You are currently viewing वृंदा कांबळी यांच्या समग्र साहित्यात सांविधानिक मूल्यांचा परिपोष – अनिल जाधव

वृंदा कांबळी यांच्या समग्र साहित्यात सांविधानिक मूल्यांचा परिपोष – अनिल जाधव

वेंगुर्ले (प्रतिनिधी):

 

चर्चासत्र ही एक अभ्यासपूर्ण मांडणी असल्यामुळे कोणत्याही लेखकाच्या समग्र साहित्यावर चर्चासत्र आयोजित होणे ही त्या लेखकासाठी मोठी उपलब्धी असते. एकप्रकारे गंभीर वाचक व समीक्षकांनी त्या लेखकाला दिलेली ती मान्यता असते. त्याच्या समग्र साहित्य निर्मितीचे साक्षेपी अवलोकन या निमित्ताने घडते. म्हणून चर्चासत्र हा त्या लेखकाच्या साहित्य जीवनातला एक अतिशय महत्त्वपूर्ण क्षण असतो, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन प्रसंवाद या अनियतकालिकाचे संपादक अनिल जाधव यांनी येथे केले.
विनोदिनी आत्माराम जाधव प्रतिष्ठान व वेंगुर्ले तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील साईडिलक्स हाँलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृंदा कांबळी यांच्या समग्र साहित्यावरील आयोजित चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी फुले-शाहू- आगरकर- आंबेडकर या पुरोगामी विचारमंचाचे प्रवर्तक ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश चमणकर, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, कवी वीरधवल परब, पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आनंद बांदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
अनिल जाधव पुढे बोलताना म्हणाले, वृंदा कांबळी यांच्या साहित्यात संविधानिक मूल्यांचा परिपोष आढळतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये त्यांच्या लेखनात वारंवार येतात. कोकणातील अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी आपल्या लेखनातून वाचकांच्या समोर ठेवले आहेत.
या चर्चासत्राचे उद्घाटक जयप्रकाश चमणकर म्हणाले, माझ्या समजुतीप्रमाणे आपल्या जिल्ह्यात होणारे हे एखाद्या लेखकाच्या समग्र साहित्यावरचे हे साधारणपणे पहिलेच चर्चासत्र आहे. या आधी वेगवेगळे विषय देऊन चर्चासत्रे घडली आहेत. पण याच भागात राहून लेखन करणाऱ्या लेखक कवींवर आणि याच जिल्ह्यात ही चर्चासत्रे गेल्या तीस चाळीस वर्षात झाल्याचे मला आठवत नाही. या निमित्ताने बाईंच्या समग्र साहित्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न नव्या लिहित्या पिढीसाठी मोठा साहित्यिक वारसा म्हणून उपलब्ध होणार आहे.
या चर्चासत्रात मांडणी करणारे प्रमुख निबंध वाचक प्रा. शंकर जाधव (रत्नागिरी) म्हणाले की वृंदा कांबळी यांच्या लेखनात १९६० नंतरच्या काळात आलेली साहित्य मूल्ये प्रभावीपणे अधोरेखित झालेली दिसतात. मानवी मूल्यांना बसलेले हादरे, बदललेली कुटुंबव्यवस्था, नातेसंबंधात आलेली अलिप्तता आणि ९० च्या दशकात फोफावलेल्या चंगळवादी वृत्ती प्रवृत्तीचे उभे आडवे छेद दिसतात. कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या लेखनात वारंवार येतात. त्यामुळे कांबळी यांच्या कादंबन्या आपल्याला अस्वस्थतेच्या घेऱ्यात आणून टाकतात. त्यांच्या लेखनात आलेली जीवनसन्मुखता खूप आशादायक आहे.
वृंदा कांबळी यांच्या कथा या विषयावर बोलताना कल्पना मलये म्हणाल्या की, त्यांच्या कथा या रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहतात. या भागातील मूळ मानवी स्वभाव व निसर्गाशी आणि जगण्याशी चाललेल्या संघर्षाचे प्रातिनिधिक चित्रण त्यांच्या कथांमधून उभे राहते. निसर्गाची सुंदरता आणि भेसूरता त्या अतिशय प्रभावीपणे लेखनात आणतात. मानवी प्रवृत्ती काळानुसार कसकशी बदलत जाते ते त्यांनी अनेक व्यक्तीरेखांमधून विविध कंगोल्यासह ठळकपणे मांडले आहे.
वृंदा कांबळी यांचे ललित गद्य या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करताना पी एस. कौलापुरे म्हणाले की, वृंदा कांबळी यांच्या लेखनात आशयाचे वैविध्य पुरेपूर उतरले असून ललित लेखनासाठी लागणारी तरलता, संवेदनशीलता आणि जीवननिष्ठा त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य भाग असल्याने त्याचे विलक्षण गहिरे प्रतिबिंब लेखनात उमटलेले दिसते. त्यांच्या ललित गद्यातील निसर्गाचे अनेक विभ्रम वाचकाला खिळवून ठेवणारे आहेत.
त्यानंतरच्या सत्रात किरातच्या संपादिका सीमा मराठे व विठ्ठल कदम यांनी वृंदा कांबळी यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या लेखननिर्मितीची प्रक्रिया वाचकांसमोर ठेवली. यानिमित्ताने वृंदा कांबळी यांच्या कथा, कादंबरी व ललित या त्रिविध लेखन प्रकारामागील कथाबीजे, आशयसूत्रे, व्यक्तिरेखा याविषयी सविस्तर चर्चा झाली.
या चर्चासत्रासाठी प्रा. सचिन परुळेकर, अजित राऊळ, प्रदीप कुबल, प्रा. नीलम यादव, प्रा. जे. जी. पाटील, डी. जी. सावंत, स्वप्नील होडावडेकर, स्वाती सावंत, चारुलता दळवी, हेमा सावंत, संजय परब, सद्गुरु सामंत, महेश राऊळ, प्राजक्ता आपटे, देवयानी आजगावकर, प्रीतम ओगले, संजय पाटील विदिशा जाधव, पर्णवी जाधव, विद्या कौलापुरे, नेहा कदम, माधवी मातोंडकर, स्वाती बांदेकर, राजश्री परब, दिव्या आजगावकर, अंकुश तेंडोलकर, फाल्गुनी नार्वेकर तसेच विनोदिनी आत्माराम जाधव प्रतिष्ठान, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघ व आनंदयात्री वाङ्मय चर्चा मंडळाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
या चर्चासत्राचे भावस्पर्शी सूत्रसंचालन राजेश कदम, स्वागत व प्रास्ताविक प्रा. सिद्धार्थ तांबे तर आभार राकेश वराडकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा