You are currently viewing पथनाट्याद्वारे सामाजिक प्रबोधन; महाविद्यालयातील कार्यशाळेत विद्यार्थिनींचे कौशल्य प्रदर्शन

पथनाट्याद्वारे सामाजिक प्रबोधन; महाविद्यालयातील कार्यशाळेत विद्यार्थिनींचे कौशल्य प्रदर्शन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे मराठी विभागाच्यावतीने १४ जानेवारी २०२६ पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या पंधरवड्याच्या अंतर्गत मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थिनींना पथनाट्याची ओळख व्हावी या उद्देशाने प्राध्यापक जगदीश संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेत महाविद्यालयाच्या कला शाखा प्रमुख डॉ. सरिता कासरळकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत सांगितले, “पथनाट्य हे समाजप्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थिनींनी या माध्यमाचा अधिकाधिक उपयोग करून समाजापर्यंत विविध संदेश पोहोचविला पाहिजे.” त्या पुढे म्हणाल्या, “पथनाट्याद्वारे कमीतकमी शब्दात अधिकाधिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचविता येतात; त्याची परिणामकारकता इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा अधिक आहे.” त्यांनी मराठी विभागाचे तोंडभरून कौतुक केले आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा सतत आयोजित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्राध्यापक जगदीश संसारे यांनी विद्यार्थिनींना विविध खेळ व सराव सत्राद्वारे पथनाट्य कसे बसवायचे, विविध भूमिका कशा साकाराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पथनाट्य प्रेमी विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सहभाग घेत विविध भूमिका साकारल्या, ज्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व उत्साही ठरला. दोन तासांच्या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी आपले कौशल्य प्रदर्शन करून सर्व प्राध्यापकांची वाहवा मिळविली.

सदर कार्यशाळेचे आयोजन मराठी विभागप्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले, तर सहाय्यक प्राध्यापिका स्नेहा अडसूळ, ऋतुजा ढवळे आणि माधवी पवार यांनी मार्गदर्शनपर कार्यशाळेत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. समाजशास्त्र विभागाचे सहा. प्रा. हेतल कोरलेकर यांनीही संपूर्ण वेळ उपस्थित राहून विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. बॅचलर ऑफ अकाउंटिंग एन्ड फायनान्स विभागाचे समन्वयक सहा. प्रा. दत्तात्रय गावडे यांनी विद्यार्थिनींना थोडक्यात मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या. या उपक्रमामुळे पथनाट्याद्वारे सामाजिक संदेश पोहचविण्याची क्षमता विद्यार्थिनींमध्ये वृद्धिंगत झाली असून, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उद्देश विद्यार्थिनींपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा