You are currently viewing “बाई”

“बाई”

महिला दिन विशेष…

मागे अहमदनगर ला माजी खासदार तथा जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख ह्यांच्या घरी गेलो होतो, मला आमंत्रण होत औचित्य होत त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताच, अनेक मान्यवर मंडली होती, सामाजिक कार्यकर्त्या हुजूरुक जी , विज्ञानवादी रघुनाथ जी माशेलकर आणि जेष्ठ संगीतकार गीतकार माझा कवितेचा प्राण गुलजारजी, जीवनाच्या महत्वाच्या पर्वणीतला ती एक दिवस होता, तरी पण मला ह्या पेक्षा तिथल्या एकाच व्यक्तीला नमन करावंसं वाटलं ती गडाखांची बहीण श्रीमती अक्का… मी वयस्क म्हणून तिच्या पायावर मस्तक ठेवणारच होतो, पण त्या अगोदर गडाख म्हनाले, विशाल ही माझी प्रेरणा आहे.! मला माहिती सांगितली आणि माझ्या डोळ्याच्या कडाच पणावल्या.. पण त्याच बरोबर मला माझी बहिण आठवली, ती म्हणजे पूर्वीची संजीवनी भाऊराव मुळे आजेगावकर आणि आत्ताची संजिवनी हनुमंतराव कुलकर्णी इटोलकर…

आम्ही भावंड हिला “बाई” म्हणतो, पण आम्हाला माहीत नव्हतं आमची बाई, ही खरोखरच अंगणवाडीतल्या अनेक मुलांची बाई होईल. बाईच लग्न मला चांगलं आठवत ,मी तसा लहानच होतो पण आठवत मी ६/७ वर्षात असेन, बाईच लग्न रिसोडला झालेलं..
आज बाईकडे पाहिलं की समाधान वाटत, ऊर्जा मिळते, बाई पराकोटीची सहनशील आहे.
बाईसाठी इटलीच्या कुलकर्णी पिरिवाराच स्थळ आलेलं, घराणे चांगले, जमीनदार, गावात मान होता, बाईच लग्न झालं, दिवसा मागुन दिवस जात होतें, संसार चालू होता आनंद वाढत होता, बाईच्या जीवनात अनिरुध्द नावाचं कोकरू आलं, आणि पुढच्या काही महीन्यात होत्याच नव्हतं झालं, भाऊजी ना कर्करोग झाला, त्या काळात खुप पैसा लावला, आमच्या भाऊंनी सुद्धा (भाऊराव जी मुळे) खुप प्रयत्न केले पण नियतीला बहुधा हेच मान्य होत, बाईच्या जीवनात अंधार पसरला, राजहंस सुटून कावळा हातात यावा, हेम हरपून कोळसा मिळावा असा प्रकार झाला…

बाईच लग्न १६ व्या वर्षी, अनिरुद्ध झाला १८ व्या वर्षी आणि बाईला वैधव्य आलं १९ व्या वर्षी. नियतीचा क्रूर खेळ नेमका ह्या सहनशील बाईच्याच नशिबात का यावा, हा परमेश्वराला प्रश्न आहे.. नेमकं काय करावं परिवार हैराण होता, इतक्या तरुण वयात बाई विधवा झाली होती, समाज काय म्हणेल ह्याची भीती होती, पण आमचे भाऊने धाडस करून विचारलंच पित्याने काळजावर दगड ठेऊन वर्षभरा नंतर बाईच्या उर्वरित आयुष्याच्या संदर्भात काळजीचा प्रश्न विचारला, संजू पुढे काय करायचं ठरवलंस..! बाई निर्णयाच्या स्वरात म्हणाली , भाऊ मी माझ्या मुलासोबत आयुष्य काढणार तिचा निर्णय स्वर पाहून भाऊने पुन्हा विषय काढला नाही..

बाई आमच्यासाठी आदर्शच, पतीच्या घरात ती एकटी होती अस नाही , तिच्या दीर, भावे, जावा , अतिशय सुरेख तिला सांभाळत होतें, आणि आहेत सुद्धा, बाईने स्वताच एक लक्ष्मणरेषा काढून घेतलेली, घराण्याची इभ्रत सांभाळली, अख्ख तरुणपण बाईन जाळलं, आयुष्यभर हे व्रत ती सांभाळत आहे. बाई भाऊजीच्या निधना नंतर शिकली आणि आपल्या एका मुलावर योग्य संस्कार करत असताना बाईने छोट्या मुलात मन रमविण्यासाठी शिक्षिका झाली.

कुटुंब व्यवस्थेत मतभेद होतात, घर फुटतात हे ती पाहत होती , पण ह्यातही तिने संयम सोडला नाही…
बाई खुप संयमी होती, पण तिला खलखळून रडताना मी केवळ एकदा पाहिलं, आमच्या काकू गेल्या तेंव्हा कदाचित तिला वाटत असेल की आता माझा मूळाधार तर केंव्हाच गेला हिता, आता आई चा आधार सुद्धा गेला, पण आमचे भाई नागेश आणि वहीनी सौ.सपना पण तिची आजही काळजी घेतात…

सध्या कुटुंब व्यवस्था झपाट्याने बदलत आहे, पूर्वीची एकमेकांना धरून राहण्याची संकल्पना आज अस्ताला जात आहे, मी माझी बायको, माझी मूल, या पलीकडे कोणाला कोणाचं देणंघेणं नाही ही पसरत चाललेली प्रवृत्ती, अश्या वेळेस बाईच्या मनात काय चालत असेल असं मला वाटत, तेंव्हा तिचा अनिरुद्ध वरचा विश्वास रस्ता देतो…

आज विज्ञानाची झेप खूप आहे,प्रगतीचा झपाटा विलक्षण आहे, भौतिक सुखे हात जोडून उभी आहेत, पण त्याच बरोबर अंधश्रद्धा, रूढी ,परंपरा, काळ बद्ध होत चाललेले नीती नियम, पण ह्यात सामाजिक सुधारणांचा वेग म्हणावा तसा नाही, शेकडो वर्षा पूर्वी स्त्री चा बळी जात होता ती आज ही जातो, आज तिलाच हे भोगाव लागत, आजही समाजात बाई सारख्या हजारो, विधवा, बालविधवा, परित्यक्ता आहेत, जर ह्यांच आयुष्य बदललं असत तर ह्या स्त्री शक्तीचा दिवस साजरा करण्याची गरज नसती पडली…

आज सर्व महिलांना नमस्कार करतांना बाई एवढं म्हणेल, बाई तुझ्या चरणांची पायधूळ जरी मला लागली तरी मी धन्य आहे.. बाई मी तुझ्या बाबतीत नियतीला दोष दिला ,पण बाई तू कोणाला दोष देतेस… तर माझ्या मते बाईचे शब्द एक कवींच्या तोंडून पडतात, ते असे…

अजी दुःख किती येई मम वाट्याला ।
नववधू झाली अबला ।।
मज बापाने, वर जो शोधून आणला ।
तो ठाऊक नव्हता मजला ।।
मी नुकतीच ग, लग्ना मुलगी झाली ।
अंगावर परकर चोळी ।।
तो नवरा ग, कसला असतो बाई ।
मज समजत नव्हतेच जास्त काही ।।
तो मांडव कोना करता ।
आई सांगे लग्ना करता ।।
बाळीच्या प्रेमा करता ।
आई बाप किती नटले त्या लग्नाला ।।
नच शब्दच वर्णायाला ।
जे कुंकू मी लावीयले भाळाला ।।
ते पुसले काहीच दिवसाला ।
का दिलेच असले मजला ।।
नच दोष कुणा मी दिधला ।
परी दैवाचा तो घाला ।।
मी धावा करू कोणाचा ।
मज सोडवी तु भगवंता ।।

आज बाई ४२ वर्षाची आहे, आपला मुलगा अनिरुद्ध आणि ती सन्मानाने जीवन जगत आहे, आदर्शवत आहे, बाई खुप चांगल्या प्रकारे शेतीवर लक्ष देते, शाळा चालवते, अनेकांना बाईच आता आधार वाटते, बाई कडे पाहून अनेक आपल दुःख विसरून जातात, कारण तर त्यांच दुःख हे बाई एवढं कधीच नसत, मला खूप ऊर्जा देते आमची बाई, आज अनिरुद्ध 21 चा आहे, आता बाईला तो आधार झालाय, आणि ती ही योग्य आहे बाईचेच संस्कार त्यावर आहेत आणि त्या संस्कारावर माझा पुर्ण विश्वास आहे, काळजी घेईल तो बाईची…

माझ दुःख किती मोठ आहे, माझ्या जीवनात अनंत अडचणी आहेत, संकटांनी भरलेला रस्ता आहे, विहिर खुप लांब आहे पण विशाचा प्याला जवळ आहे, अशाही संकटात बाईला आठवाव, म्हणजे आपले प्रश्न चुटकी सरसी सूटतात, आणि हो संकटांची सवय झाली की संकट येत नाहित, हा माझा अनुभव आहे, जे मिळाल त्यात आनंद जसा बाई मानते तसाच मी तिच्या आदर्शवादी विचारावर चालतो..

आज महिला दिनानिमित्त मी बाईच्या चरणांवर नत होईल… आणि त्या सर्व स्त्री शक्तीला प्रणाम करेल…

विशाल मुळे आजेगावकर. ९९२३२२५२५८

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 6 =