You are currently viewing अभंगवाणीने भाविक मंत्रमुग्ध

अभंगवाणीने भाविक मंत्रमुग्ध

*अभंगवाणीने भाविक मंत्रमुग्ध*

*पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव – द्वितीय पुष्प*

पिंपरी

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात किराणा घराण्यातील गायक भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी यांनी ‘स्वरसमर्थ अभंगवाणी’ या सांगीतिक भक्तिसंगीताच्या मैफलीच्या माध्यमातून बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी द्वितीय पुष्पाची गुंफण केली. याप्रसंगी माजी नगरसेवक मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘ओम नम: शिवाय’चा गजर करीत मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. ‘मोरया गणराया मी नमितो तुमच्या पाया…’ , ‘अक्कलकोटी आलो तुमच्या दारात…’ अशा प्रत्येक भक्तिरचनांच्या प्रारंभी अन् शेवटी ‘महाराज श्री स्वामी समर्थ’ अथवा ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ यासारख्या नामघोषांचा अंतर्भाव केल्याने नकळत भाविक श्रोत्यांनी टाळ्यांचा ठेका धरीत साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक दिनकर जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानाला उत्तर देताना जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मैफलीच्या उत्तररंगात
‘स्वामींच्या दरबारी काय कमी?…’ , ‘नरसोबाच्या वाडीला जाऊ चला…’ , ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी…’ या लोकप्रिय भजनाने भक्तिरंग अजूनच गडद झाला. स्वामी समर्थ यांचे शिष्य शंकरमहाराज यांच्या लीला वर्णन करणाऱ्या गीतांमध्ये अजीज नाझा यांच्या आवाजातील ‘चढता सूरज…’ या लोकप्रिय कव्वालीच्या शैलीत सादर झालेली ‘आज बाबा शंकरजी सामने हमारे हैं…’ ही कव्वाली श्रोत्यांना विशेष भावली. रसिकाग्रहास्तव भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’ हे भजन समरसून सादर करीत मुकुंद बादरायणी यांनी श्रोत्यांना पंडितजींच्या आवाजाची अनुभूती दिली. मैफलीचा समारोप करताना त्यांनी ‘हम गया नही, जिंदा हैं…’ हा स्वामींचा संदेश कव्वालीच्या माध्यमातून भाविकांना दिला; तसेच ‘स्वामी कृपा कधी करणार?’ या भैरवीने उपस्थितांना अंतर्मुख केले. डॉ. लक्ष्मण अवधानी आणि ओंकार कुलकर्णी यांनी स्वरसाथ केली. सर्वेश बादरायणी (तबला), सुजीत लोहर (पखवाज), ज्योत्स्ना क्षीरसागर (संवादिनी), मकरंद बादरायणी (तालवाद्य) यांनी साथसंगत केली.

प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा धन्वंतरी अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण, भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. कैलास भैरट यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा