You are currently viewing कोरोना लसीकरणाचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे…

कोरोना लसीकरणाचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे…

– पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” मोहिम व कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्र. जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीफे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, येत्या काळात शासन टप्प्याटप्प्याने कोरोनाची लस देणार आहे. या लसीचे डोस शासनाच्या सूचनेप्रमाणे प्राधान्याने आरोग्यासंबंधित यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांना देण्यात येणार आहेत. कोरोना लसीकरण हा ज्चलंत विषय असून आरोग्य व संबंधित यंत्रणांनी याकडे काळजीपूर्वक, भान ठेवून व पारदर्शक पणे काम करावे. त्यासाठीचे नियोजनही अगदी अचूक असावे. असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये अंदाजे 4 लाख लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेकडे आहे. जिल्ह्यामध्ये 38 प्राथमिक आरोग्य केंद्र,जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी लसीकरणासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आतापासून कामाला लागावे. कोरोना लसी साठवणूक करण्याबरोबरच या लसीच्या वाहतूकीचेही नियोजन करण्यात यावे. लसी टोचण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारीच्या उपलब्धतेबाबत नियोजन असावे. जिल्ह्यामध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यापासून कोविड रुग्ण व नॉन कोविड रुग्ण याचीही माहिती तयार करावी.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम राबविली या मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यात 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली. जिल्ह्यामध्ये या सर्वेक्षणाचे काम अत्यंत चांगल्या पध्दतीने झाले यामुळे कोरोनाच्या फैलावाला आवरण्यात यश आले, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले,  कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात येईल. परंतू अजून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जनतेने तोंडावर मास्क घालावा. सामाजिक अंतराचे पालन करावे. हात स्वच्छ धुण्यामध्ये हालगर्जीपणा करु नये. यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्ह्यामध्ये महाआवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी 1 लाख 20 हजार इतके अनुदान मिळते. जिल्ह्यामध्ये 1 हजार573 घरकुल प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यासाठी तालुकानिहाय गट विकास अधिकारी यांच्या स्तरावर कॅम्पचे आयोजन करुन लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. असे आदेश दिले, त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची घराबाबत व इतर समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशा सूचना त्यांनी शेवटी दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा