You are currently viewing सुखाची गुरूकिल्ली

सुखाची गुरूकिल्ली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (मिशिगन,अमेरिका) लिखित अप्रतिम लेख*

*सुखाची गुरूकिल्ली*
~~~~~~~~~~~~~~
*मन पाखरु पाखरू*
*सैरभैर उडतसे*
*त्याला कसं मी आवरू*
*काही नच कळतसे*

*घाली मनाला आवर*
*जसा बांध शिवारात*
*खत पाणी सुविचार*
*ठेवी मन आनंदात*
असे हे माणसाचे मन एकाच वेळी अनेक भल्या बुर्‍या विचारांनी संभ्रमित झालेले,ज्याला आपण भावना अशी संज्ञा देतो.

प्रेम,भक्ती,माया,मोह,लोभ,हव्यास,शांती,
समाधान,क्रोध अशा असंख्य भावनांनी माणसाचे मन व्याप्त आहे.प्रत्येक जन्माला येणार्‍या प्राण्याची त्याला जे जे हवे असेल ते ते मिळविण्याची कायम धडपड चालू असते.मिळाल्यावर आनंद होतो आणि अपयश आले तर दुःख होते.असा हा मनाचा,भावनांचा खेळ आयुष्यभर चालूच रहातो.त्याला कुठेतरी लगाम नको का?

एखादे आवडणारे वस्त्र जरासे फाटले तर आपल्याला ते टाकवत नाही.मग निष्णात रफू करणार्‍या माणसाकडून आपण त्याला असा काही रफू करून आणतो की परिधान केल्यावर त्या वस्त्राचे सौंदर्य जसेच्या तसे असल्याचे लक्षात येते आणि आपण सुखावतो.मनाचे सौंदर्य टिकविण्यासाठी ह्या वस्त्राप्रमाणेच आपल्या फाटलेल्या भावनानांही असाच रफू करणे आवश्यक आहे असे मला वाटते.हा रफू आहे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण!

आपली मराठी भाषा वळवावी तशी वळते असे म्हणतात,त्यामुळे समोरच्याशी बोलताना,काही संवाद साधताना अतिशय विचारपूर्वक बोलणे गरजेचे आहे.उचलली जीभ लावली टाळ्याला असे कधीही करू नये.कारण त्यामुळे समोरच्याचे मन दुखावण्याची शक्यता असते.

एकदा माझी बहीण मला भेटण्यासाठी आली होती.येताना मला आवडतात म्हणून भाजणीच्या चांगल्या खमंग आणि खुसखुशीत चकल्या तिने आणल्या होत्या.नेमकी त्याचवेळी मी खोकल्याने हैराण झाले होते त्या भरात मी पटकन् बोलून गेले,”वा माझ्या खोकल्यावर चांगला रामबाण उपाय!”बहीणीचा चेहरा खाडकन् उतरला.तिने मोठ्या प्रेमाने माझ्यासाठी काही आणले आणि मी काय बोलून गेले.नंतर चुटपुटून काय उपयोग?भात्यातून बाण सुटून तर गेला.

या ठिकाणी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर हे माणसाचे षड्रिपू मानले जातात.ह्या शत्रूंना वेळीच काबूत ठेवले नाही तर मन कायम अशांतच रहाणार.
समर्थ रामदासस्वामी यासाठीच सांगतात,
*नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे*
*अती स्वार्थबुद्धी न रे पाप साचे*
*घडे भोगणे पाप ते कर्म खोटे*
*न होता मनासारिखे दुःख मोठे*
शरीराला सुख देणार्‍या सार्‍या वस्तू पैशाने मिळविता येतात म्हणून सामान्य माणूस जास्तीत जास्त द्रव्य मिळविण्याची धडपड करतो.त्याला नीति अनीतीचा विवेक रहात नाही.सहाजिकच त्याच्या हातून कळत नकळत
दुष्कर्मे घडतात,पापसंचय वाढत जातो.तो ईश्वराचे प्रेम संपादन करण्यास असमर्थ ठरतो.
अती स्वार्थ हे पापाचे मूळ तर निस्वार्थ हे पुण्ण्याचे मूळ आहे.निस्वार्थी माणूस सुखी असतो कारण निस्वार्थ कर्म करून हाती काही लागले नाही तरी दुःख होत नाही,याउलट स्वार्थ साधून कर्म केले आणि तरीसुद्धा हवे ते मिळाले नाही तर पदरी दुःखच येते.

जगात सर्व सुखी असा कोण आहे? अर्थातच कोणी नाही,कारण लोभ,हव्यास ही भावना!
एक गोष्ट मनासारखी झाली की तृप्त न होता
मनुष्य दुसर्‍या गोष्टीकडे धाव घेतो.मग तिसर्‍या,चौथ्या.असे करत करत त्याचा हव्यास वाढतच जातो.परिणामी तो दुःखी होतो.हव्यासच मनातून काढून टाकला,ही भावनाच रफू केली तर सुख आपोआपच पुढ्यात येऊन पडेल.

सामान्य माणसावर जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा,”माझ्याच वाट्याला हे दुःख का?”असा प्रश्न त्याच्यासमोर येऊन उभा रहातो.या प्रश्नाचे उत्तर एकच.पूर्वसंचित! आपल्या हातून जी बरी वाईट कृत्ये घडतात

त्याचे बरे वाईट परिणाम भोगावेच लागतात.जन्मापासून मरेपर्यंत प्रारब्धानुसार भोगणे आहे असा विचार केला तर सभोवतालच्या सुस्थितीत वावरणार्‍या माणसांचा आपण द्वेश,मत्सर,हेवा करणार नाही.

रावणाचा अंत का झाला? त्याचे साम्राज्य का बुडाले? याचे कारण त्याची दुष्ट कामवासना!सर्व दृष्य वस्तूंवर काळाची सत्ता आहे.आजचे वैभव उद्या असेल याची काहीच खात्री नाही.मग माणसाच्या हातात आहे तरी काय?काळ कसाही असला तरी वासना चांगली ठेवणे माणसाच्या हातात आहे.दुष्ट वासना पोषणारा माणूस वैभवाने उन्मत्त होतो,त्याच्या दुष्कर्मांनी समाज पीडित होतो,काळ फिरल्यावर त्याचे वैभव नष्ट होते आणि तो कालवश झाल्यावर लोक सुटकेचा निश्वास सोडतात.

समर्थ रामदासस्वामी एके ठिकाणी आपल्याला सांगतात,
*मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते*
*अकस्मात होणार होऊन जाते*
*घडे भोगणे सर्वही कर्मयोगे*
*मतीमंद ते खेद मानी वियोगे*
माणूस विनाकारण चिंतीत होत असतो.ज्या घटना घडणे आहे त्या अकल्पितपणे घडून जातात.मानवी जीवनाकडे विशाल दृष्टीकोनातून पाहिले असता माणसावर निसर्गाची शक्ती,जीवनाची शक्ती,मानसिक शक्ती,संस्कृती आणि ईश्वरी शक्ती अर्थात नियती
अशा पाच शक्तींचा अंमल असतो.नियतीच्या आधीन इतर सर्व शक्ती असल्यामुळे जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींकडे शांत मनाने आणि स्थिर बुद्धीने पहावयास शिकले तरच सुखाचा आनंद घेता येईल.

जो आपल्या सर्व विकृत भावनांना वेळीच आवर घालतो,क्रोध,संताप,अहंकार यांच्या आहारी जात नाही त्याला सुखाचा मार्ग निश्चित सापडतो.

आपल्याला वाटत असते…..
*मरावे परि कीर्तिरूपे उरावे*. सत्कीर्ति मागे ठेवायची असेल तर आपले वस्त्र फाटके नसावे,ते मलीन नसावे.निर्मळ,पवित्र,रफू करून का होईना सुंदर,सुशील,सच्चे असावे.

*अरूणा मुल्हेरकर*
*डेट्राॅईट,मिशिगन*

 

संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा