राणे नेतृत्वाचा वारसा, संघटनाची ताकद आणि अनुभवाच्या जोरावर जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीचा विश्वास
मालवण :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तारीख जवळ येत असताना संपूर्ण जिल्ह्यात प्रचाराची धामधूम वाढताना दिसत आहे. १९९० पासून खासदार नारायण राणे यांच्या विचारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आडवली–मालडी जिल्हा परिषद विभागात यंदा शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआयच्या महायुतीतर्फे सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली, माजी सभापती सुनील घाडीगांवकर व सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा विभाग गेल्या ३५ वर्षांपासून खासदार नारायण राणे आणि सध्या आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. या कालावधीत विभागातील बहुतांश विकासकामांमध्ये खासदार नारायण राणे यांचे सक्रिय योगदान राहिले आहे.
सौ. सोनाली घाडीगांवकर यांनी यापूर्वी २०१२ ते २०१७ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत अनुभव मिळवला आहे. त्या अनुभवाची शिदोरी घेऊन यंदा त्या पुन्हा मैदानात उतरल्या असून विभागातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ आपल्यामागे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आडवली–मालडी विभागात १९९० पासून मजबूत संघटन उभारण्यात आले असून, राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावे रस्त्यांनी जोडण्यासह अनेक मूलभूत विकासकामे झाली आहेत. सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत सुनील घाडीगांवकर यांनी गावाच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मागील काही वर्षांत विरोधी पक्षाचे आमदार व खासदार असल्याने विभागातील विकासकामांना काही प्रमाणात खीळ बसली होती. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था व ग्रामस्थांच्या किरकोळ समस्या वाढल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा राणे पर्व सुरू झाल्याने विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवडे गावासह संपूर्ण आडवली–मालडी जिल्हा परिषद मतदारसंघात नव्या विकासपर्वाची सुरुवात करण्यासाठी सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर सज्ज झाल्या आहेत. मागील कार्यकाळातील अनुभव आणि महायुती सरकारचे पाठबळ यामुळे त्या पुन्हा विजयी ठरतील, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
