शहिदी समागमाच्या ३५० व्या वर्षानिमित्त – नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणार भव्य कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी
शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय नांदेड या ठिकाणी एकत्र येणार आहेत.श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडला सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे .या कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी श्री गुरु तेग बहादूर यांना आपल्या संदेशाद्वारे अभिवादन करत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या व्हिडिओ संदेशामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या,श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभरामध्ये हिंद की चादर हा कार्यक्रम केला जात आहे.श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा संदेश तळागाळापर्यन्त पोहोचवावा,या उद्देशाने महाराष्ट्रामध्येही नांदेड,नवी मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम होत आहे.श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले.धर्मांतर सक्तीला शरण न जाता त्यांनी जीवनदान केले. गुरु तेग बहादूर यांनी अनंतपूरसाहेब सारखे पवित्र तीर्थस्थळ निर्माण केले. त्यांची एकच शिकवण होती की राष्ट्र मोठे आहे आणि प्रत्येकाने आपले कर्तव्य करताना शांतीचा संदेश दिला पाहिजे.हा संदेश त्यांनी जगभरामध्ये पोहोचविला .तर अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी म्हणाले, गुरू तेग बहादूर हे शिख समाजाचे नववे धर्मगुरू आहेत. त्यांनी मानव अधिकार सुरक्षेचे कार्य केले.ते फक्त शिख समाजाचे गुरू नसून त्यांनी वेगवेगळ्या समाजाला एकत्र आणण्याचे काम केले.हिंद की चादर – गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फतही राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गुरु तेग बहादूर यांचे महाराष्ट्राशी असलेले अतूट नाते या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर येणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी पुढे येऊन मनापासून या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा आदर करावा .राज्य आणि नांदेड नागपूर व नवी मुंबई जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांची सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे .
