You are currently viewing मच्छीमारांसाठी मोठी बातमी; २० ते २२ हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारचे नियोजन: मंत्री नितेश राणे

मच्छीमारांसाठी मोठी बातमी; २० ते २२ हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारचे नियोजन: मंत्री नितेश राणे

*आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मच्छिमारांना मासेमारी बंदी काळात मिळणार आर्थिक आधार*

मुंबई :

मासेमारी बंदीच्या कालावधीत आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्यातील गरजू मच्छिमार बांधवांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मासेमारी बंद काळात मच्छिमारांना थेट २० ते २२ हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याचे नियोजन असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले आहे.

 

एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. आंध्र प्रदेशमध्ये गरजू किंवा विशिष्ट समाजातील मच्छिमारांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याची योजना राबवली जाते, याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार तयारी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्षातील काही महिने मासेमारी बंदीचा काळ असल्यामुळे मच्छिमारांच्या हातात कोणतीही कमाई किंवा रोजगार राहत नाही. हंगाम कधी सुरू होईल आणि पुन्हा मासेमारी कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा करत त्यांना घरीच थांबावे लागते. या हालाकीच्या आणि संकटकाळात मच्छिमार कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाकडून गरजू मच्छिमारांना २० ते २२ हजार रुपये देण्याचे नियोजन करण्यात येत असून, यामुळे किनारपट्टीवरील हजारो मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा