो धो बोलत सुटणं. त्यांची ही सवय आता इतरांनाही माहित झालेय. मित्रांमध्ये आता तो कुचेष्टेचा व हसण्याचा विषय झालाय . अनेकांनी तर त्यांना ब्लॉक करून ठेवलंय. काही जण तर त्यांचा फोन आला तर घेतच नाहीत.त्यांना ते माहीतही आहे पण त्यांच्यात बदल नाही पण समस्या तिचं आहे.

खरं तर बर्वे चांगल्या भरल्या घरात राहतात. पण मुलगा, सून त्यांच्या कामात मग्न असतात. नातवाना आता त्यांच्या उच्य शिक्षण, अभ्यास यात त्यांच्याशी बोलण्यात स्वारस्या नाही. एखाद, दुसऱ्या वाक्यापलीकडे त्यांच्या शी संवाद नाही. पत्नी आजारी असते. दिवसात बराच काळ त्या झोपूनच असतात. तसं ही बर्व्यांचा त्यांच्याशी फारसा संवाद नसेच. काकूंही थोडयाशा अबोल, घुम्या काहीश्या माणूस घण्या अश्या होत्या. त्यात आता आजारपणाने तोही मार्ग संपला. त्यान्च्या साठी ठेवलेली बाईच त्यांचं बरंचस करते.

कुलकर्णी बाई तश्या अतिशय सालस, मनमिळाऊ व म्हणून विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांचं वागणं, बोलणं ही अतिशय नेटकं असे पण आता त्यांना कधी फोन केला तर ही समस्या जोरदार पणे जाणवते. त्यांचं बोलणं संपत नाही. त्यांना मुलबाळ नव्हतं.त्यात आता पती निधना नंतर त्या एकट्याच राहतात. बोलण्या साठी आसूसलेल्या.एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं, किती वेळ बोलतोय याचं भान सुटणं, कुणाशी तरी मन मोकळं करण्यासाठी आसूसलेलं असणं या साऱ्या समस्या त्यांचा कडे आहेत. आडवळणाने सांगून पाहिलं. काही काळ त्या मनावर घेतात. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

वृधांच्या अनेक समस्या पुढे येतं आहेत त्यावर साधक, बाधक चर्चा ही होतं असते. छोटे मोठे उपाय ही शोधले जातात. सरकार ही त्या कामी पुढाकार घेतं, मदतीचा प्रयत्न करतं. पण काही गोष्टीं अश्या आहेत कीं त्या समस्या म्हणून फारश्या समोर येतच नाहीत. म्हणजे ज्येष्ठाची आर्थिक मदत, कुटुंबियां कडून केली जाणारी उपेक्षा किंवा फस्वाणूक, अत्याचार यावर उपाय शोधले जातात. आर्थिक मदत, वृद्धाश्रम, कायदे कानून, स्वयंसेवी संस्था यातून मदत उभारली जाते पण वर म्हटलेल्या अनुभवनातूच ती समस्या म्हणून अजून समाजापुढे आलेलीच नाही.

याला इतर कंगोरे ही आहेत. मी तर म्हणेन कीं वृद्धावस्थेची तयारी करताना ही गोष्ट सुद्धा गृहीत धरायला हवे. निवृत्ती नंतर आपला चारितार्थ चालवण्यासाठी जशी पेन्शन किंवा इतर गुंतावणूक, राहायला घर,, वैद्यकीय मदत याची जशी सोय हवी तशी हा विचार ही व्हायला हवा. निवृत्ती नंतर आपण नेमकं काय करणार आहोत? वेळ कसा घालवणार आहोत किंवा त्याचा सदुपयोग करणार आहोत याचं निजोजन आधीच करायला हवं. एखादा छंद स्वतः ला जडवून घेणं, कुठल्या सामाजिक कार्यात जोडून घेणं नवी कौटुंबिक किंवा सामाजिक झेपेल तेव्हाढी जबाबदारी अंगावर घेणं, मित्र मंडळ गोळा करणं, नाते वाईक यांच्याशी जोडून घेणं यातून नक्कीच मार्ग काढता येईल. धार्मिक मंडळी त्या प्रकारच्या कामात ही स्वतः ला गुंतवू शकतात.

पण अनेकांना निवृत्ती वेळी “आता तुम्ही काय करणारं ”

असं विचारलं तर ‘अजून काही ठरलं नाही असं. उत्तरं देतात.

सामाजिक कार्यकर्त्यांना ही यात काही करता येण्यासारखं आहे. मनमोकळी संवाद केंद्र, संपर्क गट, समुपदेशन केंद्र उभारता येतील. वृद्धावस्थेतील आरोग्यालाही ते उपयुक्त ठरेल. Unlimites talk time या नव्या संकल्पनेने यात भर घातली आहे. कारण आता फोन बिल वाढण्याची भिती राहिलेली नाही. पण याचा ही सकारात्मक वापर करता येईल.

अर्थात वृद्धानीही हे सारं समजून आपल्या बरोबर दुसऱ्याची अडचण होणार नाही असं वागलं पाहिजे हे ही तितकंच खरं.

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नवसहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

प्रतिक्रिया व्यक्त करा