You are currently viewing आ. किशोर पाटील यांच्याकडून पत्रकारास झालेली शिवीगाळ, मारहाण प्रकरणी पाचोरा न्यायालयात युक्तीवादासाठी अॅड. मंगला वाघे उपस्थित राहणार

आ. किशोर पाटील यांच्याकडून पत्रकारास झालेली शिवीगाळ, मारहाण प्रकरणी पाचोरा न्यायालयात युक्तीवादासाठी अॅड. मंगला वाघे उपस्थित राहणार

पाचोरा :

येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्याकडून पत्रकार संदीप महाजन यांना झालेली शिवीगाळ, मारहाणीची धमकी तद्नंतर समर्थकांकडून झालेल्या मारहाण झाल्यानंतर याचे पडसाद देश आणि राज्यस्तरावर सर्वत्र दिसून आले. परिणामत: पत्रकार संदीप महाजन यांच्या बाजूने देश व राज्यस्तरावरील पत्रकारांच्या विविध संघटना व पत्रकार क्षेत्रातील जेष्ठ मान्यवर यांनी खंबीर भुमिका घेवून संदीप महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.

या प्रकरणी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी तातडीने दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयातील मा. न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. सदरची समितीने नुकतीच गुरूवार, दि. १२ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पाचोरा, जळगाव, नाशिक सह इ. महत्वपूर्ण ठिकाणी भेट दिली. तसेच मुंबई येथील विविध पत्रकार संघटनेचे मान्यवर तसेच पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ इंद्रकुमार जैन, गिता शेशू इतर काही मान्यवरांसह मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयातील विधितज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संदीप महाजन यांनी उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे याचिका दाखल केली. तसेच राष्ट्र व राज्य मानवाधिकार आयोग, पोलिस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे याचिकेतील क्रमांक ३ सोडून इतर विषय संबंधित विभागास नोटीस बजावली तर क्रमांक ३ बाबत उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी १५६ (३) अन्वये खालील कोर्टात जाणेबाबत सुचीत केल्यामुळे संदीप महाजन यांनी पाचोरा न्यायालयात (केस नं.२६९/२०२३) दाखल केल्यानंतर दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी सदर प्रकरणी केसचा युक्तीवाद होणार आहे. यासाठी मुंबई येथील मे.उच्च न्यायालयातील विधीतज्ञ मंगला वाघे या पाचोरा येथील मे.न्यायालयात स्वत: युक्तीवाद करणार आहेत. त्यांच्यासोबत पाचोरा येथील अॅड. अंकुश कटारे हे देखील पत्रकार संदीप महाजन यांच्या बाजूने काम पाहत आहेत.

या प्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले की, न्यायदेवता व भारतीय राज्य घटनेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. “सत्य परेशान होता है, पराजित नही” या ब्रिदवाक्याला अनुसरून मला न्यायदेवतेकडून विश्वास आहे. सोबतच जनतेच्या न्यायालयात योग्यवेळी योग्य निकाल जनता देणारच आहे. माझ्या प्रकरणी काही लाचार व पाकीटधार्जीन्यांनी पत्रकार संघटना व ज्येष्ठ मान्यवरांकडे चुकीचे संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला मात्र, पत्रकार संदीप महाजन यांनी त्यावेळी मान्यवरांना विनंती केली होती मी किंवा पाकीटधार्जीने काय सांगतात यावर विश्वास न ठेवता आपल्या स्तरावरून शोधपत्रिकारितेच्या माध्यमातून आपण शहर व तालुक्यातील आजी-माजी विविध विभागाचे शासकिय अधिकारी, राजकीय मान्यवर, सर्व धर्मिय संघटना, व्यापारीसह समाजातील जे महत्वपूर्ण घटक आहेत अशा व्यक्तींकडून माझ्या भुतकाळ व वर्तमानातील चौकशी करून सत्यता पडताळावी या विनंतीला मान देवून पत्रकार संघटना व पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांनी सखोल चौकशी केली आणि माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. हिच माझी पहिली सत्यतेची पावती म्हणता येईल. तसेच त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील व त्यांचे पदाधिकारी, समर्थक तसेच संदीप महाजन यांचे छुपे उघड जे कोणी विरोधक असतील त्यांना पत्रकार संदीप महाजन यांनी जाहिर आव्हान केले होते व त्या आव्हानावर संदीप महाजन आजही ठाम आहेत. माझ्यावर जे आरोप केलेले आहेत त्याची प्रेस नोटची कॉपी व व्हिडीओ आजही माझ्याजवळ आहे ते त्यांनी पडताळून बघावे आणि ते जर सिध्द केले तर मी पत्रकार क्षेत्रातून संन्यास तर घेईलच सोबतच पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसुन डोळ्याच्या भुवयांसह मुंडन करेल आणि पाचोराच काय महाराष्ट्र राज्य सोडून जाईन. यासाठी एक महिना नव्हे तर तब्बल एक वर्षाची संधी दिली आहे. याचे कारण म्हणजे मी संदीप महाजन यांनी जो पण व्यवसाय केला तो लोकांची गरज लक्षात घेवून आणि कोणाचाही तळतळाट न घेता व्यवसाय केला आहे. याशिवाय अल्पकाळात रॉकेलच्या राजदूतवरून शेतकर्‍यांच्या जिवावर गडगंज शेती व बंगले बांधलेले नाहीत. नव्हे तर आई-वडीलांच्या निधनानंतर देखील त्यांच्या उत्तरकार्याचा खर्च शेतकर्‍यांच्या पैशातून केलेला नाही. तसेच ज्यांना कोणाला माझ्या प्रकरणात माझ्या मालमत्तेसह इतर कोणत्याही फाईली बनवायच्या असतील त्यांना देखील आव्हान दिले होते कोठेही इकडे-तिकडे माहिती अधिकार अर्ज टाकून माझ्याबाबत माहिती प्राप्त होत नसेल तर त्याची माहिती माझ्याकडे थेट मागावी. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक स्व. दामोदर लोटन महाजन हे वर्ग आठवीत असतांना भारतीय स्वातंत्र्य चलेजाव चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना दि.२५/०९/१९४२ ते दि.०१/३/१९४३ पावेतो येरवडा जेलचा कारावास भोगलेला आहे. त्याचे येरवडा जेलचे इंग्रजकालीन कारावास भोगल्याचे पत्र (सर्टिफिकेट)(क्र.जेयु-II/२/६५८) उपलब्ध आहे. किंबहुना त्यांच्या स्वातंत्र्य चळवळी कार्यासंदर्भात खान्देश इतिहास राज्य परिषदेत शोध निबंध देखील सादर करण्यात आला आहे. याशिवाय आणखी कोणाला मी व माझ्या कुटूंबाच्या प्रकरणात मालमत्ता, आर्थिक व्यवहार सह कोणत्याही फाईली बनविण्यासाठी कागदपत्रे लागत असतील तर मी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या साक्षीने पाचोरा येथील हुतात्मा स्मारकात ऑन व्हिडीओ कॅमेरा स्व:खर्चाने माहिती देण्यास तयार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा