You are currently viewing (९) नववी माळ….

(९) नववी माळ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*(९)नववी माळ…*

*मला भावलेलं स्त्रीत्व*

 

नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏

नवदुर्गा मंत्र

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी

तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,

पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।

 

||नवमं देवी सिद्धिदात्रि नमस्तुभ्यं ||🙏

सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि।

सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी ॥९॥

 

अर्थ….

देवी सिद्धदात्री जी सिद्ध, गंधर्व, यक्ष, देव, दानव यांच्या द्वारे पुजली जाते. देवीच्या हाती शंख,चक्र, गदा आणि कमळ आहेत.सर्व सिद्धिंची दाता आणि त्यावर विजय प्राप्त करणारी हे देवी! माझ्यावर आशीर्वाद आणि कल्याण प्रदान कर.

 

माझ्या नात्यात नुकतीच एक नवीन सून दाखल झाली होती.उच्च शिक्षा विभूषित आणि जॉब करणारी. लग्नानंतर दोन महिन्यांनी ती जॉबला जाऊ लागली. मग घरात तिच्या जॉब मुळे, वेळां मुळे कुरबुरी सुरू झाल्या. सगळं आवरून ती जायची , पण सासू आणि सासरे दोघे नाराजी दाखवू लागले. पुढे वर्षभरात बाळाची चाहूल लागली….जस जसे दिवस पुढे सरकू लागले, तस तसे घरात हिच्या जॉब चा विषय चघळायला सुरुवात झाली..बाळ झाल्यावर आम्ही नाही जबाबदारी घेणार…तू सोडूनच दे जॉब…असं रोज रोज विषय निघून वाद वाढतच होते…..

 

 

माझ्या कानापर्यंत आलेच होते, पण आपण विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये …या विचारांची मी म्हणून गप्प बसले…पण माझी लेखणी कुठे गप्प बसायला तयार होती. मनातले विचार आपण उतरून काढू, म्हणजे निदान कुणा एकाला जरी याचा फायदा झाला तरी, लिखाण सार्थकी लागल्या सारखे वाटेल..

 

आपल्या स्वत:च्या घराचा पाया मजबूत असेल, तर इतर नाती कशी असावी या बोलण्याला अर्थ आहे. आता आजचा शेवटचा हा लेख या वरच आहे.

” घरात सुख, तर बाहेर सुख..”

बघा तुम्हांला तरी माझे विचार पटतात का ते.. अर्थात दोन्ही बाजूंनी मी लिहायचा विचार करते आहे बरं !…..

 

 

‘ *यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’*

 

या मनुस्मृति च्या वचना मध्ये असे सांगितले आहे की,ज्या ठिकाणी स्त्री ची पूजा म्हणजेच मानसन्मान होतो,तिथेच देवता वास करतात.

 

आज 21 वे शतक चालू आहे.मागील अनेक वर्षांपासून स्त्री च्या मध्ये आमूलाग्र बदल होत जाताना दिसतोय.पूर्वीची अबला स्त्री आज सर्वार्थाने सबला बनलेली दिसते..यातच तिची खऱ्या अर्थाने जीत झालेली दिसते…मग या मागे कोण कोण होते,इतिहास काय सांगतो….हा सर्व विषय वेगळा आहे..आपण आज या सबला स्त्री विषयी जरा आत्मचिंतन करू या.

 

*नोकरी करणाऱ्या स्त्रीस कुटुंबाचे सहकार्य…….*

 

आज जन्माला आलेल्या बालिकेचे खूप जोरदार स्वागत होते..पूर्वी सारखे हिडीस फिडीस स्वागत न होता ,समारंभ साजरा होतोय.कारण तिची योग्यता आता समाजाला पर्यायाने पालकांना ही समजली आहे…काही ठिकाणी अजून ही याला अपवाद असलेला दिसून येतोय,पण त्या भागाकडे तूर्तास न बघणे योग्य होईल.तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.असो।

 

आज स्त्री पुरुष हे दोघे ही समान अधिकाराचे मानकरी झालेत. हे दिवस स्त्री ला अनेक संकटांना तोंड देत बघायला मिळालेत.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ताठमानाने ती उभी आहे..प्रत्येक क्षेत्रात आज तिचा वावर आहे.यशस्वी ही होत स्वाभिमानाने ती मार्गक्रमण करत आहे.

 

सफाई कामगार पासून रिक्षा..ट्रक चालवणे, विमान, अंतरिक्षात,

बॉर्डरवर, राजकारण,समाजकारण,

डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग ,अशा प्रत्येक क्षेत्रात आज ती उच्च पदावर कार्यरत आहे.या अशा स्त्री ची ही गगनभरारी ही निश्चित कौतुकास्पद आहे..ती हे सर्व करत असताना मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, पुरुषांच्या मानाने ती एक पाऊल पुढे आहे…कष्ट आणि जबाबदारीच्या दृष्टीने.

स्त्री ही निसर्गतः प्रजननासाठी निर्मिलेली गेली आहे..शिवाय घर ,कुटुंब यात भावनिक दृष्टीने जास्त अडकणारी आहे..घरची जबाबदारी पर्यायाने कुटुंबातील सर्व सदस्य, मुलांचे संगोपन ह्या उत्तम रीतीने सांभाळत,तारेवरची कसरत करत या बाहेरच्या जबाबदार्या पार पाडत आहे.

 

हे सर्व करत असताना कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व्यवस्थित असणे अर्थातच आवश्यक आहे.

घरची घडी व्यवस्थित असेल,तरच बाहेरची आघाडी यशस्वी पणे पार पाडता येते.घरात कुरबुर असेल ,तर पुरुष तो मनाचा कोपरा बंद करून बाहेर व्यवस्थित परिस्थिती हाताळू शकतो,पण स्त्री चे तसे नसते.घरात गडबड तर मनात गडबड-गोंधळ. मुलं आजारी असतील तर निम्मा जीव घरात अडकतो. अशावेळी घरातील इतर कुटुंबीयांनी जर घरातील जबाबदारी हसत हसत स्वीकारली,तर ही स्त्री बाहेर विनाटेन्शन काम करू शकेल..

पूर्वी सारखे आता एकत्र कुटूंब पद्धत अस्तित्वात नसली,तरी काही वेळा आपल्याला इतरांची म्हणजे नातलगांची आवश्यकता असतेच.मन फ्रेश होणे, मोकळे होणे ही त्यामुळे घडत असते.. एकमेकांना हवे नको पाहण्याने घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात, ज्या मन स्वस्थ करण्यास सहाय्यभूत होतात.. अशाने स्त्री मनावर कोणतेही दडपण न घेता बाहेर आपले काम विनाप्रयास करू शकते..

नोकरी करणाऱ्या स्त्रीस जर कुटुंबाचे सहकार्य असेल ,तर एक यशस्वी स्त्री आपल्याला घरोघरी दिसेल…यात प्रामुख्याने नवरा, भाऊ, वडील, मुलगा, मित्र, सहकारी….. ह्यांचे ही योगदान तितकेच महत्वाचे आहे.

कारण हे सर्व कौटुंबिक सदस्यच आहेत..कुणी ही आपल्या आई, बहीण, बायको, सखी हिला कमी न लेखता तिला प्रोत्साहित केले ,तर विनाप्रयास ही ती अर्धी लढाई जिंकते,हे नक्की..

 

आता मी सासू-सून या विषयावर जास्त भाष्य करणार नाही…कारण पूर्वीच्या सासू आणि आजच्या सासवा यात जमीन आसमांचा फरक पडलाय…आजच्या सासवा या शिकलेल्या,कमावत्या,आणि बाहेरच्या क्षेत्रात अनुभवी असल्याने,काय मनस्थिती असते नोकरी करणाऱ्या बाईची,ते ती उत्तम प्रकारे जाणते.

त्यामुळे आधुनिक स्त्री ने न कळत का होईना पण अर्धी लढाई जिंकली आहे.

स्त्रीला कामासाठी बाहेर पडताना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत त्याचा तोल संभाळत काम करावे लागते. अशावेळी ती

जैविकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या ही पुरुषांपेक्षा जास्त चिवट असलेली दिसते. अनेकदा तणावग्रस्त परिस्थितीत पुरुषांपेक्षा ती जास्त चिकाटीने तग धरते. त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीचे मासिकचक्र, गरोदरपण, प्रसूती, पालकत्व, त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची नैसर्गिक ताकद तिच्यात असतेच असते. स्त्रीच्या शारीरिक आरोग्यासह मनाची घडणही गुंतागुंतीची आहे. या सगळ्या रेट्यात तिच्यातील मानसिक समस्या वाढत्या आहेत, का तर आधुनिकतेची आव्हानेच आज एवढी बोजड झालीत की,ती पेलता पेलता आणि या संस्कृतीरक्षकांची मर्जी संभाळता संभाळता तिची शारीरिक- मानसिक दमछाक होते. मात्र या तिच्या मानसिक समस्या ओळखण्याची संवेदनशीलता तिच्या कुटुंबाकडे असेलच, असे सांगता येत नाही…पण संयमाने आणि मोठ्यामनाने तिला आपलंसं करून मी किंवा आम्ही … आहे किंवा आहोत तुझ्या मागे, हा विश्वास तिच्या मनात निर्माण करता आला, तरच ती बाहेरच्या जगातील सर्व समस्यांना किंवा येणाऱ्या चॅलेंजला हसत हसत तोंड देऊ शकते. घरातील मुलांची, सासुसासरे, नणंद, दिर… आले गेले पाहुणे….यात पूर्वीची स्त्री अडकून पडायची..पण आज ती कर्तृत्ववान बनली आहे…तिचे क्षेत्र विस्तारते आहे, शिवाय आर्थिकदृष्ट्या सुद्धा दोघांना घराबाहेर पडणे गरजेचे असल्याने आता तरी ती या घरगुती समस्यांतून बाहेर पडायलाच हवी… त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी तिला मानसिक सपोर्ट अवश्य द्यायला हवा. तिला मान ही द्यायला हवा…तू करतेस ते योग्यच आहे ही जाणीव तिच्या मनापर्यंत पोहचायला हवी …वेळ प्रसंगी तिच्या मुलांचे संगोपन, खाणे पिणेची जबाबदारी ही घेता यायला हवी…उगीच विरोधा साठी विरोध करु नये. अशाने मग मुलं स्वतंत्र राहायचा विचार करतात….कारण सुनेला समजूनच जर घेतले जात नसेल, तर रोज भांड्याला भांड लागणारच. जेवढी मदत करता येईल, झेपेल तेवढी करावी. आजकाल डे-केअर सर्वत्र असतात, पण तिथे किंवा शाळेत सोडणे, आणि आणणे ही कामे सुद्धा करून आपण तिला मदत करू शकतो…

भाजी निवडणे, एखादी दुसरी गोष्ट जमेल तशी करणे…..येवढे तरी करु शकतो आपण ते करावे…

सर्वात महत्वाची भूमिका नवऱ्याला पार पाडायची असते…त्याच्या पूर्ण सपोर्ट ने ती मोकळ्या मनाने बाहेरची कामे करू शकते…

 

आता हे सर्व मी साधारण विवाहित स्त्री बद्दल लिहिले…पण जी कुणी घरातील मुलगी, आई, वहिनी….या रुपात बाहेरची कामे, नोकरी, व्यवसाय अगदी दुसऱ्या घरची धुणी भांडी, मजुरी स्त्री या….यांच्या ही बाबत माझी हीच भूमिका आहे….

 

अशा प्रकारे नोकरी करणाऱ्या स्त्रीस कुटुंबाचे सहकार्य असेल तर ती ” *मानिनी* ” म्हणून स्वाभिमानाने आपली यशस्वी मार्गक्रमण करत राहील हे नक्की..

 

 

*नोकरी करणाऱ्या स्त्रीची जबाबदारी..*

 

आता या नोकरी करणाऱ्या स्त्रीचे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी कसे वर्तन हवे…हे बघू….

 

सर्व साधारण घरातील स्त्रीचा विचार करता नोकरी करणारी स्त्री ही पुरुषांसारखी स्वतंत्र नसते…मनात आले तर कधी ही बाहेर पडता येत नाही. लग्न न झालेली मुलगी आईवर जबाबदाऱ्या टाकून कदाचित बाहेर पडू शकते, पण तिला ही वेळेची बंधने ही पाळावीच लागतात.

सध्या विवाहित स्त्री बद्दल आपण विचार करत आहोत. घरातील कामे तर कोणत्याही स्त्रीला चुकलेली नाहीत. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात नव्याने नाती तयार झालेली असतात. सर्वांची मने सांभाळत संसार करायचा असतो.आजकाल नातीच कमी झाल्याने एखादी नणंद किंवा एखादा दिर आणि सासू सासरे एवढेच. पूर्वी सारखा गोतावळा शक्यतो दिसत नाही..म्हणून जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्यात असे म्हणायला हरकत नाही. आज पतीपत्नी या दोघांना नोकरी करावी लागते, नव्हे ती गरजच बनली आहे.आणि योग्य शिक्षण घेतल्याने स्त्रियांनी तरी घरी का बसायचे? तिची इच्छा असेल तर जरूर आपल्या पायावर तिने स्वतंत्र उभे राहायचे तिला स्वातंत्र्य आहेच.

 

आता हे सर्व करत असताना तिने घरातील सर्व जबाबदाऱ्या तिने कौशल्याने पार पाडायला हव्या. कामांची योग्य सांगड तिला घालता यायला हवी. आपण नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो, कमावतो म्हणजे मी ही ‘कुणी तरी’ आहे , हा मिजास असू नये. किती ही स्वातंत्र्याच्या गप्पा आपण मारल्या तरी घरी स्त्रीचे ‘लक्ष’ असणे, हे कधी ही उत्तम गृहिणीची ओळख आहे. मुलांचे आवरणे, त्यांना वेळ देणे, स्वतःच्या हाताने काही खाऊ करून देणे, अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे …..हे मातृत्व उपभोगणे आहे…अशाने

‘आई माझी आहे’…हे मुलांच्या मनात कोरले गेले पाहिजे…सर्व कामांना पैसे देऊन बायका मिळतात, पण आई मिळत नसते, हे लक्षात घ्यायला हवे.

सासू सासऱ्या बरोबर पण छान संबंध असायला हवेत…सेवा करायची म्हणजे अगदी सर्व हातात नेऊन देणे, किंवा सतत मागे पुढेच केले पाहिजे असे नाही..तर त्यांचे ही वय होत आले आहे याची जाणीव असणे.आणि येता जाता हसून असावे. चौकशी करावी, मुलांचे आपण आवरून , जेणे करून त्यांना फार करावे लागू नये याची जाणीव असावी. लहान मुले आजकाल डे केअर मध्ये असतात. पण कधी कधी लहान मुले त्यांच्या वर सोडून जायची असतील, तर त्यांचे शी,शू… खाण्याचे डबे तयार ठेवून आपल्या कामाला जावे…जेणे करून सासू सासरे आनंदात राहतील…

घरातून आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे तर आपण ही एवढे करूच शकतो न?

कधी कधी बाहेर एकत्र जायचा प्लॅन करावा, एखादी दुसरी गोष्ट प्रेझेंट द्यावी….

अशाने प्रत्येकाला आपली ‘दखल’ घेतली जात आहे याचे समाधान वाटते इतकंच…

घराचा , संसाराचा गाडा जर सुरळीत चालायचा असेल, तर घरातील स्त्रीचे योग्य ते योगदान असणे अगदी गरजेचे असते…

घरची स्त्री खूष तर सर्व खूष…

घरातील स्त्रीचे स्त्रीशी नाते गोड, तर सर्व गोड..

म्हणूनच म्हणतात….

“घर असावे घरासारखे

नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम-जिव्हाळा

नकोत नुसती नाती”…….

 

ही तारे वरची कसरत करतच स्त्रीला आपल्या संसाराचा रथ पुढे न्यायचा असतो…आणि रथ म्हणला, की त्या रथाला संसाराची दोन चाके आलीच…नवरा आणि बायको… ही संसार रथाची दोन चाके. नवऱ्याची उत्तम साथ निभावत अशी स्त्री आपल्या संसारात अत्यंत स्वाभिमानाने आनंदात जगेल यात वाद नाही.

 

या देवी सर्वभू‍तेषु तुष्टि रुपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||

——————————————-

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर