You are currently viewing बिनविरोध सैनिकांची ग्रामपंचायत

बिनविरोध सैनिकांची ग्रामपंचायत

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख

 

रूही गावामध्ये मला अचानक बोलवण्यात आले. सातारा जिल्ह्याचा तीन हजार लोकसंख्येचा हा गाव. सैनिक फेडरेशन, आम्ही सर्व त्या गावांमध्ये रात्री सात वाजता गेलो, अचानक जल्लोष बघायला मिळाला. येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली होते, एवढे मला माहित होते. पण ज्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना भेटलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. सहा महिला आणि चार पुरुष असे ग्रामपंचायतचे सदस्य, हे सर्व सैनिक किंवा सैनिकांच्या पत्नी होत्या. सरपंच देखील सैनिकाची पत्नी होती. मला एवढे आश्चर्य वाटले की मी लोकांना विचारले हे कसे झाले? कारण कुठल्याही गावांमध्ये सर्व सैनिक म्हणून ग्रामपंचायत सहसा निवडून आलेली मी बघितली नाही. चौकशी अंती मला कळले की गावातील सर्व तरुणांनी बैठक घेतली आणि गावकऱ्यांना सांगितले की कुणीही कुठल्याही पक्षाच्या वतीने निवडणूक लढवू नये. ही बाब मान्य झाल्यावर तरुणांनी मागणी केली की, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य हे सैनिक असावे किंवा सैनिकांच्या पत्नी असाव्या. त्याचे कारण म्हणजे सैनिक भ्रष्टाचारामध्ये असत नाहीत व कामकाज सुद्धा शिस्तीने करतील. सर्व गावकऱ्यांनी हे मान्य केले आणि सुरुवातीच्या टप्प्यात सर्व गावकऱ्यांना तरुणांनी प्रोत्साहित केले की कुणीही ग्रामपंचायत निवडणूक मध्ये उभे राहू नये. ते सर्वांनी मान्य केले आणि मग निवडून चार सैनिक आणि सहा महिला अशा उभ्या करण्यात आल्या व बिनविरोध ग्रामपंचायत निवडून आली.

सत्कार समारंभामध्ये सर्व लोकांनी हाच विषय मांडला की जर का निवडणूक सर्वांच्या एकोप्याणे झाली तर गावामधील तंटा, स्पर्धा संपेल आणि सर्व गावकरी लोक एकसंघ होतील व गावाचा विकास अगदी जलदगतीने होईल. मला या बाबीचा आनंद होणं साहजिक आहे, त्याचे कारण पहिल्यांदाच पूर्ण गावाने सैनिकांवर विश्वास दाखवला. म्हणून मी म्हणालो की सर्व गावांनी विश्वास दाखवल्यामुळे आता आपल्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आली आहे. जर का आपण सैनिकांनी या गावाचा विकास आणि गावाचे वातावरण चांगले केले तर सर्व सैनिकांचे नाव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशांमध्ये प्रसिद्ध होईल.

पण काम म्हणजे काय? त्याबद्दल चर्चा झाली व कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांनी बनवलेला कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आहे. मी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना विनंती केली की तुम्ही एकसंघ झालात, एकत्र काम करत आहात म्हणजे अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली आहात. तुम्ही तसेच एकसंघ राहिला तर पाच वर्षात तुमचा गाव समृद्ध होईल, आनंदी होईल. म्हणून समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प प्रस्थापित करण्याचा मी सल्ला गावकऱ्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांना सुचवलं की गावातले सर्व लोकांना एकत्र करून गावातला जो टॅलेंट आहे किंवा हुशार लोक आहेत त्यांना एकत्र केले पाहिजे. म्हणून गावचे लोक आणि पुणे मुंबईत आपले नाव कमावलेल्या लोकांना एकत्र करून एक गाव विकास कृतिदल बनवावे. त्याचप्रसंगी त्याच गावाचे अॅडव्होकेट शेलार हे मुंबई पुण्याला वकिली करत आहेत ते उपस्थित होते. त्याचबरोबर डॉक्टर कुलकर्णी सुद्धा गावात येऊन लोकांना हृदयरोगास संबंधित कॅन्सरवर उपचार करतात. पाणी फाउंडेशनचे श्री. लाड व श्री. शिंदे यांनी त्या गावांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे व दुष्काळी गावांमध्ये आता पाणी पंधरा फुटावर त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांचे कौतुक करताना मी म्हणालो की समृद्ध आणि आनंदी गावाचा पाया तुम्ही आधीच रोवला आहे. त्यावर सर्व गावांनी विचार करून एक योजना बनवावी व पुढच्या काळात ती अंमलात आणावी. समृद्ध आणि आनंदी गावांमध्ये काय काय केलं पाहिजे याच्याबद्दल गावकऱ्यांशी चर्चा करून पुढील विषय मांडले.

७० वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो आहोत. गावातील सर्व आकर्षण नष्ट करून लोकांना शहरात झोपडपट्ट्यांमध्ये रहायला धाडण्यात आले आणि कोरोनाच्या तावडीत अडकवण्यात आले. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा ८०% लोक गावात होते. त्यांचा व्यवसाय शेती होता. भारतात ५२% जमीन शेतीलायक आहे. १२ महिने सुर्य आहे. वर्षाला ३ पीक घेण्याची क्षमता या देशाची आहे. पण जिथे जिथे उद्योग उभे राहिले तिथे तिथे शहरे वाढत गेली आणि जीवनशैली ही शहरी बनत गेली. बहुसंख्य लोक शहरात राहत असल्यामुळे राजकीय आणि आर्थिक धोरणे सुद्धा शहरी बनत गेली. भारताचे राज्यकर्ते आणि तत्त्वज्ञानी सुद्धा ऑक्सफर्ड, केंब्रिजमध्ये शिकलेले होते. ज्याप्रमाणे आपण ब्रिटीशांचे कायदे भारतात लागू केले, त्याचप्रमाणे आर्थिक विकासाचे तत्वज्ञान सुद्धा इंग्लंडमधील लागू केले. त्यामुळे भारतात शेतीला नगण्य स्थान मिळाले. देशात संपत्ती वाढून सुद्धा ती शहरातल्या एका विशिष्ट गटाकडे गेली आणि शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली.

तरुण शहराकडे धावू लागले. जगातील खनिज, जंगले, निसर्ग उद्धवस्त करून शहरी जीवन आणखी सुखमय, विलासी बनवण्यात माणुसकी जळून गेली. म्हणून वेळ आली आहे की प्राप्त परिस्थिती बदलण्यासाठी, आनंदी जीवनाचे खरे रहस्य उलगडण्यासाठी एक नवीन दिशा घेऊन मानवी जीवन सुखी आणि समृद्ध केले पाहिजे. जीवनाची संकल्पना आनंद आणि समृध्दी आहे. गावांचा सामुदायिक विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. समृद्ध गाव हाच उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही स्थानिक आमदार, लोक प्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुंबई मंडळ, कृषि अधिकारी, शिक्षक, आरोग्य सेविका, बचत गट महिला प्रतिनिधी, गावातील सक्रीय लोक यांच्या उपस्थितीत गावांमध्ये अनेक बैठका घेतल्या. बैठकांमध्ये गावामध्ये आनंदी आणि समृद्ध समाज कसा बनवता येईल यावर चर्चा करून एक विकास आराखडा बनवला आहे. तशाच प्रमाणे रूही गावात देखील आपल्याला विकास आराखडा बनवला पाहिजे.

समृद्ध गाव प्रकल्पाचे उद्दिष्ट गावातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे व प्रत्येकाला स्वावलंबी करणे हे आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तु गावातच बनवण्याची व्यवस्था बनत आहे. त्यायोगे गावातील पैसा गावातच ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचा पैसा गावात आला पाहिजे. म्हणून गावातील तयार माल बाहेर विक्रीला गेला पाहिजे. नैसर्गिक शेती पद्धतीच्या माध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे. रासायनिक खते आणि किटकनाशक गावातून तडीपार केली पाहिजेत. त्याचबरोबर गावातील पिकांच्या स्थानिक जातींचे संवर्धन करून, औषधी वनस्पतींचे देखील उत्पादन केले पाहिजे. त्यातून गावातील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून गावातील पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.

सर्वात प्रथम गावकर्‍यांचे आरोग्य इतके मजबूत केले पाहिजे की रोग नावाची गोष्ट गावात कुणालाही होऊ नये. त्यासाठी पोषक आहार तसेच योग व क्रीडा यांच्या सोयी सुविधा निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक स्त्रीने व्यायाम केलाच पाहिजे. सकाळी महिलांनी एकत्र येऊन योगा करावा किंवा खेळ खेळावा. स्त्रियांनी हे करणे म्हणजे ग्रामीण जीवनात आश्चर्य वाटण्यासारखे आहे. पण सुरुवातीला कुठलीही नवीन आणि चांगली प्रथा हास्याचा विषय होतो. पण त्याला न जुमानता आपल्यासाठी आपणच बदल केला पाहिजे. म्हणून गावामध्ये क्रीडांगण व खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे. आरोग्य नंतर दूसरा सर्वात महत्त्वाचा विषय रोजगार आहे. रोजगारातूनच समृद्धी येईल. जसे आजकाल अंबानी-अडाणी आणि शहरात राहणार्‍या निवडक लोकांना श्रीमंत करण्यात येत आहे. तसेच गावात सुद्धा उद्योग उभारले पाहिजेत. गावाकडे बघण्याचा दृष्टीकोण एक दरिद्री गरीब गाव बदलून एक श्रीमंत गाव म्हणून परिवर्तित झाला पाहिजे. त्यासाठी सर्व गावकर्‍यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षित करण्यात येईल व नैसर्गिक शेतीबरोबर उद्योजक करण्यात येईल.

सांस्कृतिक चळवळीतून जीवन आनंदी करता येते. सणवार तर आहेतच पण ग्रामीण लोकांचे लक्ष कला-कौशल्याकडे वळविले पाहिजे. उदा. प्रत्येकाने एक तरी वाद्य वाजविले पाहिजे किंवा गायन केले पाहिजे, आनंद आला पाहिजे नाहीतर जीवन रुक्ष होते. प्रत्येक गाव हे Wi-Fi युक्त पाहिजे, म्हणजे गावातील लोकांना जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी काही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध करता येतील. गावातील शेतमालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेता येईल व त्या आधारावर उद्योग सुद्धा उभारता येतील. कृषि माल व बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध होईल. अशाचप्रकारे गावामध्ये स्वच्छता, पर्यावरणावर लक्ष दिले पाहिजे. गावात लागणारी वीज गावातच निर्माण झाली पाहिजे. अशा आणि अनेक योजना गावातील कृतिदलाने निर्माण केल्या पाहिजेत. ढोबळ मनाने गावाच्या विकासाची संकल्पना सर्व लोकांसमोर ठेवली व पुढील पाच वर्ष आम्ही सर्व सैनिक या गावच्या विकाससाठी कटिबद्ध राहू.

 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + seventeen =