You are currently viewing भारतीय परंपरा जपणारी गुरुपौर्णिमा (व्यास पौर्णिमा)

भारतीय परंपरा जपणारी गुरुपौर्णिमा (व्यास पौर्णिमा)

*ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम लेख*

*भारतीय परंपरा जपणारी गुरुपौर्णिमा (व्यास पौर्णिमा)*

यंदा गुरुपौर्णिमा १० जूलै २०२५ या दिवशी आहे.
लहानपणी शाळेत असताना आम्ही मुले मुली शिक्षकांचे पद वंदन करीत असू. मुली गुलाबांची फुले शिक्षिकांना देत असू. तो दिवस गुरुपौर्णिमेचा असे. यानिमित्ताने अठरा पुराणे, रामायण, महाभारतात गुरू शिष्यांचे असलेले दाखले शिक्षक वर्गात सांगत.
जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण,सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशा गुरु-शिष्य परंपरेबद्दल कथा सांगत.
संत ज्ञानेश्वर-निवृत्तीनाथ, संत नामदेव-विसोबा खेचर, अशा अध्यात्मिक क्षेत्रातील जोड्या गुरू शिष्य म्हणून सर्वांना माहीत आहेतच.
“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ ”
अशी प्रार्थना यावेळी म्हटली जायची. गुरूशिवाय कोणतेही ज्ञान माणसाला मिळत नाही. शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करतात त्यांना गुरू म्हणून या दिवशी या प्रथेचे पालन केले जाते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा याच दिवशी देवगुरू व्यास यांचा जन्म झाला म्हणून व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. महर्षी व्यासांनी पुराणे, वेद ,महाभारत लिहीले त्यांना वंदन केले जाते. सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान, सुख, समृद्धी, कीर्ती मिळावी म्हणून गुरूंची, सरस्वती देवीची प्रार्थना केली जाते.
भारतीय संस्कृती परंपरेत चार आश्रमांपैकी पहिल्या ब्रह्मचर्याश्रमात लहान मुलांवर गुरू संस्कार करतात.
गुरुचरित्र ग्रंथात कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ
विचारला असता ब्रह्मदेव म्हणाले की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. भारत, नेपाळ ,भूतानमध्ये हिंदू, जैन , बौद्ध
धर्मीयांद्वारे गुरुपौर्णिमा सण म्हणून साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक गुरूंचा, शिक्षकांचा, नेत्यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.दत्त संप्रदायात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गुरूंचे अनेक प्रकार मानले जातात ते असे- पृच्छक गुरु, चंदन गुरु, अनुग्रह गुरु, कर्म गुरु, विचार गुरु, वात्सल्य गुरु, स्पर्श गुरु.
कला, साहित्य, नृत्य, संगीत, सिनेमा आदि क्षेत्रात गुरू ला खूप मान असतो. परंपरागत पद्धतीने गुरू प्रती ऋण व्यक्त केले जाते.
महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले.
श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गगनगिरी महाराज, शंकर महाराज आदि संत महापुरुषांच्याअनुयायांतर्फे मोठे सोहळे मंदिरांमध्ये केले जातात.

(संदर्भ-विकीपिडिया)
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा