You are currently viewing गुढीपाडवा

गुढीपाडवा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास ते नक्षत्र वेल समूह सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांचा गुढीपाडव्या निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख

गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणसांचे नववर्ष. हिंदू कालदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. यावर्षी २ एप्रिल रोजी महाराष्ट्रात गुढीपाडव्याक्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुका काढल्या जातात, देखावे उभारले जातात,त्याचप्रमाणे सार्वजनिक पूजाअर्चा केल्या जातात. गुढीपाडव्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची प्रथा आहे. मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये बांबूची काठी धुवून त्यावर गुढी उभारली जाते परंतु कोकणात मोठ्या प्रमाणावर बांबू उपलब्ध असल्यामुळे दरवर्षी दारात उभारली जाणारी गुढी ही नवीनच बांबूची काठी तोडून त्यावर उभी केली जाते. घरोघरी दारासमोर पाट ठेऊन त्याच्याभोवती रांगोळी काढून बांबूच्या काठीला कडुलिंब, आंब्याचे टाळ, साखरेची माळ, फुलांचा हार व त्याच्यासोबतच रेशमी वस्त्र, त्यावर स्टीलचा किंवा तांब्याचा लोटा हळद, पिंजर आदींची नक्षी करून बांबूच्या काठीला बांधलं जातं. व मांगल्याचे प्रतीक म्हणून दारात गुढी उभारली जाते. कोकणात गुढीची पूजा करण्याची सुद्धा प्रथा प्रचलित असून गुढीला दिवाबत्ती देखील केली जाते.
गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात…. श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवून सीतेसोबत ज्यावेळी ते अयोध्येत परतले, त्यावेळी अयोध्येत दारादारावर रांगोळी काढून श्रीरामाच्या विजयाचे प्रतिक म्हणून मांगल्य व विजयाची गुढी उभारली होती. तेव्हापासून ही प्रथा महाराष्ट्रात रूढ झाली. आजही गुढीपाडवा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जग कितीही सुधारलं, अगदी आधुनिकतेकडे झेप घेतली तरीही गुढीपाडवा या सणाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. भविष्यात पुढील पिढीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक सण दिशादर्शक ठरावा यासाठी आजच्या पिढीने सर्व सण उत्साहाने साजरे केले पाहिजेत. वास्तविक पाहता हिंदू संस्कृती मध्ये साजरे केले जाणारे सण हे पूर्वजांनी काही ना काही उद्देश समोर ठेवूनच सुरुवात केलेली आहे. चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटते, झाडांवर फळे, फुले मोहरून…बहरून येतात, आणि वसंत ऋतुच्या आगमनाने सारी सृष्टी वसंतोत्सव साजरा करते. त्यामुळेच फळा फुलांनी बहरलेल्या वसंतोत्सवात गुढीपाडवा हा सण तेवढ्याच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू समाजात अगदी पूर्वीपासूनच निसर्गात होणाऱ्या बदलांचे उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला देखील निसर्गात होणाऱ्या बदलानुसार, चैत्र महिन्यात वाढलेला उष्मा कमी करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात, वाढत्या उष्णतेमुळे माणसाची पचनशक्ती बिघडते म्हणूनच कडुलिंब, ओवा, मीठ, साखर हे मिश्रण वाटून पूर्वीचे लोक खात असायचे. त्यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत मिळते, पित्ताचा त्रास त्रास कमी होतो, उष्णते मुळे उद्भवणारे त्वचा रोग बरे होतात. घरात साठा केलेल्या धान्याला लागलेली कीड कडुलिंबाच्या पानांमुळे नाहीशी होण्यास मदत मिळते, शरीराला थंडावा मिळतो असे एक ना अनेक गुणधर्म असलेला कडूनिंब दारात उभारलेल्या गुढीमध्ये बांधला जातो.
गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. ही गुढी म्हणजेच विजयपताका उभारण्याचा आनंद व्यक्त होत असतो…. म्हणूनच गुढीच्या सभोवती रांगोळी काढली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी पुरुष व महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणूक काढण्याची पद्धत ही रूढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महिला नऊवारी साडी परिधान करतात, त्याच प्रमाणे पुरुषही धोती सलवार कुर्ता अशा वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करून, लेझीम पथके, ढोल-ताशांच्या गजरा मध्ये भव्यदिव्य देखावे उभारून शोभायात्रेने नवीन वर्षाचे स्वागत करतात. जग जसं सुधारते….डिजिटल होत जाते तसतसे हिंदू संस्कृती नवीन पिढी विसरत चालल्याचे दिसत आहे. इंग्रजी संस्कृतीच्या जाळ्यात मराठी संस्कृती अडकून राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या तरुण पिढीला आणि सुधारलेल्या…. पुढारलेल्या इंग्रजी बडगा घेऊन वावरत असलेल्या लोकांना आपल्या प्राचीन, पवित्र सणांची माहिती करून देणे ही काळाची गरज बनली आहे. हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील संस्कृती नव्या पिढीच्या मना मनावर बिंबवली तरच भविष्यात हिंदू संस्कृती टिकणार आहे… आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातील नव्या पिढीला हिंदू सणांची आणि हिंदू संस्कृतीची माहिती करून देणे अत्यावश्यक आहे.

अमावास्या संपून आकाशात चंद्रकोर दाखल होते…..
ती म्हणजे प्रतिपदेचा चंद्र…
हा प्रतीप्रदेचा चंद्र कले कलेने वाढत जातो…
आणि,
पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्रगोलात परावर्तित होतो,,
म्हणून त्याच चंद्रकोरीपासून प्रेरणा घेऊन,
आपणही सर्वानी कले कलेने वाढत जावे,
नवीन वर्षाची आपली उद्दिष्टे पुर्ततेस न्यावे,
आणि चंद्रासारखं तेज धारण करून
आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचं, मित्र परिवाराचं आयुष्य प्रकाशमान करावे…..

*गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या तेजोमय शुभेच्छा… 🚩🚩*

© {दीपी}
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा