*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*गुरुपौर्णिमा*
🕉️
आषाढ़ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हटले जाते. ज्यांनी महाभारत पुराण हा अलौकिक ग्रंथ लिहिला त्या वंदनीय व्यासमुनींना विनम्र वंदन करून त्यांची यथासांग पूजा करण्याचा हा मंगल दिवस आहे. त्यांच्यासारखे श्रेष्ठ आचार्य , मुनी ,ऋषी अद्याप झालेले नाहीत अशी आपल्या सारख्या सहृदांची अगाध श्रद्धा आहे.
*गुरु आचार्य हे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहेत त्यांनाच श्रद्धापूर्वक ईश्वर मानावे असे शास्त्रात कथन केलेले आहे.*
गुरू हेच आपल्याला ईश्वर भेटीचा सुकर ( सोपा ) मार्ग दाखवतात.
*व्यासोच्छीष्टम जगत सर्वम* असे त्यांच्याबद्दल लिहिले गेले आहे. एव्हडेच नव्हे तर *महर्षीव्यास हे भारतीय संस्कृतिचे शिल्पकार , आद्यजनक आणि मूलाधार मानले जातात. ज्या प्राचीन पुरातन ग्रंथात धर्मशास्त्र , नीतीशास्त्र , व्यवहारशास्त्र , मानसशास्त्र अशा विषयांचा परामर्श घेतला आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला आहे . म्हणून ज्यांना आपण ज्ञानियांचा राजा म्हणून मानले आहे त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ” *व्यासांचा मागोवा घेतू* असे म्हणून लिहिण्यास सुरुवात केली आहे.
*व्यासपौर्णिमेच्या दिवशी ” 🕉️ ” नमोस्तुते व्यास , विशाल बुद्धे ” अशी प्रार्थना करून प्रथम व्यासांना वंदन करण्याचा प्रघात आहे. परंपरा आहे. आपल्या भारतभूमीमध्ये अगदी प्राचिन कालापासून रामायण , महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. ज्यांच्या कडून आपण विद्या प्राप्त करतो , मिळवतो , शिकतो आणि त्याच विद्यार्जनाच्या बळावर आपण आपल्या जीवनाचा कृतार्थ उद्धार करतो अशा गुरुंचा सन्मान करणे , आदर करणे , त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हेच आपले निजी कर्तव्य आहे. आणि हीच प्रथा पूर्वापार *महर्षी व्यासमुनी पासून सुरु झाली असून ती आजपर्यन्त अव्याहत सुरु आहे.*
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत , आपले कोणीतरी गुरु आहेत ही भावनांच मुळात कृतार्थी कृतज्ञतेची आहे.
*आपल्या जन्मात प्रथम आपले परमपूज्य आईवडिल हेच आपले आद्य गुरु आहेत हे निर्विवाद.!! तर बाह्य जगतात आपले शिक्षक आपले गुरू असतात म्हणून या सर्वांच्या बद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे.*
भारतीय गुरुपरंपरेत अनेक वंदनीय गुरु-शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.
*जनक-याज्ञवल्य*,*कृष्ण-सुदामा*, *शुक्राचार्य-जनक*, *विश्वामित्र- राम,लक्ष्मण* *परशुराम- कर्ण, *द्रोणाचार्य-अर्जुन* अशी परंपरा प्रत्ययास येते. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय रहात नाही.
गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरुंची , ऋषी ,मुनींची , संत , गुरुंची पौर्णिमा मानली जाते. आणि ही श्रद्धा आहे.
*पौर्णिमा म्हणजे सत्यप्रकाश* गुरु शिष्याला ज्ञान देतात. शिष्याचे अंतरंग उजळून त्याला आत्ममुख करतात . ज्ञानाचा प्रकाश आपल्या शिष्यापर्यंत पोहचवितात म्हणून कृतज्ञता पूर्वक गुरुंची प्रार्थना करावयाची तो हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा !!
गुरु *ज्ञानाचा सागर* आहे.
जलाशयात प्रचंड , विपुल पाणी आहे. परंतु घटाने किंवा घागरीने खाली मान घालून पाणी भरले तरच पाणी मिळते तसेच गुरुजवळ नम्र झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. नम्रता आणि कृतज्ञता हे सद्गुण सर्वश्रेष्ठ मानले जातात. म्हणून अनेक आख्यायिका मधून *गुरू हे सर्वश्रेष्ठ आहेत हे मानले आहे.*
*गुरु बीन ज्ञान कहाँसे लाऊँ ?*
*किंवा गुरुविण कोण दाखविल वाट?*
हेच खरे..!!
म्हणूनच कृतज्ञतेपोटी आपल्याच मुखातून…
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः , गुरुर्देवो महेश्वर: ।।*
*गुरु: साक्षात परब्रह्म , तस्मै श्री गुरवेनमः।।*
हा मंत्र उच्चारला जातो.
🙏
*इती लेखन सीमा…*
*वि.ग.सातपुते.( विगसा.)*
*अध्यक्ष:, महाकवी कालीदास प्रतिष्ठान पुणे.*
📞: *(9766544908)*

