*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वसंताचे येणे*
झाडांना फुटू लागली
लाल कोवळी पालवी.
रानावर पसरली
जाणीव हिरवी नवी.
माणसांचे चेहरे फुलले
गाऊ लागले पक्षी.
आभाळभर दिसू लागल्या
पक्षांच्या नक्षी.
वसंताच्या आगमनाने
खूश झाले सारे.
खूश होऊन वाहू लागले
जिकडे तिकडे वारे.
आपणही करु चला
वसंताचे स्वागत.
रानातल्या वाटांवरुन
मजेत जाऊ चालत.
जिकडे तिकडे पानाफुलांनी
झाडे सगळी नटलेली.
वठलेल्या झाडांनाही
नवी पाने फुटलेली.
निसर्ग सुंदर बहारदार
डोळे भरुन पाहू.
शीळ वाजवत आनंदात
दूर दूर जाऊ.
अनुपमा जाधव
डहाणू
