*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम कविता*
*नीट लक्षात ठेव ना*
ये रे पावसा विनंती केली
लगेच इतके कोसळायचे ?
ताळतंत्र सारे सोडून देऊन
इतके का वेठीस धरायचे ?
गच्च भरून हे नभोमंडळ
उडवली साऱ्यांची तारांबळ
पाऊस धारा अखंड मारा
इतके असते का कोपायचे
सगळीकडे पाणी तुंबवून
तोंडचे पाणी पळवायचे
रात्रं दिवस घालतोस दंगा
दाखवलास चांगलाच इंगा
आता अद्दल घडवायचीच
असे म्हणून बरसत रहायचे
शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे
नुकसान का करायचे ?
जिकडे तिकडे पूरच पूर
वाहून नेतोस अख्खे पूल
घरेच्या घरे वाहून न्यायची
जीव घ्यायचे प्राण घ्यायचे
साऱ्यांना पुरते पिडून छळून
त्राही माम् करून सोडायचे
नको माजवूस असा गोंधळ
नको करूस जीवघेणा छळ
एकतर मुळी ना फिरकायचे
नाहीतर खूपच कोसळायचे
असले विचित्र धोरण राबवून
किती पस्तवायला लावायचे
हवा तेवढाच पड ना
दुवा सर्वांचा घे ना !
“जीवनदाता पाऊस राजा”
आम्ही तुला म्हणतोय ना
या ब्रीदाला तू जाग ना
नीट लक्षात ठेव ना !
डॅा.शरयू शहा.
॰॰॰॰॰॰॰॰॰
