पर्यटकांसाठी काचेचा साकव, पण जनता वापरणाऱ्या साकवांची दुरावस्था – परशुराम उपरकर
जिल्हा नियोजन मधून तात्काळ निधी देण्याची मागणी…
कणकवली
नापणे येथील धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेचा साकव बांधण्यात आला आहे. त्यामाध्यमातून जिल्ह्यात पर्यटक वाढावेत याबद्दल आनंदच आहे. पण गोरगरीब जनतेसाठी असलेल्या साकवांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचा सवाल माजी आमदार आणि शिवसेना नेते परशुराम उपरकर यांनी आज व्यक्त केला.
श्री.उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क साकवांद्वारे होतो. या साकवांच्या दुरुस्तीसाठी ३२ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. अनेक साकवांची अवस्था बिकट असल्याने शाळकरी मुले, गणपतीसाठी ये-जा करणारी मंडळी आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज असताना कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट, खासदार नारायण राणे यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवून जबाबदारी पालकमंत्र्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.
ते म्हणाले, नापणे धबधब्याजवळ पर्यटकांसाठी बांधलेला काचेचा साकव तकलादू असल्याची चर्चा आहे. पर्यटक वाढून रोजगार निर्मिती होत असेल तर त्याबद्दल आनंद आहे, परंतु सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून तकलादू प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणे ही जनतेची फसवणूक आहे. सत्ताधारी मंडळींनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

