You are currently viewing हत्ती हटाव मोहीम पुन्हा राबविणार

हत्ती हटाव मोहीम पुन्हा राबविणार

सावंतवाडी वनविभागाच्या बैठकीत निर्णय; मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती

 

सावंतवाडी :

 

दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती व अन्य वन्य प्राण्यांकडून शेती बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतरत्रही वन्य प्राण्यांकडून नुकसानी सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई वाढवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील असून लवकरच याबाबत शासन निर्णय घेतला जाणार आहे. तसेच हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर विशेष मोहीम राबवण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दोडामार्ग तालुक्यात हत्तींपासून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथील वनविभागाच्या कार्यालयात हत्ती हटाव समितीचे प्रमुख तसेच शेतकरी बांधवांसोबत वाढीव नुकसान भरपाई संदर्भात बैठक आयोजित केली होती.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व बागायतदारांनी वाढीव नुकसान भरपाईची मागणी केली. नारळ हे पीक कोकणामध्ये अधिक असल्याने त्यासाठी वेगळा निकष लावून अधिकची नुकसान भरपाई देण्याचे यावेळी सुचविण्यात आले. तसेच हत्ती हा लहान नारळाच्या झाडांचे नुकसान जास्त करतो. त्यामुळे नारळ झाडाच्या वयोमानानुसार नुकसान भरपाई नको तर सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करता मंत्री केसरकर यांनी मोठ्या झाडाला तीस हजार रुपये तर लहान झाडाला पंधरा हजार रुपये नुकसान भरपाईबाबत एक मत केले. तसेच दिवाळी नंतर हत्ती हटाव मोहीम राबविण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, शैलेश दळवी,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, हत्तीबाधीत समितीचे सदस्य पंकज गवस, संतोष गवस, विष्णू देसाई, गोपाळ गवस यांच्यासह हत्ती बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा