फोंडाघाटमधील नाडकर्णी फार्मवर अग्नितांडव;
४०० काजू व ७० आंबा कलमे जळून खाक
फोंडाघाट
फोंडाघाट येथील नाडकर्णी फार्ममध्ये काल भीषण आग लागून काजू आणि आंब्याची शेकडो कलमे जळून खाक झाली. वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरल्याने ती आटोक्यात आणणे अशक्य झाले. या दुर्घटनेत सुमारे ४०० काजूची आणि ७० आंब्याची कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली.
या घटनेवेळी फार्मचे मालक अजित नाडकर्णी हे कामानिमित्त बाहेर होते. आगीची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्वकाही राख झाले होते. “रक्ताचे पाणी करून वाढवलेली आंबा-काजूची बाग डोळ्यांसमोर जळताना पाहावी लागली, ही वेदना शब्दांत मांडता येणार नाही. डोळ्यातील पाणीही ही आग विझवू शकले नाही,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी संवाद मीडियाशी बोलताना व्यक्त केली.
सदर बाग ही एकशेतरी ठिकाणी असून, अनेक झाडे मोहराला आलेली होती. आज तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात येणार आहे. मात्र, मोहराला आलेली सर्व झाडे पुन्हा उभी राहणार नाहीत, याची खंत कायम राहील, असेही नाडकर्णी यांनी सांगितले.
घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नुकसानाचे नेमके कारण आणि एकूण हानीचा अंदाज पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.
— प्रतिनिधी : शुभांजित श्रुष्टी
