You are currently viewing समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना

समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना

समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाचा अभिनव उपक्रम

 सिंधुदुर्गनगरी 

 सद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. आपत्तीतून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत अनेक पूर्वतयारीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यात समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना खबरदारीच्या सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तृप्ती धोडमिसे  यांच्या संकल्पनेतून समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या भ्रमणध्वनीवर Push नोटिफिकेशनद्वारे खबरदारीच्या सूचना पाठविण्याबाबत मोबाईल कंपन्यांना आदेशित करण्यात आलेले होते.

याबाबत राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना कळवून संबंधित मोबाईल कंपन्यांकडे याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत करण्यात आलेली होती. याबाबत राज्य शासनाने दखल घेऊन आपत्तीपूर्व तयारीच्या अनुषंगाने सदर बाबीचे महत्व लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या Sachet- National Disaster Alert Portal द्वारे समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांना समुद्री पर्यटनाचा आनंद घेताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबतच्या सूचना प्रसारित केल्या.

 जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून दखल घेऊन सदरच्या खबरदारीच्या सूचना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता मर्यादित न ठेवता संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले.

पूर, चक्रीवादळ, वीज पडणे अशा आपत्तींच्या अनुषंगाने पूर्वसूचना देण्यासाठी राज्य शासनामार्फत सचेत पोर्टलचा वापर केला जातो. पर्यटन हंगामात पर्यटकांना समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेताना घ्यावयाच्या सावधगिरीच्या सूचनांबाबत प्रथमच या पोर्टलवरून संदेश प्रसारित करण्यात आले.

या सूचनांमध्ये “भरती-ओहोटीची माहिती न घेता समुद्रात उतरू नये, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, लाईफ जॅकेट घालूनच बोटीतून प्रवास करा, गर्दीत जाणे टाळा, आपत्कालीन मदतीसाठी टोल-फ्री १०७७, ११२ वर संपर्क साधा” अशा महत्वाच्या बाबींचा अंतर्भाव होता.

 सूचना दिल्यामुळे पर्यटक समुद्रात उतरताना आवश्यक ती दक्षता घेतील व कोणतीही दुर्घटना घडणार नाही. त्यामुळे प्रशासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे.” असे मत आत्माराम पाटकर, रा.मालवण, कुंभारमाठ यांनी व्यक्त केले.

समुद्रात उतरताना घ्यावयाच्या खबरदारीविषयक सूचना सचेत पोर्टलद्वारे समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना एसएमएस स्वरूपात ३१ डिसेंबर रोजी प्राप्त झाल्या. त्यामुळे पर्यटक अधिक सजग होत असून सुरक्षितपणे समुद्र पर्यटनाचा आनंद घेत आहेत. स्थानिक प्रशासनासाठीही अशा प्रकारचे संदेश अत्यंत सहाय्यभूत ठरत आहेत. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे. असे मत, वेंगुर्ला नायब तहसीलदार राजन गवस यांनी व्यक्त केले.

            भानुदास येरागी, पोलीस पाटील देवबाग यांच्या मते “अशा प्रकारच्या संदेशांमुळे जनजागृती होते. पर्यटनाच्या दृष्टीने अनेक बाबी पर्यटकांना माहिती असतात. मात्र मनोरंजनाच्या नादात काही गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात. प्रशासनाकडून येणारे असे संदेश पर्यटकांना जागरूक ठेवतात आणि जबाबदारीने पर्यटन करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे अशा संदेशांना विशेष महत्त्व आहे.

            आपत्तीपूर्व सज्जतेच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा