सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’
*ना. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध
* खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन आणि आमदार निलेश राणे यांचा सहभागातून यश
* ५ जिल्हापरिषद आणि ६ पंचायत समिती सदस्य झाले बिनविरोध
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोठा धमाका केला असून, जिल्ह्यातील एकूण ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये ५ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांचा समावेश असून, या विजयाने कोकणच्या राजकारणात ‘राणे’च धुरंधर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
*जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचे वर्चस्व*
जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ५ जागांवर बिनविरोध विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. यामध्ये भाजपच्या ४ आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये खारेपाटणमधून प्राची इस्वलकर (भाजप), जाणवलीतून सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना – शिंदे गट), पडेल (देवगड) मधून श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप), बापर्डे (देवगड) मधून सौ. अवनी अमोल तेली (भाजप) आणि बांदा येथून श्री. प्रमोद कामत (भाजप) यांचा समावेश आहे.
*पंचायत समितीतही ‘कमळ’ फुलले*
पंचायत समितीच्या ६ जागांवर देखील महायुतीने वर्चस्व राखले आहे. नितेश राणे यांच्या राजकीय व्यूहरचनेसमोर विरोधकांनी नांगी टाकल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथून सौ. संजना संतोष राणे (भाजप) आणि वरवडे येथून श्री. सोनू सावंत (भाजप) हे बिनविरोध निवडून आले आहेत. देवगड तालुक्यातील पडेल मतदारसंघातून अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप), नाडणमधून गणेश सदाशिव राणे (भाजप) आणि बापर्डे येथून संजना संजय लाड (भाजप) यांनी यश मिळवले आहे. तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे मतदारसंघातून सौ. साधना सुधीर नकाशे (भाजप) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
*राजकीय व्यूहरचना आणि विरोधकांची माघार*
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ना. नितेश राणे यांच्या प्रत्यक्ष व्यूहरचनेमुळे जिल्ह्यातील अनेक जागांवर विरोधकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेषतः कणकवली मतदारसंघात राणे यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी असल्याने, शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री विरोधकांना आणखीन काही धक्के देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा विजय म्हणजे जनतेचा राणे कुटुंबीयांवरील विश्वास आणि महायुतीच्या कामाची पावती आहे. उरलेल्या ४५ जागांवरही आमचा करिष्मा कायम राहील, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
