You are currently viewing एकांत हा कधीतरी हवाच.!!!

एकांत हा कधीतरी हवाच.!!!

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखीत अप्रतिम लेख*

*एकांत हा कधीतरी हवाच.!!!*

*”शांतविण्या तप्त जीवा*
*एकांत वाटे हवाहवा*
*लागता अविट गोडी*
*नवचैतन्याची खास दवा*”…

होय …. एकांत हा कधीतरी हवाच .!!!!!
साधे उदाहरण घ्या ना. जेंव्हा गर्दीत आपण जातो तेव्हा गर्दीतून पट्कन कधी बाहेर येईल असे होते मग गर्दीतून बाहेर आलो की आपण दूर एकटेच उभे राहतो आणि मोकळा श्वास घेतो….मग बरे वाटते. दुसरे उदाहरण म्हणजे पिके जरा दाटीत उगवली तर आपण ती उपटून टाकतो आणि त्यांना स्पेस ठेवतो म्हणजे तिथे त्यांना मोकळी जागा मिळाल्यामुळे त्यांची वाढ जोमात आणि छान होते…..
अगदी तसेच माणसांचे आहे.. तो सुद्धा मोकळे जगू पाहतो. पण हल्ली असे जगणे नाही नशिबाला.खूप दगदग धावपळ सदा कशात ना कशात माणूस गुंतलेला असतो . त्यात शहरवासियांना तर खूपच धावपळ. घड्याळाच्या काट्यावर त्यांचे जीवन.निवांतपणा हा जराही नाहीच. आराम नाही. मन शांत नाही .मग चिडचिड होते. विचार करण्यास निवांत वेळ न मिळाल्यामुळे घाईत निर्णय घेतले जातात. मग घाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप ही तितकाच होतो. प्रत्येक वेळेस गर्दी,गडबड ,गोंधळ माणसांची ये-जा .यात त्याच्या मनाची घुसमट होते.. निवांत एकांत हा प्रत्येकाला पाहिजेच. एकांताने मन शांत होते तर विचारांची प्रगल्भता वाढते. योग्य निर्णय विचार करून घेतले जातात. शिवाय आपण जरी चुकीचे काही निर्णय घेतले तरी मग आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि काही अंशी प्रयत्नही करतो चुक सुधारण्याचा…. एकांताचा छान अजून एक फायदा असा आहे की काही गोष्टी मनातच राहतात. कुणाला सांगू शकत नाही . मग अशावेळी एकांतात बसून त्या वेदनांना त्या प्रश्नांना पुन्हा पुन्हा आठवून मनमुराद रडून मोकळे सुद्धा होतो .आणि मग खुप हलकं हलकं वाटतं.

*नको नको येऊ सरी*
*उरी उमाळा दाटला*,
*वेदनेच्या कल्लोळी गं*
*काठ पापणी भिजला*…

*मी बसते एकांती जेव्हा*
*स्वारी स्मृतीची निघते*
*गूज सांगते वाऱ्याला*
*देहभान सारे विसरते*!!!!!

असे एकांतात मन मोकळे होते.काही काळ का होईना आपण शांती सुख अनुभवतो..मन हे खूप चंचल असल्यामुळे ते सतत कोणत्या ना कोणत्या विचारात गुंतलेलं असते. मग त्याच्यावर खूप ताण येतो. मग झोप नाही, भूक नाही ,कशात रस नाही, नैराश्य, चिडचिड अशा गोष्टींना सामोरे जावे लागते …..म्हणूनच एकांतात असे मन शांत करावे लागते.
*मन पाखरू पाखरू*
*याला कसं गंआवरू*
*मिळता जरा एकांत*
*लागते पुन्हा सावरू*.!!!!

अशा एकांताने मनावरच्या ताणाला आराम मिळतो. नव्या विचारांना चालना एकांताने मिळते. बघा ,कोणी कवी, लेखक असे लोक किंवा कुणाला काही छान लेखन करायचे असल्यास ती व्यक्ती एकांतच जास्त पसंत करते. कारण एकांतात मन एकाग्र होते. मन एकाग्र झाले की जीवनाची गाडी छान चालते.. पटापट सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता अंगी येते. म्हणूनच…

“एकांत हा कधीतरी हवाच,
जीवन गाडी सुसाट धावेल तेंव्हाच.”!!!!!

*एकांताचा या क्षणी*
*विसावले शांत वनी*,
*आत्मिक सुखाचा हर्ष*
*अनुभवला मनोमनी*……..

*लेखिका*…
*सौ पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे*
9011659747.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =