You are currently viewing शेतीत नवे कौशल्य – कलम बांधणी प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेचा मार्ग

शेतीत नवे कौशल्य – कलम बांधणी प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेचा मार्ग

शेतीत नवे कौशल्य – कलम बांधणी प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेचा मार्ग

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग, IQAC (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) आणि पीएम उषा (PM USHA) यांच्या संयुक्त विद्यमाने “कलम बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम” दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या प्रशिक्षणात वैभववाडी तालुक्यातील शेतकरी व विद्यार्थी मिळून एकूण ३७ प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रशिक्षणामध्ये सॉफ्टवुड ग्राफ्टिंग, टी-बडिंग, क्लेफ्ट ग्राफ्टिंग यांसारख्या कलम बांधणीच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा उद्देश शेतकरी आणि विद्यार्थ्यांना कलम बांधणीचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांचे कृषी कौशल्य विकसित करणे हा होता. या उपक्रमातून उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरणपूरक शेतीची दिशा, तसेच व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि कृषी आधारित उद्योजकतेची बीजे पेरण्याचे कार्य या प्रशिक्षणातून देण्यात आले.
या प्रशिक्षणात कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय वळवंडे, देवगड येथील मार्गदर्शक प्रा. विनायक ठाकूर यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी कलम तंत्रज्ञानातील बारकावे, नवे प्रयोग व उत्पादनक्षमतेसाठी आवश्यक असलेली कौशल्ये यावर सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित करत, कलम बांधणीसारख्या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते असे सांगितले.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.सचिन पाटील आणि सचिव डॉ.विजय पैठणे यांनी प्रशिक्षण यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.रमेश काशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सहभागी शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशा प्रकारचे शेतीपूरक प्रशिक्षण उपक्रम आयोजित करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा