You are currently viewing वाडी वस्त्यांची जातीयवाचक नाव बदलण्याची मागणी

वाडी वस्त्यांची जातीयवाचक नाव बदलण्याची मागणी

मालवण :

११ डिसेंबर २०२० रोजी आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असून या राज्यात गाव, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून सुधारणा करणेबाबत सांगितले होते.

यामध्ये महारवाडा, हरीजनवाडी, धनगरवाडी, चांभारवाडी, भंडारवाडी, तेलीवाडी, बौद्धवाडी अशा अनेक नावांनी जातीवाचक वस्त्यांची नावे व जोडरस्त्यांची नावे परिपत्रक येवून अडीच वर्षे उलटून देखील बदल करण्यात आले नाहीत. ज्या ज्या ग्रामपंचायत प्रभागात या परिपत्रकाप्रमाणे अमलबजावणी केली गेली नाही त्या सर्व ग्रामपंचायतींनी पुढील आठवड्यापर्यंत या नावांमध्ये बदल करण्यासाठी स्थानिक वस्त्यांची भेट घेऊन ते जे नाव सुचवतील ते नाव कागदोपत्री नोंदवून ग्रामपंचायत निधी किंवा स्थानिक वस्त्यांमधील नागरिकांनी मदत केली तर त्यातून सदरील सुधारित नावाचा उल्लेख करणार्या नावाचा बोर्ड लावून सदरील बोर्डाचे स्थानिक सरपंच यांनी अनावरण करुन आपल्या गावात जातीयता नसल्याचे जाहीर करावे. तसेच ही बाब जर पुढील आठवड्यात होत नसेल तर या गोष्टीला विरोध करणाऱ्या सर्वांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करू अशी वंचित बहुजन युवा आघाडी अध्यक्ष रोहन कदम यांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील ज्या ज्या गावात अजूनही वस्त्यांची नावे हि जातीवाच असून ती बदलण्यासाठी जर काही स्थानिक नागरीकांना अडथळे अडचणी होत असतील, येत असतील तर रोहन कदम यांच्याशी थेट संपर्क करा, असे आवाहन कदम यांनी केले आहे. ग्रामपंचायत सदस्य किंवा अन्य कोणीही विरोध करून जातीय तेढ निर्माण करत असेल तर सदरील पूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून नव्याने जातीयता न मानणारा सरपंच बसवण्याचा निर्णय घेण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − ten =