पुणे :
या संस्थेचा प्रवास म्हणजे साहित्यिकांच्या चौदा वर्षाचा सहवास बागेतील गवतापासून सुरू होऊन स्मशानापर्यंत व्हाया दवाखाना, विद्यापीठ, महापालिका, शाळा कॉलेज, पदरस्ता ते स्मशानभूमी. कलावंतांची प्रतिभा, भूमिका सर्वकाळी, सर्वस्थानी समाज उपयोगी आणि संस्कृतीला जन्माला घालणारी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे कुठल्याही पुढारी नेत्यापेक्षा कवी कलावंत अधिक वंदनीय वाटतो. सम्राट हा न्याय देणारा तसेच संधी देणारा असतो. असा विनोदसारखा संधी देणारा संघटक हा फार मिळत नाही. या संस्थेला कुठल्याही जातीचं जाणवं नाही. जाणवंमुक्त अशी जाणिवेची संस्था विनोद अष्टुळांनी निर्माण केली आहे. त्यामुळे संस्थेने अनेक प्रतिभावंत कवी साहित्यिक निर्माण केले आहेत. असे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सबनीस बोलत होते.
साहित्य सम्राट पुणे या संस्थेचे द्विशतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे २२५ वे राज्यस्तरीय संमेलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हडपसर येथे जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत श्रीपाल सबनीस, कवयित्री ललिता सबनीस, संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ, ज्येष्ठ साहित्यिक वि.ग.सातपुते, सूर्यकांत वैद्य, चित्रपट निर्माते संजय सिंगलवार, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ.सुनील लोखंडे, डी.एस. एसचे दादासाहेब सोनवणे, उद्योजक संदीप रणदिवे, गझलकार मसूद पटेल आदी उपस्थित होते. या सर्वांचा सन्मान संस्थेच्या आजीव सभासदांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या पूजनाने झाली. संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन सिताराम नरके यांनी केले. वृक्षआरती लक्ष्मण शिंदे यांनी गायली. तसेच मान्यवरांचे स्वागत नानाभाऊ माळी यांनी केले आणि संमेलनाचा उद्देश प्रास्ताविकेतून अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी व्यक्त केला.
पुढे सबनीस म्हणाले की या संस्थेत प्रत्येक सामान्य माणूस कवी कलावंत सम्राट झालेला आहे. येथे संमेलनाची सुरुवात संविधान पूजनाने झालेली आहे. शिवाजी महाराज ते अण्णाभाऊ साठे यामध्ये सर्व महापुरुषांचा गौरव अबाधित ठेवून महापुरुषांच्या विचारांची बेरीज एकत्र करणे म्हणजे साहित्यिक होणे होय. साहित्यिकांनी महापुरुषांना एका चौकटीत बसवता कामा नये. कविता केवळ एका धर्माची नसून सर्व धर्माला कवटाळणारी मानवतेला पोटात घालणारी, माया लावणारी, कुरवाळणारी, मानवतेला जन्माला घालणारी अशी कविता श्रेष्ठ असते. म्हणून या मंचाला धर्म नाही कुठलीही जात नाही. अशी भूमिका विनोद अष्टुळांच्या वाटचालीमधील विविध उपक्रमांद्वारे दिसून येते.
मंचावरील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, आदरणीय सर्वच मान्यवरांनी साहित्यसम्राट समूहाचे तसेच अध्यक्ष विनोदचे भरभरून कौतुक करून मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आदर्श गुणवान व्यक्तींना साहित्य सम्राटचे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये साहित्यरत्न पुरस्कार उज्वला यादव, शिक्षण रत्न पुरस्कार हरिदास भिसे, समाज रत्न पुरस्कार अमोल मदने आणि राष्ट्रभाषा रत्न पुरस्कार विलास बाबर यांना देण्यात आला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.पि.डी.कदम यांचे भिकाऱ्याचे जीवन व तिन्हीसांजेला तसेच उत्साही आयुष्य सुभाष ढगे यांच्या आणि सिताराम नरके यांच्या नात्यांच्या पाऊल खुणा या काव्यसंग्रहांचे मान्यवरात शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या कवी कवयित्री सुषमा अलेकर, अलका नाईक, अरुण बुंदेले, रेखा दुसाने, अश्विनी काळे, पूजा रोकडे, रामदास पुजारी, संदीप रासकर, प्रकाश कदम, जितेंद्र सोनवणे, महेंद्र माणिक, बाळकृष्ण अमृतकर, आनंद महाजन, स्नेहा रोकडे, जयश्री ताठे, सुवर्णा वाघमारे, विलास बाबर, सुधीर कुलकर्णी, श्रीकांत ढोबळे, जितेन सोनवणे, सूर्यकांत नामुगडे, उमाकांत आदमाने, प्रवीण वानखेडे, सुरेश धोत्रे,चंद्रकांत जोगदंड, छगन वाघचौरे अशा अनेकांनी आपल्या बहारदार रचना सादर करून हडपसरवासीय काव्य रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये अर्चना अष्टुळ, सुषमा रणदिवे, कन्हैया साबळे, बाळासाहेब केमकर, संजय ओसवाल आणि ओंकार अष्टुळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उफाडे,कवी संमेलनाचे सूत्रसंचालन जगदीप वनशिव यांनी तर कार्यक्रमाचे आभार कवी संमेलनाचे अध्यक्ष म.भा.चव्हाण यांनी व्यक्त केले.
