*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*युद्ध…*
————————————–
दया, क्षमा अन प्रेम, करुणा सांगत गेले बुद्ध
‘पंचशील ‘चे तत्व पाळू या नकोच आता युद्ध
विजय पताका कुठेच नसते केवळ होते हार
पिढ्यापिढ्या मग त्या जखमाचा सोसत बसते भार
नाश केवढा पृथ्वीचा हा जरा ठेवू या शुद्ध
‘पंचशिल’चे पालन करू या नकोच आता युद्ध
अहंकार अन सत्ताकांक्षा वाढत गेली किती
भूक राक्षसी बदलत गेली जगण्याचीही भिती
पृथ्वीवरच्या आक्रमणाने निसर्ग होतो कृद्ध
‘पंचशिल’चे तत्व पाळू या नकोच आता युद्ध
‘जगा जगू दया “भारतियांचे जुनेच आहे तत्व
परंपरेने हाती आले अंगीकार तू सत्व
प्रेम, अहिंसा संदेशाला नकोस विसरू खुद्द
‘पंचशील’चे तत्व पाळू या नकोच आता युद्ध
श्रीनिवास गडकरी
पुणे
