*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उद्याची पहाट तरी कशाला!*
वाटलेल्या वाटांच्या वाटा निघाल्या
जपलेल्या जातींच्या,पोटजाती निघाल्या
जातींना ज्यांनी आसन दिले
त्यांना पीठासन मिळाले
आसनांचे ज्यांनी रक्षण केले
त्यांना देवत्व प्रदान केले ..!
दबलेल्या हुंदक्यांना
कोंडलेले अवकाश मिळाले
तडजोडीच्या जगण्याला
निरूपाय सोसणे मिळाले .!
आता ते वृक्ष माळावरचे
जातींना कवटाळुन छळतांत
भेगाळ भुईच्या पोटी
आता तेच जळतांत..!
जातीच्या अंधारी वाटेवर
उध्वस्त व्हायचचं आहे समाजाला
तडजोडीच्या निरूपाय सोसण्याला
उद्याची पहाट तरी कशाला ?!!
बाबा ठाकूर

