*१४ डिसेंबरला शांतादुर्गा हॉल येथे न्यायमूर्ती अमित जामसंडेकर, श्रीराम शिरसाट व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची उपस्थिती; तरुण वकिलांसाठी दुर्मीळ मार्गदर्शनाची संधी*
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन तर्फे १४ डिसेंबरला सकाळी १० वाजता कुडाळ येथे जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले न्यायमूर्ती अमित जमसंडेकर आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांचा सत्कार होणार आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचे उच्च न्यायालयातील कामकाज आणि वकिली याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. कुडाळ पावशी येथील शांतादुर्गा हॉल येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वकिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲड. संग्राम देसाई यांनी केले आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ॲड. संग्राम देसाई यांनी आज कुडाळ कोर्टच्या बार रूम मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सचिव ॲड. यतिश खानोलकर, उपाध्यक्ष विवेक मांडकुळकर, महिला उपाध्यक्ष ॲड. नीमा गावडे, खजिनदार ॲड. गोविंद बांदेकर, ॲड. राजीव बिले, ॲड. अमोल सामंत, ॲड. राजिव कुडाळकर, ॲड. सुनिल लोट, ॲड. अविनाश पर्व, ॲड. अमित सावंत, ॲड. राजश्री नाईक, ॲड. हितेश कुडाळकर, ॲड. निखिल गावडे, ॲड. विक्रांत पर्व, ॲड. दत्ताराम बिले, ॲड. विनय मांदकुळकर, ॲड. रुषांक जाधव, ॲड. सुमथ गावंडे आदी वकील उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. संग्राम देसाई म्हणाले, न्यायमूर्ती अमित जामसंडेकर आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली आहे. ना. जामसंडेकर हे मूळ देवगड तर ना. शिरसाट हे कणकवली तालुक्यातील आहेत. त्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे. ना. सुरेंद्र तावडे यांच्यानंतर जिल्ह्याचे हे दोन्ही भूमिपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत आहेत. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांचाच नव्हे तर सामान्य माणसाला देखील अभिमान आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यांचे देखील यावेळी ‘उच्च न्यायालयातील कामकाज आणि वकिली’ याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. असे ॲड. देसाई म्हणाले.
ॲड. देसाई पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरी सह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर खंडपीठ स्थापन झाले आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यातील वकिलांनी तिथे जाऊन प्रॅक्टिस करावी अशी अपेक्षा आहे. पण तिथे प्रॅक्टिस करताना कोणत्या अडचणी येतात, तिथे कशी प्रॅक्टिस करावी याबाबतचे मार्गदर्शन ना. कर्णिक आपल्या व्याख्यानातून करणार आहेत. त्याच बरोबर कोल्हापूर खंडपीठाचे ना. दिने साहेब हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. ना. अमित जमसंडेकर यांनी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस कशी करावी याबाबत एक प्रेझेंटेशन देणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषत: तरुण वकिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. देसाई यांनी यावेळी केले.
ॲड. देसाई पुढे म्हणाले, यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. देशपांडे साहेब, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुळकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत अशा प्रकारचे मार्गदर्शन जिल्ह्यात झालेले नाही. त्यामुळे या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील तरुण वकिलांच्या पिढीला मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी मदत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड होण्यासाठी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केलेल्या वकिलांचा विचार केला जातो. त्यामुळे हा देखील फायदा वकिलांना होणार आहे. जिल्ह्यातील वकील सुद्धा कोल्हापूर खंडपीठात प्रॅक्टिस करून न्यायमूर्ती पदापर्यंत पोहोचू शकतील अशी आशा ॲड. संग्राम देसाई यांनी व्यक्त केली.
जे वकील जिल्ह्यात आणि मुंबई उच्च न्यायालयात चांगली प्रॅक्टिस करतात अशा वरिष्ठ वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यूमोटी सिनियर डेसिग्नेटेड काउन्सिल ही पदवी देतात. त्यामुळे अशी नवीन संधी येथील वकिलांना प्राप्त झालेली आहे असे ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले. येथील वकिलांची स्पर्धा आता महाराष्ट्र आणि देशातील वकिलांशी होणार आहे. ना. जमसंडेकर आणि ना. शिरसाट हे भूमिपुत्र असल्याने त्यांचा सत्कार होत आहे. याबरोबरच येथील तरुण वकिलांना यातून प्रेरणा मिळावी आणि येथील वकील सुद्धा उच्च पदावर पोहोचावेत हा सुद्धा उद्देश असल्याचे ॲड. देसाई यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मेहनत घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त वकिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. संग्राम देसाई यांनी केले आहे.
