You are currently viewing आचरा येथे रामजन्म सोहळा शाही थाटात संपन्न

आचरा येथे रामजन्म सोहळा शाही थाटात संपन्न

मालवण / आचरा :

मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. आज रविवारी चैत्र शुद्ध नवमीला दुपारी १२.३९ च्या मुहूर्तावर रामजन्माची ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी ललकारी होताच तोफा दणाणल्या. नगारे-ताशे झडू लागले. आचरानगरीत रामनामाचा नाद नभी पुरता निनादत होता. रामजन्म होताच येथे इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागले. यावेळी संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. आचरानगरीत साजरा होणारा राम जन्मोत्सव सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित झाले होते. या उत्सवाला मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी उपस्थिती दर्शवत उत्सवात सहभागी झाल्या होत्या. या मंगलसमयी ‘जय जय रघुवीर समर्थ’च्या ललकारीबरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.

इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आचरा पंचक्रोशी पूर्णपणे १२ दिवस रामनामात दंग झाली होती. भक्तांच्या गराड्यात आचऱ्यात सांब सदाशिव पुरता दंग झाला होता. इनामदार श्री देव रामेश्वराच्या पुरातन मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्यनारायण आल्याने उन्हाचे चटके बसत होते. तरीही भाविकांना उत्कंठा होती, ती रामजन्माची. रामेश्वर मंदिराच्या भव्य मंडपात रामदासी बुवांचे कीर्तन सुरू असताना रामजन्म होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला जयघोष सुरू झाला.

वाद्यांच्या गजरात सजविलेल्या पाळण्यात चांदीची रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. रामजन्म प्रसंगी गुलाल, अक्षतांची उधळण झाली. या क्षणांची याची देही याची डोळा साक्षात अनुभूती हजारो भाविकांनी घेतली. रामनवमी उत्सव आचरा रामेश्वर संस्थानसह संपूर्ण जिल्हयात साजरा करण्यात आला. रामजन्मानंतर श्रीच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी श्रींची पंचारतीसह महालदार,चोपदार, छत्रचामर, अबदागीर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी रामनामाची गीते सादर करण्यात आली. गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा आज रामजन्माचा आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळ्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी सहभागी झाले होते. सायंकाळी ६ वाजता गायक श्री. समीर अभ्यकर (ठाणे-मुंबई) संवादिनी- श्री. प्रसाद शेवडे, तबला साथ- श्री. रामकृष्ण करंबेळकर. यांचे गायन झाले. गायनात आचरावासिय मंत्र मुग्ध झाले होते.

रामजन्मानंतर उपस्थित सर्व जनता रामेश्वर संस्थानने केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादाच्या पंगतीस जात-पात, धर्माचा विचार न करता, एकाच पंगतीत सर्वधर्मीय नागरिकांनी एकमेकांच्या शेजारी बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीचा आशीर्वाद व महाप्रसादाचे सेवन करून प्रत्येकजण जीवन सार्थक झाल्याच्या भावनेतून परतत असतो. सुरमयी संगीताच्या मेजवानीचा रामन्मानंतर सायंकाळी नागरिकांनी आनंद लुटला. उत्सव शांततेत पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा व आचरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा