You are currently viewing सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्री व खासदारांनी कोरोनाच्या बाबतीत उंटावरून शेळी हाकण्याचा प्रकार केल्यास…

सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्री व खासदारांनी कोरोनाच्या बाबतीत उंटावरून शेळी हाकण्याचा प्रकार केल्यास…

बोलाची कढी व बोलाचा भात राहील व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासारखी परिस्थिती राहील.

सिंधुदुर्ग :

ओरोस जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांची जी आज परिस्थिती आहे, ती पाहता शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या नाकर्तेपणा मुळे झालेली आहे. कोरोना टेस्ट करण्यासाठी मा. नारायणराव राणे साहेब यांनी स्वतःची एसएसपीएम हॉस्पिटल पडवे येथे जागा दिलेली होती. परंतु पालकमंत्री व शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधामुळे त्याठिकाणी राजकारण करून विरोध केला. त्याचप्रमाणे एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज हरकुळ बुद्रुकची जागासुद्धा कोव्हिड सेंटर म्हणून दिलेली होती. परंतु ती सुद्धा राजकारण करून नाकारली गेली.
एसएसपीएम हॉस्पिटल पडवे व एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज हरकुळ बुद्रुक येथे वेळीच परवानगी दिली असती तर कोरोनाची साथ वेळीच आटोक्यात आली असती व आजची परिस्थिती वेगळी दिसली असती.

जिल्हा रुग्णालयांमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी परिस्थिती आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये पिण्याचे पाणी नाही, शौचालयात दरवाचा नाही, शौचालयांमध्ये पाण्याची सोय नाही, रुग्णांना बाहेरून प्रत्येकी १५ रुपये खर्च करून बिसलेरी पाणी विकत घेऊन शौचालयाला जावे लागते, रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणून देण्यासही परवानगी नाही. यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्ण दगावण्याची दाट शक्यता आहे. आताचे पालकमंत्री हे पाहुण्यासारखे जिल्ह्यात येतात व जातात.

याउलट २०११-१२ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लेप्टोची साथ होती. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नारायण राणे साहेब होते. कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती लेप्टोच्या साथीची होती. प्रत्येक घरात चार ते पाच रुग्ण लेप्टोचे होते. जिल्ह्यात औषधे नव्हती. ऑक्सिजनचा तुटवडा होता. बेडचा तुटवडा होता. हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती. त्यावेळी मा. राणे साहेब दररोज स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आढावा घेत असत. जिल्हा रुग्णालयाच्या स्टोअरमध्ये जाऊन औषधांचा साठा, ऑक्सीजन सिलेंडर यांची पाहणी करून उपलब्ध नसतील तर स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून उपलब्ध करून देत असत. त्यावेळी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता होती.

त्यावेळी सांगली, कोल्हापूर व नाशिकवरून डॉक्टर जिल्ह्यात बोलावले जात असत व रुग्णांवर उपचार केले जात असत. त्यावेळी ॲम्बुलन्सची कमतरता होती. तेव्हा मा. राणे साहेबांनी दोन ॲम्बुलन्स स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून दिले होते. हे सर्व पाहता सत्ताधारी लोकप्रतिनिधी उंटावरून शेळी न हाकता रुग्णांच्या अवस्थेकडे लक्ष देऊन, प्रत्यक्ष पाहणी करून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता कोरोना रुग्णांची संख्या कमी कशी होईल व मृत्यूदरात घट कशी होईल हे पाहणे गरजेचे आहे. अश्या आशयाचे निवेदन पत्र भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी मांडले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + four =