You are currently viewing दृष्टी..

दृष्टी..

माणसाचा स्वभाव…

 

‘मेल्याशिवाय स्वभाव जात नाही’ अशी मराठीत एक म्हण आहे.या म्हणीच्या आहारी गेल्यामुळे मानव जातीने स्वत:चे फार मोठे नुकसान करून घेतलेले आहे.मेल्याशिवाय स्वभाव जात नाही,याचा भावार्थच असा की,माणुस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचा जो काही बरा-वाईट स्वभाव आहे,तो मरेपर्यंत तसाच राहणार.या सिद्धांताच्या आहारी गेल्यामुळे माणसे आपला स्वभाव मरेपर्यंत कुरवाळीत राहतात व त्या स्वभावामुळे त्यांच्या जीवनात जे बरे-वाईट प्रसंग निर्माण होतात, ते सर्व प्रसंग ‘नशीबच तसे’ असे मानून जीवनाचा गाडा कसा तरी ढकलीत राहतात.जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. ‘ *स्वभाव बदलता येतो’ असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.माणसाच्या वाट्याला बरे-वाईट नशीब येते याला त्याचा स्वभाव कारणीभूत असतो.तेव्हा स्वभाव निर्माण होतोच कसा हे या संदर्भात पाहणे आवश्यक आहे.या स्वभावाची निर्मिती माणसाच्या सवयीतून होते.या सर्व सवयी माणसाच्या नित्य कर्मातून निर्माण होत असतात आणि माणसाच्या सर्व नित्य कर्माना त्याच्या ठिकाणी नित्य निर्माण होणारे विचार कारणीभूत असतात.याचाच अर्थ असा की विचारांतून कर्मे निर्माण होतात,कर्मातून सवयी व सवयीतून स्वभाव निर्माण होऊन शेवटी नशीब साकार होते.म्हणून विचार बदला म्हणजे स्वभाव व नशीब बदलेल असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे.विचारांवर प्रभुत्व आणून स्वभाव बदलणे सामान्य माणसांना कठीण असते.यावर ‘संगती’ हा रामबाण उपाय आहे,कारण जशी संगती त्याप्रमाणे माणसाची मती साकार होत असते.चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याने माणसाच्या मनात चांगले विचार आपोआप निर्माण होऊ लागतात.याच्या उलट वाईट लोकांच्या संगतीत राहिल्याने माणसांच्या मनात अनिष्ट विचार निर्माण होतात.म्हणून विचारांवर प्रभुत्व आणून स्वभाव व नशीब बदलण्याचा रामबाण व सोपा उपाय म्हणजे संत संगतीत किंवा सज्जन लोकांच्या सहवासात राहणे हा होय.थोडक्यात,’सज्जन लोकांच्या संगतीत राहण्याने जीवनाचे सोने होते तर दुर्जन लोकांच्या संगतीत राहण्याने जीवनाची माती होते’ हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात घेऊन माणसाने संगत धरण्यात सदैव सावध असले पाहिजे.*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा