You are currently viewing महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्यांबद्दल आमदार वैभव नाईक यांची भूमिका दुटप्पी

महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्यांबद्दल आमदार वैभव नाईक यांची भूमिका दुटप्पी

*आमदार नितेश राणे यांनी केला आरोप, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आव्हान

कणकवली

श्री परिवाराचे प्रमुख, महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्य यांच्या बद्दल उबाठ सेनेचे आमदार वैभव नाईक यांची भूमिका कायम दुटप्पी राहिलेली आहे. सिंधुदुर्गात येऊन वेगळी भूमिका मांडायची आणि विधानसभेत आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमावर टीका करायची,सरकारने अहवाल दिला तो अहवाल नाकारून आप्पासाहेबांवर कारवाईची मागणी करायची. विधानसभेत गेल्या आठवड्यात आमदार वैभव नाईक उबाठा सेनेचे आमदार आणि काँग्रेसचे आमदार यांनी श्री सदस्य आणि आप्पासाहेबांच्या विरोधात घेतलेली भूमिका ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी आपल्या भूमिकेचे उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आप्पासाहेबांच्या श्री सदस्यांना द्यावे असे आव्हान भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
कणकवली नगरपंचायत येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आणि त्यांच्या पक्षाचे आमदार यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमाचा जो अहवाल सरकारने सादर केला त्याला कशा पद्धतीने विरोध केला आणि कारवाईची मागणी केली हे एका प्रश्नावर उत्तर देताना आमदार नितेश राणे सांगितले. ते म्हणाले.महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात जी घटना घडली त्यासंदर्भात कोणत्याही श्री सदस्य ची तक्रार नाही.असे असतानाही काँग्रेस आणि उबाठा सेनेच्या आमदारांनी तो प्रश्न मुद्दामहून उपस्थित केला.संबंधित खात्याचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देताना पूर्ण अहवाल सादर केला. या अहवालावर श्री सदस्य आणि सर्वजण समाधानी आहेत असे सभागृहात सांगितले मात्र या भूमिकेला विरोध करत उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक व त्यांचे काही सहकार्य आमदार आणि काँग्रेसचे आमदार यांनी अहवालच चुकीचा असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली. त्यामुळे विधानसभेत एक भूमिका आणि सिंधुदुर्ग आल्यानंतर दुसरी भूमिका वर्तन वैभव नाईक यांचे सुरू आहे.
मी आणि माझे असंख्य सहकारी कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला जातो.त्यांचे विचार आत्मसात करतो. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करतो. असे काम चालू असताना आमदार वैभव नाईक मात्र आप्पासाहेबांच्या विचारांना विरोध करतात. त्यांना आप्पा साहेबांचे विचार मान्य नाहीत का ? श्री सदस्य जे सामाजिक काम करत आहेत ते काम त्यांना मान्य नाही का ? याचे उत्तर आप्पासाहेबांच्या प्रत्येक श्री सदस्याला द्यावेच लागेल असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांना सुनावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा